13 May 2018

मटा पुणे संवाद - रस लेख

रस नोहे डोंगा...
---------------


मार्च महिना सुरू झाला, की वातावरणात हलके हलके गरमपणा येत जायचा. याच धामधुमीत परीक्षा असायच्या. बाहेरचा रखरखाट, अंगातून वाहणाऱ्या घामाच्या धारा आणि पाणी पाणी होत असल्याच्या त्या अवस्थेत कसेबसे पेपर संपायचे. मग आम्ही सगळे मित्र धाव घ्यायचो ते आमच्या गावच्या बाजारतळावर. तिथं रसवंतिगृहं सुरू झालेली असायची. तिथं जाऊन पन्नास पैशांना मिळणारा रस प्यायलो, की पोटात कसं गार वाटायचं! एका ग्लासानं मन भरायचंच नाही. मग आणखी एक तेवढाच पूर्ण ग्लास भरून पुन्हा रस मागवायचा. पहिला ग्लास अत्यंत घाईघाईनं संपवलेला असायचा. त्या ग्लासानं जठराग्नी शांत झालेला असायचा. मग दुसरा ग्लास शांतपणे, निवांत हळूहळू प्यायचा. तोंडात अलवारपणे तो रस घोळवायचा. आतल्या प्रत्येक दाताला, हिरडीला, टाळूला, पडजीभेला त्या थंडगार द्रवाचा स्पर्श होऊ द्यायचा. कुठल्याही पदार्थांचा आस्वाद घेताना पंचेद्रियांनी घ्यावा, असं म्हणतात. म्हणजे रूप, रस, रंग, गंध, स्पर्श व चव अशा सर्व अंगांनी त्या पदार्थाचा आस्वाद घ्यावा. रस पिताना हे सर्व प्रकार होतात. आधी तो अप्रतिम हिरवट, पिवळसर आणि वर पांढरास्वच्छ फेस आलेला ग्लास पाहूनच डोळ्यांना थंडावा मिळतो. मग तो ग्लास नाकाशी नेल्याबरोबर त्यातल्या साखरेचा आणि त्यात मिसळलेल्या आलं, लिंबू व मिठाचा एक संमिश्र गोडसर वास येतो. त्या वासानं मुखरस जमा व्हायला सुरुवात होते. मग अलगद आधी त्या ग्लासाच्या कडेचा ओठांना होणारा गार गार स्पर्श! नंतर थेट तो अद्वितीय अमृततुल्य रस हळूहळू जिभेवर व मग अन्ननलिकेतून आत आत आतड्यांत उतरेपर्यंत त्या रसाचा स्पर्श अगदी जाणवत राहतो. पोट एकदम थंडगार होतं. मेंदू तरतरीत होतो, चित्तवृत्ती उल्हसित होते...
माझं लहानपण जामखेडला गेलं. तेव्हा म्हणजे साधारणतः २५-३० वर्षांपूर्वी आमच्या गावच्या बाजारतळावरची रसवंतिगृहं अत्यंत आकर्षक असायची. (म्हणजे अजूनही आहेत.) साधारणतः मार्च उजाडला, की बाजारतळावर मोकळ्या जागेत ही रसवंतिगृहं सुरू व्हायची. सगळीकडं बांबू रोवून तंबूचं कापड चारी बाजूला लावून, वर पत्रे टाकून हे दुकान सजायचं. या सर्व दुकानांचं वैशिष्ट्य म्हणजे तिथं लाकडी चरकच असतो आणि बैलाला जुंपूनच तिथं रस काढला जातो. लाकडी चरकाचा रस हा यंत्राच्या रसापेक्षा चवीला किती तरी सरस असतो. या दुकानांत वेगवेगळे विभाग करून टेबलं व प्लास्टिकच्या खुर्च्या मांडल्या जायच्या. एकाच वेळी पंधरा ते वीस माणसं सहज बसू शकायची. जमीन शेणानं स्वच्छ सारवलेली असायची. त्यामुळं साधारण चारच्या सुमारास या रसवंतिगृहात गेलं, की आत शिरल्या शिरल्या त्या सारवणाच्या वासाबरोबरच गार वाटायला सुरुवात व्हायची. चरकाला एक बैल जुंपलेला असायचा, तर दुसरा बाजूला बांधलेला असायचा. प्रत्यक्ष रस काढण्याची क्रिया तिथं उभं राहून पाहायची सगळ्याच मुलांना हौस असते. मीही फार लहानपणापासून त्या चरकासमोर उभं राहून सगळं पाहत असे. ओळखीच्या रसवाल्यांकडं कधी कधी ऊस त्या चरकात घालायचं भाग्यही लाभे. मला बैल या प्राण्याविषयी फार लहानपणापासून ममत्व आहे. रस काढताना गोल गोल फिरणाऱ्या बैलाकडं मी टक लावून पाहत असे. बैलाचे डोळे मला विलक्षण बोलके वाटतात. अनेकदा मला त्यात करुणभाव दिसायचा. एखादा ग्लास रस त्या बैलालाही द्यावा, असं मला फार मनापासून वाटे. 
गावाकडच्या या रसवंतिगृहांची ख्याती पंचक्रोशीत पसरलेली आहे. त्यामुळं शनिवारच्या बाजाराला किंवा एरवी कापडचोपड घ्यायला आलेली इतर गावची मंडळी इथं टेकून रस पिऊनच जाणार. सगळ्या रसवंतिगृहांतला लाकडी चरक सतत फिरत असायचा. दहा-बारा तरी दुकानं असायची. शिवाय त्या बैलांच्या गळ्यांत बांधलेल्या घुंगरांचा एक लयबद्ध नाद त्या वातावरणात सतत घुमत असायचा. त्या तंबूच्या कनातींमध्ये सिनेमा नट-नट्यांची पोस्टर लावलेली असायची. मग अनिल कपूर अन् माधुरीला साक्षी ठेवून आम्ही दोन दोन ग्लास रस प्यायचो.
त्यानंतर पुढं नगरला आणि नंतर पुण्यात राहायला आलो. इथले आणि इतर शहरांतले वेगवेगळ्या ठिकाणचे, चवीचे अनेक रस प्यायलो. अर्थात अजूनही गावच्या त्या लाकडी चरकातून निघालेल्या रसाची चव काही औरच होती, असंच मन सांगतं. याचं कारण त्या चवीसोबत संपूर्ण बालपण गुंफलेलं असतं. बालपण परत आणता येत नाही, पण निदान त्या काळातला आजही अस्तित्वात असलेला हा एक तरी घटक पुनश्च अनुभवू शकतो, याचाच तो खरा आनंद असावा. 
पुण्यातल्या रसाच्या आठवणीही रसदार अन् चवदार आहेत. पुण्यातला रस म्हटलं, की मला आजही आठवतो तो कॅम्पातला जम्बो ग्लासातला रस. मोलेदिना रोडकडून कमिशनर ऑफिसकडं जायला लागलं, की त्या रस्त्यावर बहुतेक डाव्या बाजूला हा रसवाला होता. त्या काळात, म्हणजे साधारणतः १९९१ च्या आसपास तो एक रुपयाला जम्बो ग्लास भरून रस द्यायचा. शिवाय हा रस बिगरबर्फाचा असायचा. हा रस प्यायला तिथं तोबा गर्दी उडालेली असायची एवढंच आठवतं. आता हा रसवाला आहे की नाही, माहिती नाही. बहुतेक नसावा. पण एके काळी या जम्बो ग्लासची फार क्रेझ होती, हे नक्की. 
नंतर मी भाऊमहाराज बोळात राहायला गेलो, तेव्हा शनिपाराच्या कोपऱ्यावरच्या मुरलीधर व इंद्रायणी या दोन्ही रसवंतिगृहांशी गट्टी जमली. इंद्रायणी हे तर प्रॉपर हॉटेलसारखं मोठं दुकान आहे. तिथला रस अप्रतिम असतो. मुरलीधर रसवंतीची जागा थोडी लहान आहे, पण हाही उत्कृष्ट रस आहे. याशिवाय खजिना विहिरीजवळचे शैलेश रसवंतिगृह प्रसिद्ध आहे. इथं रसासोबतच काकवी वगैरे गुळाची उत्पादनंही विकायला असतात. शैलेश रसवंतिगृहाचा व्यवसाय पिढीजात सुरू आहे, असं दिसतं. याशिवाय अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयासमोर एक रसवाला आहे. त्याचं नाव मला आठवत नाही. पण तिथल्या पाट्या आठवतात. त्या टिपिकल पुणेरी पाट्यांसोबतच रसाचं आयुर्वेदिक माहात्म्य व रस डायबेटिसलाही कसा चालतो, वगैरे पाटी भारी आहे. बहुदा समोरच्या आयुर्वेदिक कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून लिहून घेतली असावी.  
पुण्यातल्या कृषी महाविद्यालयातला रसही प्रसिद्ध होता. आता तिथं समोर उड्डाणपूल झालाय. पूर्वी हा पूल नव्हता, तेव्हा कृषी महाविद्यालयाच्या कमानीलगतच सुरू असलेलं त्यांचं रसवंतिगृह दिसायचं. कधीही या रस्त्यानं गेलो आणि तिथला रस प्यायलो नाही, असं कधी झालंच नाही. हा रस सेंद्रिय उसापासून काढलेला वगैरे असायचा. म्हणून त्याची किंमत जास्त असायची. बाकी ठिकाणी एक रुपयाला असेल, तर इथं दोन रुपये ग्लास अशी किंमत असायची. पण त्या रसाची चव वेगळी आणि छान असायची, यात वाद नाही. खूप लोक इथून पार्सल घेऊन जाताना पाहिली आहेत.
याशिवाय गावोगावच्या बसस्टँडवर असलेली 'नवनाथ', 'कानिफनाथ' आदी नाथपंथीय नावे असलेल्या रसवंतिगृहांतला रस आपण बहुतेक सगळ्यांनी प्यायला आहेच. चोखोबांनी म्हटल्याप्रमाणे - ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा... का रे भुललासी वरलिया रंगा... तद्वत रस म्हणजे (कुठल्याही गोष्टीचे) अंतर्याम... शुद्ध, स्वच्छ, नैसर्गिक... तो पिऊन आपणही थोडे तसे होऊ या...
थोडक्यात काय, हा रस आहे, तर जीवनात 'रस' आहे! 
---

(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स पुणे, संवाद पुरवणी, १३ मे २०१८)
---

No comments:

Post a Comment