31 Mar 2017

एक सिनेमा - दोन रिव्ह्यू

ट्रॅप्ड - एक सिनेमा - दोन रिव्ह्यू
-----------------------------

'ट्रॅप्ड' हा सिनेमा मी काल पाहिला. या सिनेमाचा कुठलाच रिव्ह्यू मी आधी वाचला नव्हता. (तो मी एरवीही कधीच वाचत नाही.) पण तरी सिनेमा चांगला आहे, अशी चर्चा कानावर होती. विक्रमादित्य मोटवानी आणि राजकुमार राव या नावांचंही आकर्षण होतं. या दोघांचीही आधीची कामं पाहिली होती. या सगळ्यांमुळं माझी अपेक्षा कदाचित वाढली असावी. त्यामुळं सिनेमा पाहून झाल्यावर मला तो फार काही ग्रेट वगैरे वाटला नाही आणि त्याला पाचपैकी तीन(च) स्टार द्यावेसे वाटले. नंतर मुग्धा गोडबोले-रानडेनं माझ्या पोस्टवर टाकलेली कमेंट वाचून वाटलं, की खरंच आपल्याला हा सिनेमा आवडलाय की नाही? फार अपेक्षा ठेवून न जाता, कोरी पाटी ठेवून गेलो असतो, तर कदाचित आपलं मत वेगळं असतं. मग डोक्यात विचार आला, की या सिनेमाचे दोन रिव्ह्यू लिहू या. एक चांगली बाजू दाखवणारा आणि एक वाईट... दोन्ही मीच लिहिणार अर्थात... सम्या आणि गौरीच्या गोष्टींसारखाच हाही एक प्रयोग...
----

पहिला रिव्ह्यू (चांगला)
------------------------

महानगरी घुसमटीचं प्रभावी दर्शन
-----------------------------------------------------
विक्रमादित्य मोटवानीचा 'ट्रॅप्ड' हा नवा सिनेमा म्हणजे महानगरी घुसमटीचं प्रभावी दर्शन आहे. राजकुमार रावची प्रभावी भूमिका आणि अव्वल दर्जाचं ध्वनिआरेखन यामुळं 'ट्रॅप्ड' बघणं हा एक अनुभव ठरतो. विक्रमादित्यचे उडान आणि लुटेरा हे दोन्ही सिनेमे त्याच्याविषयी अपेक्षा वाढविणारे आहेत. तीच गोष्ट राजकुमार रावची. गेल्या काही काळात या अभिनेत्यानं वेगवेगळे प्रयोग करीत स्वतःला सिद्ध केलं आहे. ट्रॅप्ड हा नवा हिंदी चित्रपट म्हणजे या दोघांचाही एक नवा प्रयोगच आहे. याचं कारण म्हणजे या सिनेमाची कथा. एक तरुण मुंबईत एका एकाकी इमारतीत पस्तिसाव्या मजल्यावर अडकून पडतो. तिथून बाहेर पडण्याचे सर्व प्रयत्न तो करतो, मात्र तब्बल सात दिवस तो तिथंच कोंडून राहतो. अखेर पुढं त्याचं काय होतं, तो तिथून बाहेर पडतो का, मुळात तो तिथं अडकतोच कसा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं 'ट्रॅप्ड'मध्ये मिळतात. या सिनेमात बहुतांश भागात फक्त नायक शौर्य (राजकुमार राव) आपल्याला दिसतो. त्यासोबत दिसते ती त्याची सुटण्याची धडपड...
इथं दिग्दर्शकानं एक सिच्युएशन तयार केली आहे आणि आपला कथानायक त्यावर रिअॅक्ट होतोय. त्याच्या आयुष्यात अचानक हा संघर्ष निर्माण झालाय. आपल्याही आयुष्यात कित्येकदा काहीच कल्पना नसताना एखादं संकट समोर येऊन ठाकतं आणि आपल्या अंगात मग अचानक त्या संकटाशी लढण्याची ताकद निर्माण होते. माणसाची जीवनेच्छा ही फार आदिम आणि चिवट गोष्ट आहे. जगण्यासाठी माणूस काहीही करू शकतो. कितीही टोकाची परिस्थिती निर्माण झाली, तरी त्यावर मात करू शकतो. आपल्याला कित्येकदा आपल्यात ही क्षमता किती प्रमाणात आहे, याचा अंदाज नसतो. पण अचानक संकट निर्माण झाल्यावर आपल्यालाच आपल्यातील या तीव्र जीवनेच्छेचा शोध लागतो. तो एक दिव्य क्षण असतो. आपण आपल्याला नव्यानं शोधलेलं असतं. 'ट्रॅप्ड'च्या नायकाचं नेमकं तेच होतं. त्याचा हा शोध अत्यंत त्रासदायक आहे, वेदनादायी आहे... त्याच्यासोबत तो प्रेक्षक म्हणून आपल्यालाही सोसावा लागतो. पण दिग्दर्शकालाही हेच अपेक्षित आहे. म्हणूनच त्या रिकाम्या, उंच फ्लॅटमध्ये आपणही नायकासोबत घुसमटत राहतो, दबून जातो, किंचाळतो, ओरडतो, दमून झोपतो, स्वतःलाच दोष देत राहतो आणि अगदी प्रचंड एकटं एकटं वाटून घेतो...
त्या अर्थानं विक्रमादित्यची ही कलाकृती फारच प्रतीकात्मक आहे. महानगरी आयुष्यात याचं प्रत्यंतर आपल्याला वारंवार येत असतं. आजूबाजूला एवढी गर्दी असते, तरी आपण एकाकी असतो. फार एकाकी... इंग्रजीतला 'लोनली' हा शब्द त्यासाठी अचूक आहे. 'अलोन' नव्हे, 'लोनली'! एकटे नव्हे, एकाकी!! तर काही प्रसंगपरत्वे आपलं हे एकाकीपण अचानक आपल्यावर येऊन आदळतं आणि मग त्याचा सामना करण्यावाचून आपल्याला पर्यायच राहत नाही. अशा वेळी फार द्विधा अवस्था होते. आपल्याला हा आहे, तो आहे, असं जे आपल्याला वाटत असतं आयुष्यभर, त्या लोकांचा, त्या नात्यांचा अशा संकटसमयी काहीच उपयोग नसतो, हे एक उमगतं आणि दुसरं म्हणजे अशा संकटांच्या वेळी शेवटी आपण एकटेच असू तर या सगळ्या नात्यांचं करायचं काय, या विचारानं येणारं वैफल्य... या दोन्ही मानवी भावनांना ही कलाकृती फार आतून साद घालते.
'ट्रॅप्ड'मध्ये काही त्रुटी निश्चितच आहेत. विशेषतः पटकथेतील अनेक छिद्रं जाणवतात. सुटकेसाठी केले जाणारे प्रयत्न पाहता, काही तर्कशुद्ध प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. मात्र, दिग्दर्शकाला यातली प्रतीकात्मकता महत्त्वाची असेल, असं समजून हा सिनेमा पाहिला तर बरंच काही गवसेल. विशेषतः आग आणि पाणी या दोन पंचमहाभुतांचा केलेला वापर माणसाच्या प्रगतीचं वैयर्थ दाखवणारा आहे.
राजकुमार राव यानं एकट्यानं हा सिनेमा खाल्ला आहे. फ्लॅटमध्ये अडकल्यानंतरची त्याची घुसमट आणि नंतर सुटकेसाठी त्यानं प्राण पणाला लावून केलेले प्रयत्न त्यानं फार खरे खरे दाखवले आहेत. ते अगदी भिडतात. विशेषतः जीवावर बेततं, तेव्हा आपल्यावरचे मूल्यसंस्कार (उदा. शाकाहारी असणं) किती बेगडी ठरतात, हा अंतर्विरोध त्यानं छान दाखवलाय. चित्रपटाचं ध्वनिआरेखन (अनिश जॉन) अव्वल दर्जाचं आहे. फ्लॅटमध्ये अडकल्यानंतर शौर्यला तिथं फक्त फ्लॅटमधल्या थोड्या फार वस्तूंचा आधार असतो. या वस्तू आणि त्यांचे आवाज त्याचा एकाकीपणा आणखी गडद करतात. हा बारकावा नीटच ऐकण्यासारखा आहे. या सिनेमाला मध्यंतर नाही. सलग एक तास ४१ मिनिटांचा हा थरारक अनुभव आहे.
मला तरी 'ट्रॅप्ड' हा महानगरी जंगलात एकाकी असलेल्या माणसाचा स्वतःशीच असलेला संघर्ष वाटला. एका सिनेमाचे प्रेक्षकांना अनेक अर्थ वाटू शकणं हे त्याचं यशच मानायला हवं. नक्की बघा.
दर्जा - चार स्टार

---
रिव्ह्यू दुसरा (वाईट)
---------------------
सुटलो एकदाचा...!
------------------------------

विक्रमादित्य मोटवानीचा 'ट्रॅप्ड' हा नवा हिंदी सिनेमा संपल्यावर माझ्या मनात 'सुटलो एकदाचा...' ही एकच भावना आली. मुंबईसारख्या महानगरात एक माणूस पस्तिसाव्या मजल्यावर अडकतो, या जवळपास अशक्य वाटणाऱ्या कथानकावर ही गोष्ट आधारलेली आहे. विक्रमादित्य आणि राजकुमार राव या दोघांचेही आधीचे अनुभव आश्वासक आहेत. मात्र, या सिनेमात त्यांनी केलेला हा वेगळा प्रयोग पटकथेत अनेक त्रुटी असल्यानं केवळ प्रयोगाच्याच पातळीवर राहतो आणि एक चांगला सिनेमा होता होता राहिला, असं वाटतं.
SPOILER AHEAD
मुंबईत राहणाऱ्या शौर्य (राजकुमार राव) या तरुणाची ही गोष्ट आहे. प्रेमात पडलेल्या शौर्यला तातडीनं एक जागा हवी आहे. ती जागा मिळाली, तरच त्याची प्रेयसी त्याच्यासोबत पळून येऊन लग्न करणार आहे. या गडबडीत शौर्यला एक एजंट प्रभादेवीतल्या एका एकाकी इमारतीत पस्तिसाव्या मजल्यावर घेऊन जातो. या इमारतीचं काम अद्याप चालू आहे. तिथं कुणीच राहत नाही. खाली फक्त एक वॉचमन आहे. अगदी अडलेला असल्यामुळं शौर्य ती जागा घेतो. दुसऱ्या दिवशी घाईघाईत त्याच्याकडून किल्ली लॅचला राहते आणि मोबाइल आणायला तो फ्लॅटच्या आत गेला असताना, वाऱ्यानं धाडकन दार बंद होतं. शौर्यकडून आतला नॉबही तुटतो आणि तो अडकतो. अशा परिस्थितीत पॅनिक होऊन तोे जे काही करायचं ते करतो. पण दार काही उघडत नाही. त्यातच त्याच्या फोनची बॅटरीही संपते. त्या फ्लॅटमधलं पाणीही जातं. लाइटही जातात. एजंट निघून गेलेला असतो. शौर्य आधी जिथं राहत असतो, तिथल्या मुलांना तो गावी जातोय असं सांगून निघालेला असतो. अशा स्थितीत शौर्य या फ्लॅटमध्ये अन्न-पाण्याविना सात दिवस अडकून पडतो. शेवटी काय होतं, हे पडद्यावर पाहणं इष्ट असं म्हणणं मस्ट असलं, तरी इथं 'मस्त' मात्र नाही. 
याचं कारण म्हणजे दिग्दर्शकाला काहीही करून आपल्या नायकाला त्या फ्लॅटमध्ये अडकवायचंच आहे. त्यामुळं ही तयार केलेली सिच्युएशनच मुळात पटत नाही. त्यामुळं त्यावर डोलारा असलेला पुढचा सगळा ड्रामाही कृत्रिम वाटू लागतो. मुंबईत सहसा वीजपुरवठा खंडित होत नाही. या इमारतीत मात्र सुरुवातीला नीट असलेला वीजपुरवठा पुढं नायक त्या फ्लॅटमधून बाहेर पडेपर्यंत खंडितच असलेला दाखवला आहे. हे मुळात पटत नाही. शिवाय सुटकेसाठी तो जे प्रयत्न करतो, त्यातही बरेच अंतर्विरोध आहेत. एक मोठा टीव्ही तोे खाली फेकतो, त्याचा आवाज होऊनही वॉचमन लक्ष देत नाही, हे पटत नाही. याच वॉचमनला नंतर शौर्यनं खाली भिरकावलेलं पोस्टर मिळतं, त्यावरही तो काहीच करत नाही आणि ते पोस्टर घडी घालून ठेवून देतो, हे अगम्य आहे. नंतर एका शेजारच्या इमारतीच्या छतावर असलेल्या बाईचं लक्ष वेधून घेण्यासाठी तो गलोलीतून खडे मारतो, असं दाखवलं आहे. ते अंतर बघता आणि दगडांचा आकार बघता ते त्या इमारतीपर्यंत पोचणं अवघड वाटतं. सगळ्यांत हाइट म्हणजे, पाण्याची गरज असताना, केवळ उंदराला घाबरून शौर्य स्वयंपाकघरात जात नाही, हे अजिबात पटत नाही. नंतर तो जे पक्षी, कीटक मारून खातो, तो सगळा प्रकार किळसवाणा आहे. एकदा तर तो टेरेसमध्ये मोठी आग लावतो तरीही कुणाच्या लक्षात येत नाही, हेही अजबच वाटतं. पाऊस येतो आणि त्याला भरपूर पाणी मिळतं, ही म्हटली तर दिग्दर्शकालाच दिलासा देणारी गोष्ट ठरते. याचं कारण नायकाला पुढचे काही दिवस तगवणार कसं? शेवटी शौर्य जो उपाय करतो, तोच उपाय मग तो पहिल्या किंवा जास्तीत जास्त दुसऱ्याच दिवशी का करत नाही? मदतीला आलेली स्त्री मधूनच परत का जाते? आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे त्याची प्रेयसी त्याचा अजिबात शोध का घेत नाही? त्याच्या टी-शर्टची कंटिन्युइटीही अनेक ठिकाणी बोंबलली आहे.
पटकथेत अशा अनेक त्रुटी असल्यानं सिनेमात गुंतायला होत नाही. नंतर नंतर तर चुका काढण्याकडंच आपला कल वाढू लागतो. शौर्य सुटल्यानंतरची त्याची देहबोली आणि एकूण प्रतिक्रिया मात्र दिग्दर्शकानं छान टिपली आहे. त्याला दाद द्यायला हवी. सिनेमाचं ध्वनिआरेखनही उत्तम दर्जाचं आहे. असं असलं, तरी एक उत्तम सिनेमा बनता बनता राहिला, असंच वाटून जातं.
राजकुमार रावनं अप्रतिम काम केलं आहे. किंबहुना त्याच्यामुळंच आपण हा सिनेमा शेवटपर्यंत पाहू शकतो. यातला नायक आणि त्याची संकटाची स्थिती राजकुमारच्या देहबोलीमुळंच आपल्याला पटू शकते. एक वेगळा प्रयोग म्हणून पाहायला हरकत नाही. पण फार अपेक्षा ठेवल्यास 'सुटकेची वाट' बघत बसावं लागेल.
दर्जा - दोन स्टार
---

5 Mar 2017

'मग्न तळ्याकाठी...'विषयी...

खोल खोल तळं...
-----------------
काल, शनिवारी 'मग्न तळ्याकाठी' नाटक पाहिलं. महेश एलकुंचवारांच्या वाडी चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी अन् युगान्त या गाजलेल्या त्रिनाट्यधारेतलं हे दुसरं नाटक. 'वाडा चिरेबंदी' हे यातलं पहिलं नाटकही काही काळापूर्वी पाहिलं होतं. त्यामुळं हा दुसरा भाग बघण्याची खूप उत्सुकता होती. तो काल अखेर पाहिला आणि धन्य झालो. त्या क्षणी एवढ्या भारावल्या अवस्थेत होतो, की कुठल्याही भावना व्यक्त कराव्याशा वाटत नव्हत्या. पण रात्री मात्र बांध फुटला अन् डोळे अखंड झरत राहिले. कुठं तरी काळजात काही तरी तुटत गेलं. शिवाय अतीव समाधानानंही कधी कधी डोळे वाहतातच की... केव्हा केव्हा तर काही कलाकृती बघून एवढा आनंद होतो की शरीराला कळतच नाही, याचं काय करायचं ते...! मग ते वेडं सगळे आउटलेट्स उघडतं. डोळे वाहायला एवढं निमित्त पुरेसं असतं. नाटककाराचे शब्द, दिग्दर्शकाचं आकलन आणि प्रेक्षकांची पंचेंद्रियं याचं असं काही मेतकूट जमून जातं, की वर्णन अपुरं पडावं. 'मग्न तळ्याकाठी' हे नाटकही आपल्याला असाच आत्मिक अनुभव देतं.
वऱ्हाडातल्या धरणगावात राहणाऱ्या धरणगावकर देशपांडे कुटुंबाची ही कथा. या नाटकाच्या पूर्वी पहिल्या भागात काय झालंय ते थोडक्यात निवेदनाद्वारे सांगितलं जातं. त्यामुळं पहिला भाग न पाहणाऱ्यांनाही बऱ्यापैकी संदर्भ कळतात. (पण माझी शिफारस अशी आहे, की पहिला भाग बघूनच हा भाग बघावा. म्हणजे आस्वादनात अजिबात कुठलीच त्रुटी राहणार नाही.) पहिल्या भागाचा काळ होता १९८५ चा, तर आत्ताचं नाटक घडतंय त्यानंतर दहा वर्षांनी - म्हणजेच १९९५ मध्ये! हा सगळा फारच नजीकचा भूतकाळ आहे. त्यामुळं आत्ता चाळिशीला असलेले लोकही त्या काळातल्या महाराष्ट्राची सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थिती निश्चितच डोळ्यांसमोर आणू शकतात. हे संदर्भ नाटक पाहताना महत्त्वाचे ठरतात. त्यामुळं एका अर्थानं हे नाटक प्रेक्षकांकडूनही एका विशिष्ट प्रगल्भतेची अपेक्षा करतं. असा प्रेक्षक असेल, तर ते त्याला दामदुपटीनं काही तरी परत देतं. ते जे काही आपल्याला परत मिळतं ना, त्याची पावती आपलं शरीरच आपल्याला देतं. आपण कधी हसतो, कधी चिडतो, कधी रडवेले होतो, कधी करुणेनं मन भरून जातं, तर कधी संतापानं कडेलोट होतो. पात्रांच्या कथेशी आपण असे तादात्म्य पावतो, याचं कारण एलकुंचवारांची लेखणी आणि चंदू कुलकर्णींच्या दिग्दर्शनाची कमाल... आणि अर्थातच कलाकारांचा अप्रतिम अभिनय!
आपल्याकडं ग्रामीण भागातील सामाजिक चौकटी वर्षानुवर्षं एकाच साच्याच्या होत्या. कुणी काय करायचं आणि कुणी काय नाही, याच्या नियम व शर्ती ठरलेल्या होत्या. महाराष्ट्रातल्या खेड्यांतल्या समाजजीवनाची एक विशिष्ट रचना होती. स्वातंत्र्यपूर्व काळात ती बहुतेक सर्व प्रदेशांत सारखी होती. विदर्भात मालगुजार होते, देशावर पाटील होते आणि कोकणात खोत होते, एवढाच काय तो फरक! उत्तर पेशवाईचा अंमल सरून शंभर वर्षं झाली असली, तरी ब्राह्मणांचा समाजजीवनातील वरचष्मा आणि दबदबा कायम होता. याचं कारण इंग्रजी राजवट आल्यानंतर ब्राह्मणांनी चतुराईनं इंग्रजी शिक्षण पदरात पाडून नोकऱ्या मिळविल्या... तर ते असो. मुद्दा असा, की या ग्रामीण समाजजीवनातील चौकटीला पहिला धक्का लागला तो महात्मा गांधींच्या हत्येनंतर. विशेषतः खेड्यातील ब्राह्मणांचं स्थलांतर मोठ्या प्रमाणात घडून आलं ते याच काळात. (सुमित्रा भावेंचा 'वास्तुपुरुष' यानंतरच्या दहा वर्षांनंतरच्या खेड्यातील ब्राह्मणांची प्रातिनिधिक कथा सांगतो. विशेष म्हणजे त्यात एलकुंचवारांनीही भूमिका केली आहे.) एलकुंचवार मात्र आणखी पुढच्या काळात येतात आणि १९८५ च्या काळातील विदर्भातील खेड्यामधल्या ब्राह्मण कुटुंबाची शोकांतिका मांडतात.
एलकुंचवारांनी यात सामाजिक मूल्यसंघर्षाचा आणि ढासळत गेलेल्या कुटुंबव्यवस्थेचा असा काही उभा छेद घेतला आहे, की ती केवळ एका कुटुंबाची वा केवळ ब्राह्मणांची शोकांतिका राहत नाही. तिला व्यापक परिमाण लाभतं ते यातल्या चिरंतन मूल्यांच्या लढाईच्या अस्तित्वामुळं. (इथं शेक्सपिअरची आठवण आल्याशिवाय राहत नाही.) एलकुंचवारांच्या लेखणीत ही ताकद असल्यानं ते धरणगावकर देशपांड्यांच्या गोष्टीला वेगळ्या उंचीवर नेऊ शकतात.
आपण १९८५ चा काळ पाहिला तर महाराष्ट्रात व देशात तो बऱ्यापैकी अस्थैर्याचा काळ होता. ऐंशीच्या दशकाला सुमार दशकही म्हटलं जातं. केवळ समाज म्हणून नव्हे, तर देश म्हणूनही अनेक आघाड्यांवर आपण निकृष्टतेचे तळ गाठत होतो. इंदिरा गांधींची हत्या झाली होती, राजीव गांधी प्रचंड बहुमतानं सत्तेवर आले होते, भारतानं क्रिकेटचा वर्ल्ड कप नुकताच जिंकला होता, कपिल देव आणि सुनील गावसकर हे क्रिकेटचे हिरो होते, रवी शास्त्रीनं ऑडी पटकावली होती, टीव्ही नुकताच रंगीत झाला होता, दूरदर्शनवर हमलोग मालिका लोकप्रिय झाली होती, मुख्यमंत्री वसंतदादांनी नुकतीच विनाअनुदानित इंजिनीअरिंग कॉलेजांना परवानगी दिल्यानं साखरसम्राट आणि शिक्षणसम्राटांची नवनवी शिक्षण संकुलं उभारण्याकडं वाटचाल सुरू झाली होती, शरद पवार अद्याप एस काँग्रेसमध्येच होते, पुलं-सुनीताबाई अद्याप अॅक्टिव्ह होते आणि गावोगावी कवितांचे कार्यक्रम करीत होते, कुसुमाग्रज, जयवंत दळवी, वसंत बापट, विंदा करंदीकर, व्यंकटेश माडगूळकर ही सर्व मंडळी चांगली कार्यरत होती आणि महाराष्ट्रभर कार्यक्रम करत हिंडत होती, महेश कोठारे आणि सचिन या नव्या जोडगोळीनं अनुक्रमे धुमधडाका अन् नवरी मिळे नवऱ्याला या सिनेमांद्वारे मराठी सिनेमात जान फुंकली होती, राज कपूर अद्याप सक्रिय होता; पण आता त्याला सिनेमा चालण्यासाठी ओलेत्या मंदाकिनीचा पदर लागत होता, धर्मेंद्रचा मुलगा सनी देओलनं नुकतंच बेताब नावाच्या सिनेमातून पदार्पण केलं होतं... जागतिकीकरण अद्याप फार लांब होतं, सचिन तेंडुलकर नावाचा मुलगा अजून शिवाजी पार्कपलीकडं कुणाला माहिती नव्हता, मोबाइल ही परग्रहावरची गोष्ट होती आणि सोशल मीडिया हे नावही तेव्हा कुणी ऐकलं नव्हतं...
असं असलं, तरी मराठी मध्यमवर्गीय कुटुंबांनी वर्षानुवर्षं जपलेल्या मूल्यांना, संस्कारांना तडे जायला केव्हाच सुरुवात झाली होती. स्वातंत्र्यानंतर देशात आलेल्या रोमँटिसिझमची पुढच्या वीस-पंचवीस वर्षांतच नेहरूंसोबतच राखरांगोळी झाली होती... इंदिरा गांंधींच्या काळात देशात नवा शिष्टाचार उदयास आला होता, त्याला भ्रष्टाचार असं म्हणत असत... लायसन्स राज, परमिट राजच्या काळात मुंबईतही हाजी मस्तान अन् वरदराजनच्या रूपानं तस्करांचे सम्राट जन्मू लागले होते...
खेड्यांत तर परिस्थिती फारच भीषण होती. अभावग्रस्तता संपत नव्हती, पण मूल्यांशी तडजोड करून पैशांची बेगमी करता येते याची उदाहरणं वेगानं आजूबाजूला दिसू लागली होती... भ्रष्टाचार करण्याची पहिली संधी मिळताच अनेकांनी वर्षानुवर्षं जोपासलेली नीतिमूल्यं क्षणार्धात बिछान्यावर घेतली अन् या नव्या लाटेत ते सर्वार्थानं पतित झाले.
हा सगळा बदल टिपत एलकुंचवारांनी 'मग्न तळ्याकाठी'ची कथा रंगवलीय. हे सगळं वर्णन केलेलं भू-राजकीय वास्तव त्यांच्या कथेत 'बिटवीन द लाइन्स' येत राहतं. पात्रांच्या न बोललेल्या वाक्यांतून ते टोचत राहतं. आणि मग... एका क्षणी पात्रांतलं आणि आपल्यातलं अंतर नष्ट होतं आणि आपणच यातले पराग होतो, आपणच यातला अभय होतो, आपणच बाई होतो, आपणच काकू होतो, आपणच चंदूकाका होतो अन् आपणच रंजू होतो... आपल्या स्खलनाचा सगळा आलेखच या पात्रांच्या रूपानं आरशासारखा लेखक आपल्यासमोर धरतो आणि त्यातलं आपलं नागडं प्रतिबिंब पाहून आपण अंतर्बाह्य हादरून जातो. सध्याच्या काळात आपण एवढे मुखवटे आणि गेंड्यालाही लाजवेल अशी जाड संभाविताची कातडी पांघरून बाह्य जगात वावरत असतो, की हे सगळं भेदून आत काही जाईल, अशी आपल्याला अपेक्षाच नसते. पण एलकुंचवारांमधला समर्थ लेखक आणि चंदू कुलकर्णींमधला प्रतिभावंत दिग्दर्शक असं काही जादूचं इंजेक्शन टोचतो, की हे सगळे मुखवटे, जाड कातडी भेदून या गोष्टीतलं मर्म थेट आपल्या काळजाला भिडतं. आपल्याला उभं-आडवं सोलवटून, आपलीच छिललेली त्वचा नाटककार आपल्या हातावर ठेवतो अन् सांगतो - बघ, यात काही प्राण शिल्लक आहेत का!
... म्हणून यातले भाऊ आपल्याला अगदी अस्सल वाटतात. आपल्याच घरात आपण असे भाऊ बघितलेले असतात. आपल्या वडिलांच्या, आजोबांच्या रूपानं. बिघडलेल्या मुलासमोर हतबल झालेले... पण प्रसंगी कठोर होऊन त्याला सुनावणारे... आपण बघितलेल्या असतात मध्यरात्री ओसरीवर येऊन एकमेकींना सुख-दुःखाच्या गोष्टी सांगणाऱ्या मोठ्या वहिनी अन् मुंबईची त्यांची जाऊ - अंजली... नुसत्या बघितलेल्या नसतात, तर आपणच असतो वहिनी अन् अंजली... म्हणून मग वर्षानुवर्षं पदरांआड दडलेलं त्या बायाचं आभाळाएवढं दुःख असं त्या धरणगावातल्या चांदण्यांच्या साक्षीनं आपल्या काळजात झरू लागतं, तेव्हा डोळ्यांतल्या आसवांना खळ राहत नाही... म्हणून मग पराग अन् अभय पुन्हा बोलायला लागतात, तेव्हा आपलेच हरवलेले आत्ये-मामे-चुलतभाऊ आठवत राहतात आणि त्यांच्यासोबत केलेली दंगामस्ती... पुन्हा लहान व्हावंसं वाटतं...
'मग्न तळ्याकाठी'मधल्या स्त्रियांचं चित्रण हा स्वतंत्र लेखाचा विषय होईल. देवळात राहायला गेलेल्या मुलाच्या आठवणीनं व्याकुळ होणारी अन् ओसरीवर मध्यरात्री बसून (एरवी अजिबात ऐकू येत नसताना) त्याचा आवाज 'ऐकणारी' आजी, (नवऱ्याबरोबरचं नातं सांगताना) 'आमचं ते डिपार्टमेंट केव्हाच बंद केलंय' असं सहज सांगणारी वहिनी, नवरा अन् मुलगा या दोघांमध्ये भावनांचं सँडविच झालेली अंजलीकाकू, दहा वर्षांपूर्वी मास्तरांसोबत पळून गेलेली अन् आता परागदादाच्या करड्या धाकात कोमेजणारी रंजू... अन् सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे शिकू न दिल्यानं शिक्षणाचं स्वप्न अर्धवट राहिलेली अन् माडीवर शून्यवत होऊन बसलेली प्रभाआत्या... यातलं एकेक व्यक्तिचित्र म्हणजे एकेका कादंबरीचा ऐवज आहे. विशेष म्हणजे नाटकात या पात्रांना जेवढा अवधी मिळतो, तेवढ्यात त्यांच्या जगण्याची ही दीर्घ 'कादंबरी' आपल्याला कळतेही. हेच तर मोठ्या नाटककाराचं श्रेयस असतं....
'मग्न तळ्याकाठी' हा असा भलामोठा सामाजिक-सांस्कृतिक ऐवज आहे. यातल्या तळ्यातला उल्लेख फार सूचक आहे. दहा वर्षांपूर्वी ज्या तळ्यात अभय पोहायला शिकला, ते तळं आता गावची गटारगंगा झालंय.... ज्या स्वच्छ, निर्मळ पाण्यात निर्भयतेचा श्वास घेता येत होता, त्या पाण्याशेजारी आता असह्य दुर्गंधी सुटलीय...
समाज म्हणून तरी आपलं दुसरं काय झालंय? आपल्या समाजाचं तळंही असंच घाणीनं बरबटत अन् आटत चाललंय... ही तीव्र बोचरी भावना ही कलाकृती आपल्या मनात खोल कुठं तरी रुजवते. पण याचा अर्थ हे नाटक नकारात्मक आहे असं नाही. यात अनेक ठिकाणी विनोद आहेत, गमती आहेत, शिव्या आहेत, रांगडा रोमान्स आहे... शेवटी ग्रामीण भागातला अस्सल देशपांड्यांचा तो वाडा आहे... भले आता तो चिरेबंदी नसेल... पण अजूनही आपलं काही तरी चुकलंय या विचारात, आत्मचिंतनात मग्न आहे... शेजारच्या तळ्यासारखाच!
---
दर्जा - साडेचार स्टार
---

2 Mar 2017

ला ला लँड रिव्ह्यू

गाण्याच्या देशात प्रेमाचे गाणे...
------------------------------------


'ला ला लँड' हा सिनेमा म्हणजे गाण्याच्या देशातलं एक सुरेल प्रेमाचं गाणं आहे... प्रेमाच्या जगातलं एक अतीव देखणं चित्र आहे... या चित्रात उल्हसित करणारे चमकदार रंग आहेत... हृदयात कळ उठविणारी रंगसंगती आहे... हातात हात घेऊन म्हणायची गाणी आहेत... आणि आयुष्यात हवं ते कधीच मिळत नाही याची टोचणारी सल घेऊन जगायचं अटळ प्राक्तनही आहे...
'ला ला लँड' असा आपल्या सर्व भावनांना आतून स्पर्श करतो. म्हणूनच तो केवळ एक रोमँटिक म्युझिकल सिनेमा राहत नाही, तर त्याहूनही अधिक काही देणारी मोठी कलाकृती ठरतो. हा सिनेमा पहिल्या दृश्यापासूनच आपली पकड घेतो. लॉस एंजेलिसमधल्या एका उड्डाणपुलावर रुक्ष दुपारी ट्रॅफिक जाम झालेला आहे. अशा वेळी एका गाडीतून एक तरुणी बाहेर येते आणि त्या कंटाळवाण्या जॅमवर मात करण्यासाठी गाणं गाऊ लागते. हळूहळू सगळेच लोक गाडीतून बाहेर येतात आणि त्या पुलावर मस्त गाणी म्हणत नाचू लागतात... पाच मिनिटं नुस्ता दंगा चालू राहतो... एका क्षणी जॅम संपतो... खट्कन बटण बंद केल्यासारखे सगळे जण गाडीत बसतात आणि रांग हळूहळू पुन्हा रांगू लागते... या अप्रतिम फ्लॅशमॉबच्या स्वप्नदृश्यानं दिग्दर्शक डॅमियन शेझेल आपली कहाणी सुरू करतो. पुढं सगळं स्वप्नातलंच वाटावं असं जग आपल्यासमोर अवतरतं. खरं तर नवोदित अभिनेत्री मिया (एमा स्टोन) आणि एक स्ट्रगलर जॅझ पियानिस्ट सबॅस्टियन (रायन गॉसलिंग) यांच्यातली ही प्रेमकहाणी एरवी अगदी सर्वसामान्य वाटू शकली असती. पण शेझेलच्या हाताळणीत या सिनेमाचं यश आहे. विंटर, स्प्रिंग, समर, फॉल व पुन्हा विंटर अशा विविध ऋतूंत हा सिनेमा आपल्याला क्रमशः सैर घडवितो. त्यातही आणखी दोन पातळ्यांवर सिनेमा आपल्या समोर येत राहतो. एक पातळी असते मिया आणि सबॅस्टियन यांच्या वास्तवातल्या जगण्याची. हे जगणं फारसं काही बरं नसतं. दोघंही संघर्ष करीत असतात. वास्तवाचा कडक उन्हाळा दोघांनाही चटके देत असतो. जेव्हा दोघं पहिल्यांदा भेटतात, तेव्हाही त्यांच्यात खटकेच उडतात. पण वारंवार भेटी झाल्यानंतर त्यांच्यातलं प्रेम जागं होतं. हा स्पार्क, ही ठिणगी पडल्यानंतरचा प्रत्येक क्षण दोघांच्याही आयुष्यात एक वेगळं जग घेऊन येतो. हे दुसरं जग. दिग्दर्शकानं आपल्या दृश्यमालिकेद्वारे, त्यातल्या रंगसंगतीद्वारे, नेपथ्याद्वारे आणि अर्थातच संगीताद्वारे ही दोन जगं वेगळी केली आहेत. यातलं दोघांचं प्रेमाचं जग बघण्यात अर्थातच गंमत आहे.
प्रेमात पडलेल्या प्रत्येकाच्या कल्पनाविलासाचा जणू लसावि काढून शेझेलनं हा भाग रंगविला आहे. त्याची सुरुवात या दोघांच्या पहिल्या भेटीतील नृत्यानं होते. त्या रात्री त्या उंच टेकाडावर, खाली दूरवर लॉस एंजेलिसचे 'लक्ष दीप नगरात' पेटलेले असताना, या दोघांतही परस्पर आकर्षणाचे लक्ष दिवे पेटत जातात, आणि क्रौंच पक्ष्यांसारखे जणू 'इन सिंक' होत ती दोघं जे काही अफलातून नृत्य करतात, तो भाग अप्रतिम.
त्यापूर्वी त्या दोघांची थिएटरमधली भेट व पहिल्या न घडणाऱ्या चुंबनाची धमालही पाहण्यासारखी. सगळ्यांत कळस म्हणावा असा सिक्वेन्स म्हणजे ऑब्झर्वेटरीतला. तिथं सॅब मियाला अलगद उचलतो आणि ते बघता बघता अवकाशाच्या पोकळीत पोचतात आणि आकाशगंगांच्या साक्षीनं नृत्य करतात. प्रेमात पडलेले जीव तसेही अवकाशाच्या पोकळीत तरंगत असतात. या कविकल्पनेला दिग्दर्शकानं इथं फार सुंदर दृश्यरूप दिलंय.
नंतर तिचा अभिनेत्री होण्याचा झगडा आणि त्याचंही क्लबचं स्वप्न हा प्रवास समांतरपणे चालू राहतो. दोघंही प्रेमात पडलेले जीव दुसऱ्यातलं चांगलं ते काढून घेण्याचा प्रयत्न करत असतात, हा भाग मला फार छान वाटला. तिला त्यानं स्वतंत्र क्लब काढून मोठं व्हावंसं वाटत असतं, तर त्यालाही तिनं आणखी एक ऑडिशन द्यावी आणि तिच्यातल्या टॅलेंटला न्याय द्यावा असंच वाटत असतं. दोघांमधले प्रेमाचे क्षण साजरे होतात, तेव्हाची रंगसंगती, दोघांचे ब्राइट रंगसंगतीचे कपडे, पडद्यावर येणारी विविध चित्रं हे सगळं नेपथ्य मुळातच बघण्याजोगं आहे.
एकेक ऋतू बदलतो तसे प्रेमाचेही रंग बदलतात... दोघांत प्रेमाचा वसंत येतो, तसाच शिशिरही येतो. ती तिच्या वाटेनं निघून जाते.. हा याच्या वाटेनं... खरं तर नक्की कोणाला काय हवं असतं, त्यातून नक्की काय घडतं... हे सगळं दिग्दर्शकानं मुग्धच ठेवलं आहे. पण कदाचित बहुतेक प्रेमांमध्ये येणारं हे दुराव्याचं अटळ प्राक्तन असावं.
शेवट चटका लावणारा आहे. शेवटचं स्वप्नदृश्य आणि त्यातला गॉसलिंगचा अभिनय जीव ओवाळून टाकावा असा आहे. आत कुठं तरी तुटल्याशिवाय राहत नाही, एवढं नक्की.
एमाला तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळालाच आहे. काय अप्रतिम काम केलंय तिनं! आणि तिचे डोळे... अफाट! त्या डोळ्यांत भावनांचा महासागर दिसतो. काय काय व्यक्त केलंय तिनं त्या निळ्या डोळ्यांतून... एमाला हॅट्स ऑफ! आणि अर्थातच रायन गॉसलिंग... हा देखणा अभिनेता कामही किती सहज, सुंदर करतो! या भूमिकेत त्याच्याशिवाय अन्य कुणाचा विचारच करता येत नाही, हेच त्याचं यश आहे. (वास्तविक हा रोल आधी दुसरा अभिनेता करणार होता... पण नशीब, शेवटी गॉसलिंगनंच तो केला...)
सिनेमाचं संगीत हा त्याचा प्राण आहे, हे म्हटलं तर काहीसं घिसंपिटं वाक्य. पण या सिनेमाच्या बाबतीत ते अगदी शब्दशः लागू होतं. सुरुवातीच्या त्या ट्रॅफिक जॅमच्या गाण्यापासून जस्टिन हर्विट्झचं संगीत आपल्या मनाचा ठाव घेतं. 'अनदर डे इन द सन', 'सिटी ऑफ स्टार्स', 'ए लव्हली नाइट', 'स्टार्ट ए फायर' अशी सगळीच गाणी, ट्रॅक मस्त आहेत. त्यातही 'सिटी ऑफ स्टार्स' सगळ्यांत छान अन् लोकप्रिय!
शेझेलचा हा प्रेमाच्या देशात नेणारा सांगीतिक प्रवास सर्वांनी अनुभवावा आणि नंतर प्रेमानं गाणं गुणगुणावं...

दर्जा - चार स्टार


---