22 Dec 2017

टायगर जिंदा है - रिव्ह्यू

वाघरू वांड झालंय...
-------------------------
सलमानचा नवा पिक्चर म्हणजे फुल टाइमपास असंच समीकरण गेल्या आठ-दहा वर्षांत जमलंय. विशेषतः 'वाँटेड'पासून सलमानची ही दुसरी (की तिसरी?) जी इनिंग सुरू झालीय ती बॉक्स ऑफिसवर आणि सर्वसामान्य भारतीय प्रेक्षकांवर चांगलीच गारूड करून आहे. सलमानच्या या लौकिकाला बट्टा लागला, तो याच वर्षी ईदला आलेल्या 'ट्युबलाइट' या सिनेमामुळं. हा सिनेमा अगदीच पडेल होता म्हणे! (म्हणे, कारण मी तो सिनेमा अजूनही पाहिलेला नाही... अगदी 'अॅमेझॉन'वर आलाय, तरी सुरुवात फक्त बघितली... पुढं बघवेना...) तर ते असो. सलमानच्या गेल्या आठ-दहा वर्षांतल्या सुपरहिट सिनेमांत २०१२ मध्ये आलेल्या 'एक था टायगर'चाही समावेश होता. आता याच सिनेमाचा पुढचा भाग (किंवा टायगर फ्रँचायजीचा पुढचा भाग म्हणू या...) 'टायगर जिंदा है' या नावानं आता प्रदर्शित झालाय. पहिल्या भागापेक्षा हा भाग अधिक चांगला जमून आला आहे आणि हा सिनेमा 'बॉक्स ऑफिस'वर फुल्ल कल्ला करणार, याविषयी माझ्या मनात तरी काही शंका नाही.
हा भाग दिग्दर्शित केलाय अब्बास अली जफरनं. 'सुलतान'पासून सलमानचे आणि त्याचे सूर जुळलेले दिसतात. त्यामुळंच 'एक था टायगर'चा यशस्वी आणि 'ट्युबलाइट'चा अयशस्वी दिग्दर्शक कबीर खान याला सोडून सलमाननं 'टायगर'चा हा पुढचा भाग अली अब्बास जफरकडं सोपवलेला दिसतो.
... आणि अली अब्बास जफरनं सुमारे १६१ मिनिटांचा हा थरारक खेळ चांगलाच रंगवला आहे, यात वाद नाही. हा सिनेमा पाहताना आपल्याला एक मिनिटही कंटाळा येत नाही, हे याचं यश आहे. सलमान सध्या ज्या पठडीतील सिनेमा करतोय तो आता हॉलिवूडच्या ज्या काही नामांकित फ्रँचायजी आहेत त्या डोळ्यांसमोर ठेवून करतोय, असं दिसतं. 'टायगर'च्या पहिल्या भागात त्याला 'रॉ'चा एजंट दाखवून आंतरराष्ट्रीय उचापतींना पूर्ण मोकळा वाव देण्यात आला होता. आता पुढच्या भागात अधिक मोठा आणि खिळवून ठेवणारा कॅनव्हास हवा, म्हणून इथं इराक आणि 'आयएस'चं (सिनेमातलं नाव - आयएससी) नेपथ्य घ्यावं लागलं आहे. इराकमधून काही भारतीय नर्सची सुटका करण्यात आल्याच्या सत्य घटनेचा संदर्भही या सिनेमाला आहे. मात्र, तो तेवढाच. बाकी सर्व सिनेमा हा सलमानची (अन् कतरिनाचीही) देमार फायटिंग, अॅक्शन आणि अॅक्शन दाखवत राहतो. असं असलं, तरी हा सिनेमा कंटाळवाणा होत नाही, याचं कारण प्रॉडक्शन डिझाइनवर हिंदी सिनेमा करीत असलेला खर्च. परदेशी लोकेशन्स नवी नाहीत, पण इराक, सीरियासारखी भारतीय प्रेक्षकांना तुलनेनं अनोळखी लोकेशन्स (प्रत्यक्षात शूटिंग मोरोक्को व अबुधाबी), परदेशी स्टंटमन्सची सफाईदार अॅक्शन दृश्यं, सिनेमाला तुफान गती देणारं सफाईदार संकलन आणि अगदी फिल्मी असला, तरी कन्व्हिन्सिंग वाटेल असा घटनाक्रम... यामुळं सिनेमा अगदीच हास्यास्पद ठरत नाही. किंबहुना आपण सलमानचा सिनेमा पाहतोय हे लक्षात ठेवून, एकदा डोकं बाजूला ठेवलं की सिनेमा इंटरेस्टिंगही वाटू शकतो.
सलमानचा सिनेमा हल्ली 'पोलिटिकली करेक्ट'ही होऊ लागला आहे. 'बजरंगी भाईजान'मध्येही भारत-पाक प्रेमाचं तुणतुणं वाजवण्यात आलं होतं. इथंही सल्लूभाईचं पाकप्रेम स्पष्ट दिसून येतंय. या सिनेमात भारतीय नर्सेससोबत पाकिस्तानीही नर्सेस तिथं अडकल्याचं दाखवून, रॉ आणि आयएसआयचे एजंट मिळून ही कामगिरी पार पाडतात, असा अचाट आणि फक्त सलमानच्याच सिनेमात शोभेल असा कल्पनाविलास दाखवून, दिग्दर्शक व सलमाननं कदाचित पाकिस्तानी मार्केटचीही तजवीज केली आहे. यातली नायिका झोया (कतरिना) ही मागच्या भागात आयएसआयची एजंट असल्याचं दाखवलं आहे, त्यामुळं तोही धागा पुढं नेण्यास या सिनेमानं मदतच केली आहे. बाकी शेवटी तिरंग्यासोबत पाकचा झेंडाही त्या बसवर फडकावून सलमाननं पुढं-मागं 'निशान-ए-पाकिस्तान' किताबही पदरी पाडून घेण्याची सोय केलेली दिसते. (अर्थात, सलमान हा इंटलेक्चुअल वगैरे म्हणून गणला जात नसल्यानं त्याच्या या वरकरणी चांगल्या भावनेचं भारतीय प्रेक्षक स्वागतही करतील. सलमान परवडला; पण शाहरुख आणि आमीर खानच्या जादा हुशारीने चाललेल्या वेगवेगळ्या 'शहाणपणां'ची तिडीक येते... तर ते असो.)
मूळ सिनेमाकडं येऊ या... तर या सिनेमात आपल्या नायकाला शेवटी उघडं होण्याची संधी देऊन तमाम सलमानप्रेमींचा दुवा दिग्दर्शकानं घेतला आहे. त्या तुलनेत कतरिनाच्या चाहत्यांचा रसभंगच होण्याची शक्यता आहे. या सिनेमात आपला नायक पुढं दहशतवाद्यांच्या रूपातील लांडग्यांशीच जणू नंतर फाइट करणार असल्यानं सुरुवातीलाच प्रत्यक्षातील खऱ्याखुऱ्या लांडग्यांची लढाई दाखवून दिग्दर्शकानं प्रतीकात्मतेचा षटकार मारला आहे. गिरीश कार्नाड काकांच्या नाकात उगाचच दोन नळ्या घातल्या आहेत. ते सिनेमाभर तसे वावरत असल्यानं इरिटेटिंग वाटतं. शेंबडा माणूस पाहत असल्याचा भास होतो. एवढ्या चांगल्या नटाला का ही शिक्षा? बहुतेक पुढच्या भागात हे शेणॉयसाहेब (कार्नाड काकांच्या पात्राचं सिनेमातलं नाव) फोटोतच लटकलेले दिसतील, असा आपला माझा अंदाज आहे.
परेश रावल हा या सिनेमातलं नवं आणि सरप्राइजिंग पॅकेज आहे. तो आहे म्हणून या सिनेमाच्या सुसह्यतेत वाढ झाली आहे, यात शंका नाही. फिरदौस नावाचं एक अतरंगी पात्र या माणसानं असं भन्नाट रंगवलं आहे, की बस्स... मजा आ गया! सज्जाद दिलफरोझ नावाचा इराणी अभिनेता यात अबू उस्मानच्या भूमिकेत आहे. हा अबू उस्मान म्हणजे अर्थातच 'आयएससी'चा प्रमुख. भारतीय नर्स ज्या हॉस्पिटलमध्ये असतात, तेथेच हा तळ ठोकतो. त्याला सोयिस्कररीत्या हिंदी येत असतं, कारण तो लहानपणी दिल्लीत वाढलेला असतो वगैरे.
सलमान खान या सिनेमात बऱ्यापैकी दाढीत आणि वजन वाढलेला असा दिसला आहे. अर्थात शेवटच्या उघड्याबंबू शॉटला तो सिक्स पॅक आदी दाखवून त्याच्या फॅन्सना खूश करतो, यात शंका नाही. बावन्न वर्षांचा हा अभिनेता अजून किती तरी वर्षे अशाच भूमिका करू शकेल, अशी खात्री हा सिनेमा पाहून वाटते. कतरिनाला फार काही वाव नाही. मात्र, अबू बगदावीला आणि त्याच्या टोळक्याला ती आणि सर्व बायका मिळून मारतात तो प्रसंग मस्त जमून आला आहे. कतरिनाने स्टंट्स जबर केले आहेत.
यातलं 'स्वॅग से करेंगे सब का स्वागत' हे गाणं यापूर्वीच हिट झालं आहे. ते एंड स्क्रोलला येतं.
थोडक्यात, ख्रिसमसच्या सुट्ट्या एंजॉय करायच्या असतील, तर डोकं बाजूला ठेवून हा देमार, गल्लाभरू सिनेमा पाहायला काहीच हरकत नाही.
 ---

दर्जा - तीन स्टार
---

No comments:

Post a Comment