31 Aug 2017

'ऐसी अक्षरे'साठी लेख

वृत्तपत्र विद्यापीठ
---------------


पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात शिकवलं गेलेलं एक वाक्य कायमचं लक्षात राहिलंय. वर्तमानपत्रात छापून येणाऱ्या मजकुराची एक व्याख्या 'घाईत लिहिलेलं साहित्य' (Liturature in hurry) अशी केलेली आहे. वृत्तपत्रांमध्ये काम करणाऱ्यांना कायमच वेळेच्या मर्यादेत, घाईत काम करावं लागतं. या 'डेडलाइन'ची टांगती तलवार सदैव डोक्यावर असते. विशिष्ट वेळेत, विशिष्ट शब्दांत आणि विशिष्ट गरजा पूर्ण करणारा मजकूर हुकमी पद्धतीनं लिहिता यावा लागतो. पत्रकार होण्याची ती जणू पूर्वअटच असते. त्यामुळंच भाषेवर पकड असणाऱ्यांना, चांगली शब्दसंपदा असणाऱ्यांना आणि काळ-वेळ-संदर्भाचं अचूक भान असणाऱ्यांना वृत्तपत्रांच्या जगात मान असतो; मागणी असते. 
मी गेल्या वीस वर्षांपासून या व्यवसायात आहे. लिहिण्याची आवड हाच व्यवसाय झाला. असं होणं हे दोन गोष्टींसाठी फार भाग्याचं मानायला हवं. एक तर तुम्हाला तुमच्या या छंदासाठी पगार मिळतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचं काम हे काम वाटत नाही. काम हे जेव्हा 'काम' वाटतं, तेव्हा त्या कामाचं ओझं वाटू लागतं. माझं सुदैवानं तसं झालं नाही; आणि अर्थात पत्रकारितेत कोणत्याही कामाचं ओझं वाटून चालत नाही. वेळप्रसंगी प्रूफरीडरपासून ते संपादकापर्यंतची सर्व कामं एकाच माणसाला करावी लागू शकतात, हेही एक कारण आहेच. माझ्या या दोन दशकांहून अधिक झालेल्या कारकिर्दीत पुष्कळ वेळा हे सगळं करावं लागलं आहे. 
सुदैवानं 'लोकसत्ता', मग 'सकाळ' आणि आता 'महाराष्ट्र टाइम्स' या महाराष्ट्रातल्या तिन्ही आघाडीच्या वृत्तपत्रांत काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे. तर सांगायचा मुद्दा हा, की बहुतेक पत्रकारांना प्रूफरीडर ते संपादक ही सगळी कामं कधी ना कधी करावीच लागतात. पत्रकारांच्या कामकाजाचे प्रामुख्यानं दोन भाग पडतात. एक बातमीदारीचा, म्हणजे प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन बातम्या आणण्याचा आणि दुसरा संपादनाचा, म्हणजे टेबलवर बसून बातमीवर संस्कार करण्याचा! मी दुसऱ्या कामात जास्त रमलो किंवा ते काम मला अधिक चांगलं जमत असावं म्हणून दिलं गेलं, असं म्हणता येईल. पण बातमीदारीही केलीच. प्रत्येक उपसंपादकाला उमेदवारीच्या काळात बातमीदारी करावीच लागते. मुळात वृत्तपत्रांत कामकाजाचा भाग म्हणून हे दोन वेगळे विभाग केलेले असतात. प्रत्यक्ष काम करताना एवढी कट्टर विभागणी नसते. उपसंपादक हाही बातमी आणू शकतोच. तर त्या पद्धतीनं मीही बातमीदारी केली. सुरुवातीला उमेदवारी म्हणून केली आणि नंतर आपल्या विशेष आवडीच्या, म्हणजे माझ्या बाबतीत, साहित्य व सिनेमा या दोन गोष्टींच्या संदर्भात आवर्जून बातमीदारी केली...
माझी सुरुवात नगरला 'लोकसत्ता'मधून मुद्रितशोधक म्हणून झाली असली, तरी पुण्यात एक सप्टेंबर १९९७ पासून मी 'सकाळ'मध्ये रुजू झालो तेव्हापासून खऱ्या अर्थानं माझी पत्रकारिता सुरू झाली असं म्हणता येईल. तिथं उपसंपादकीचे, बातमीदारीचे धडे गिरवता आले. अनेक दिग्गज पत्रकारांच्या अनुभवांचा आम्हाला फायदा मिळाला. त्यांच्याकडून बरंच काही शिकता आलं. आम्ही चार-पाच जण ट्रेनी असताना आम्हाला राजीव साबडे सरांच्या ताब्यात देण्यात आलं. सहा महिन्यांत त्यांनी आमच्याकडून बातमीदारीचं, उपसंपादकीचं, ग्रंथालय शास्त्राचं आणि क्रीडा बातमीदारीचं तंत्र घोटून घेतलं. हा शिक्षणाचा काळ मोठा विलक्षण होता. अनेक नव्या गोष्टी प्रथमच माहिती झाल्या. अर्थात एक आहे. आपल्या स्वतःच्या बालसुलभ उत्साहाची, नवं शिकण्याच्या तयारीची आणि कुतूहलाची जोड त्याला पाहिजे. मी तेव्हा २१-२२ वर्षांचा तरुण होतो आणि या सगळ्या गोष्टी माझ्या अंगात होत्या. त्याचा पुढं फार उपयोग झाला. जन्मजात कुतूहल असल्याशिवाय पत्रकारितेत मजा नाही. मी 'सकाळ'मध्ये रुजू झाल्याच्या पहिल्याच दिवशी ग्रंथालयात जाऊन माणूस चंद्रावर उतरला त्या दिवशीचा 'सकाळ'चा अंक मला दाखवा, अशी विचारणा केली होती. कारण ती बातमी तेव्हा कशी दिली होती, हे जाणून घेण्याची मला अत्यंत उत्सुकता होती. तेव्हाचे ग्रंथपाल सुरेश जाधव सर माझं हे कुतूहल पाहून अत्यंत खूश झाले आणि त्यांनी जुनी फाइल काढून मला केवळ ती बातमीच दाखविली असं नाही, तर त्या बातमीच्या वेळी तेव्हा घेतल्या गेलेल्या परिश्रमांचीही माहिती दिली. 'सकाळ'च्या परुळेकर शैलीनुसार 'माणूस चंद्रावर उतरला' एवढंच, पण थेट बातमी सांगणारं शीर्षक होतं. हे शीर्षक अत्यंत मोठ्या टायपात होतं, हे उघडच दिसत होतं. तेव्हा एवढ्या मोठ्या अक्षरांचा ब्लॉक नव्हता. तर तो मुद्दाम तयार करवून घेऊन मग हे शीर्षक वापरण्यात आलं होतं. माझ्या मते, ही विसाव्या शतकातील पहिल्या क्रमांकाची बातमी होती आणि तिची ट्रीटमेंट आपण पाहायलाच हवी होती.
कान व डोळे उघडे ठेवून वावरलं की बातम्या मिळतात, असं आम्हाला सांगितलं जायचं. नुसती बातमी मिळवून भागायचं नाही, तर त्यातील सर्व माहिती अचूक असेल, याची खातरजमा करावी लागायची. यासाठी संबंधित व्यक्तींना अनेकदा फोन करावे लागत किंवा प्रत्यक्ष जाऊन भेटावं लागे. मी तेव्हा सायकलवर सर्व पुणे शहरात फिरून अनेकदा ही माहिती गोळा केली आहे. तेव्हा मोबाइल नुकतेच आले होते; पण सर्रास वापर नव्हता. माणसांना प्रत्यक्ष जाऊन भेटण्यावरच अधिक भर असायचा. यामुळं एक फायदा असा झाला, की पुण्यातल्या त्या काळातल्या सर्व महत्त्वाच्या व्यक्तींना त्यांच्या निवासस्थानी वा कार्यालयांत भेटता आलं, बोलता आलं. बातमीदारीच्या निमित्तानं पोलिस आयुक्तालयापासून ते एनडीएच्या सुदान ब्लॉकपर्यंत आणि वेदशास्त्रोत्तेजक सभागृहापासून कासेवाडी झोपडपट्टीपर्यंत अनेक ठिकाणी फिरावं लागायचं. स्वतः या सर्व ठिकाणी जाऊन तुम्ही एकदा बातमीदारी केलीत, की मग उपसंपादक म्हणून काम करणं पुढं सोपं जातं. शहरातील महत्त्वाच्या संस्था, व्यक्तींची नावं तुम्हाला माहिती होतात. नावांच्या मागचे-पुढचे संदर्भ कळू लागतात. मार्केट यार्डमध्ये सकाळी जाऊन भाज्यांचे भाव आणणे हा ट्रेनी बातमीदारांच्या कामाचा एक अविभाज्य भाग असतो. अनेकांना हे काम कंटाळवाणं वाटतं. मी मात्र फार उत्साहानं मार्केट यार्डात जायचो. तिथं विलास भुजबळांना भेटायचो. ते सगळी माहिती सांगायचे. (मला वाटतं, अजूनही तेच ही सगळी माहिती देत असतात.) तत्कालीन पुणे विद्यापीठ, महापालिका, कँटोन्मेंट बोर्ड, रेल्वे स्टेशन, सेंट्रल बिल्डिंग, जिल्हाधिकारी कार्यालय, झेडपी, स्वारगेट व शिवाजीनगर बसस्थानकं, मंडई, वेधशाळा, आकाशवाणी व दूरदर्शन, मराठा चेंबर, कॅम्प, भारत इतिहास संशोधन मंडळ, नव्या पेठेतील पत्रकार भवन आणि महत्त्वाचं म्हणजे वैकुंठ... ही बातम्या मिळण्याची तेव्हाची प्रमुख ठिकाणं होती. अजूनही हीच आहेत. काहींची नव्यानं फक्त भर पडली आहे.
'वैकुंठ'वरून आठवलं. या प्रशिक्षणाच्या काळात एक काम मी फार सातत्यानं केल्याचं माझ्या लक्षात आहे. एखादी मोठी व्यक्ती गेली, की तिचं अल्पचरित्र लिहायचं, हे ते काम! 'सकाळ'चं संदर्भ ग्रंथालय उत्कृष्ट आहे. त्यामुळं एखाद्या व्यक्तीचं अल्पचरित्र लिहायचं झाल्यास ग्रंथालयातून त्या व्यक्तीचं पाकीट आणायचं. त्यात त्या व्यक्तीबद्दल छापून आलेली ओळ न् ओळ जतन करून ठेवलेली असायची. ज्यांचं अल्पचरित्र वृत्तपत्रं छापतात ती मुळातच मोठी माणसं असल्यानं त्यांच्याविषयीची भरपूर माहिती वृृृत्तपत्रांकडं असतेच. तेव्हा 'गुगल'पेक्षा ग्रंथालयांचा वापर करण्याची पद्धत होती. तर मी सहा महिन्यांच्या काळात अशी चार-पाच तरी मोठ्या व्यक्तींची चरित्रं लिहिली. 
त्यात गोनीदा, यशवंत दत्त, मालती पांडे, अनंतराव कुलकर्णी आदींचा समावेश होता. याशिवाय अनेक मोठ्या लोकांशी बोलण्याची, त्यांची मुलाखत घेण्याची वेळ येई. तेव्हा ग्रंथालयात जाऊन त्या व्यक्तीविषयीची सर्व माहिती वाचून मगच तिला भेटायला जायचं, अशी आम्हाला सक्त ताकीद होती. त्यामुळं अज्ञानातून हसं होण्याचे प्रसंग कधीच आले नाहीत. किंबहुना याला आपल्याविषयी नीट माहिती आहे, हे कळलं की ती समोरची व्यक्ती खुलून अधिक मोकळेपणाने बोलत असे. लिहिताना साधी-सोपी, सरळ वाक्यं लिहावीत, याचा संस्कार होता. (हा लेख वाचतानाही वाचकांना ते जाणवेल.) वाचकाला कुठलीही अडचण न येता, थेट माहिती कळली पाहिजे, ही शिकवण होती. बातमीच्या सुरुवातीला लिहिल्या जाणाऱ्या मजकुराला 'लीड' असं म्हणतात. हा 'लीड' तीस शब्दांहून अधिक मोठा असता कामा नये, असा दंडक होता. याशिवाय बातमीच्या सुरुवातीलाच संक्षिप्त रूपं न वापरणं (भाजप न म्हणता पहिल्यांदा भारतीय जनता पक्ष असं पूर्ण लिहायचं), व्यक्तीचं पूर्ण नाव (म्हणजे सौ. टिळक असं न लिहिता, मुक्ता टिळक असं पूर्ण लिहायचं) लिहिणं, शक्यतो मराठीच आद्याक्षरं वापरणं (लोकप्रिय नावं - उदा. एस. एम. जोशी हे अर्थात अपवाद), इंग्रजी शब्दांचं अनेकवचन न लिहिणं (बसेस किंवा डॉक्टर्स न लिहिता चारशे बस किंवा शहरातले डॉक्टर असंच लिहायचं...) अशा कित्येक बारीक-सारीक गोष्टी शिकायला मिळाल्या. आजही लिखाणावर तोच संस्कार कायम आहे. आपला अंक विद्यापीठाचे कुलगुरूही वाचणार आहेत आणि स्टेशनवरचा हमालही वाचणार आहे; त्यामुळं दोघांनाही कळेल असं लिहा, असं आम्हाला सांगितलं जायचं. ते अगदी पटण्याजोगंच आहे.
पुण्यात पत्रकारिता करताना काही काही गोष्टी नीट लक्षात ठेवाव्या लागतात. इंग्रजीत ज्याला 'होली काऊ' म्हणतात, अशी बातम्यांची काही ठिकाणं वा घटना असतात. उदा. पुण्यातल्या गणपतींचं व विसर्जन मिरवणुकीचं वार्तांकन, दुसरी गोष्ट म्हणजे पुण्यात येणाऱ्या दोन्ही पालख्या व त्यांचे मुक्काम... आणि तिसरी गोष्ट म्हणजे खुद्द पुणे. या तिन्ही गोष्टींविषयी पुणेकर वाचक कमालीचा हळवा आणि संवेदनशील आहे. तेव्हा त्याला न दुखावता, या घटनांचं वार्तांकन करावं लागतं. त्यामुळं वाचकांच्या लक्षात आलं असेल, की या सर्व बाबतींत पुण्यातील वृत्तपत्रं (विशेषतः मराठी) एकमतानं, एकाच पद्धतीचं वृत्त देताना दिसतात. त्यात फार काही बदल करणं त्यांना शक्य झालेलं नाही. अगदी गेल्या तीन-चार वर्षांत मात्र थोडासा बदल होताना निश्चित दिसतो आहे. याखेरीज काही व्यक्ती, समाज व संस्थांविषयीही पुणेकर वाचक हळवे आहेत. विशेषतः पुण्याच्या अभिमानाची प्रतीकं मानल्या जाणाऱ्या व्यक्ती व संस्थांविषयी! त्यांची नावं इथं लिहिण्याची गरज नाही; आपल्यापैकी अनेकांनी ती सहज लक्षात येतील. 
या सर्व अनुभवाची शिदोरी घेऊन आपण पुण्याबाहेर किंवा परराज्यांत वा परदेशात वार्तांकन करायला जातो, तेव्हा निश्चितच मग आपल्यावर एक जास्तीची जबाबदारी येऊन पडते. सुदैवानं मला सुरुवातीपासून असं बाहेर जाऊन वार्तांकन करायची संधी मिळत गेली. एखादी सांस्कृतिक बातमी थोड्या ललित अंगानं, शैलीदार शब्दांनी नटवून लिहिण्याची मला आवड होती. थोडं फार जमत होतं तसं... मग तशा बातम्या लिहिणं ही तुमची जबाबदारीच होऊन जाते. या बातम्या तेव्हा मजकूर इटॅलिक करून वापरल्या जात. शिवाय अशा बातम्यांमध्ये वाक्यांनंतर पूर्णविराम न देता, तीन टिंबं (...) देण्याची पद्धत असे. मला अनेक सहकारी 'तीन टिंबांची बातमी लिहिणारा...' असं चिडवत असत. पण प्रत्येक बातमी अशी लिहायची नसते, हे मला अर्थातच कळत होतं. 
माझ्या या लिखाणामुळं असेल, लवकरच मला साहित्य संमेलनाचं वार्तांकन करायची संधी मिळाली. ऑफिसमधल्या ज्येष्ठ सहकाऱ्यांसोबत मी (१९९९ मध्ये) बेळगाव साहित्य संमेलनाला गेलो. प्रवास करताना उघड्या डोळ्यांनी करायचा, नवा प्रदेश डोळ्यांत साठवून ठेवायचा, ही माझी पूर्वीपासूनची आवड. मग वार्तांकनाला बाहेर जायला लागलो, तेव्हा या आवडीचा फार उपयोग झाला. मला प्रवासात झोप येत नाही आणि फार लांबचा प्रवास नसेल तर दिवसाच प्रवास करणं मला आवडतं. त्यायोगे ज्या भागात मी प्रथमच चाललो असेन तो भाग नीट पाहता येतो. इंग्रजीत ज्याला 'Terrain' म्हणतात, तो भूभाग पाहण्यात मला फार रस असतो. हा भूभाग पाहिल्यानंतर त्या परिसराविषयी किती तरी गोष्टी न सांगताच समजतात. तिथली माणसंही समजायला लागतात. एखादा भाग डोंगराळ आहे, की सखल आहे, पठारावर आहे की समुद्रकिनारी आहे, समुद्रसपाटीपासून साधारणतः किती उंचीवर आहे, तिथं कोणकोणत्या वाहतुकीच्या सोयी आहेत, तिथलं हवापाणी कसं आहे या साऱ्या गोष्टी जाणून घेण्यात मला रस असतो. याचं कारण आपण तिथं जे काही वार्तांकन करायला चाललेलो असतो, ती घटना वा प्रसंग काही निर्वात पोकळीत घडत नसतात. या साऱ्या सभोवतालाचा त्यावर कळत-नकळत परिणाम होत असतो. त्यातून त्या भागात कधीच न गेलेल्या वाचकाला आपण त्या भागाचा 'आँखो देखा हाल' सांगू शकतो आणि त्यामुळं वार्तांकनाचं मूल्य निश्चितच वाढतं. बेळगावला गेल्या गेल्या लक्षात आलं ते तिथल्या हवेचं वेगळेपण. एवढी थंड, आल्हाददायक हवा ऐन एप्रिल महिन्यात तिथं जाणवत होती. मग त्याचा नकळत उल्लेख किंवा परिणाम त्या बातम्या लिहिण्यावर होऊ लागला. बेळगावात कायम धगधगणारा मराठी-कन्नड वाद, त्या पार्श्वभूमीवर य. दि. फडके संमेलनाध्यक्ष असणं, तिथल्या मराठी शाळा, संमेलनाच्या निमित्तानं गावातून मिळणारा प्रतिसाद या सगळ्या गोष्टी संमेलनाच्या वार्तांकनात आपसूक येत गेल्या. त्यामुळंच तिथल्या कुंद्यासारखंच हे वार्तांकनही चांगलं जमून गेलं. पुढं अनेक साहित्य संमेलनांना उपस्थित राहून वार्तांकन करण्याचा योग आला. बहुतेक ठिकाणी पहिल्या दिवशी त्या गावातून निघणाऱ्या ग्रंथदिंडीतच संमेलनाचा रागरंग समजून यायचा. याचं कारण ही दिंडी म्हणजे त्या गावानं संमेलनाला नेमका कसा प्रतिसाद दिलाय हे सांगणारी एक लिटमस टेस्टच असायची किंवा असते.  
नंतर लगेचच तमिळनाडूत विधानसभा निवडणुकीचं वार्तांकन करायला जाण्याचा योग आला. एवढ्या लांबच्या राज्यात असं वार्तांकन करायला जायची ही माझी पहिलीच वेळ होती. त्याही वेळी ग्रंथालयात जाऊन त्या राज्याचा भौगोलिक-सामाजिक अभ्यास करणं, गेल्या चार-पाच महिन्यांतील घडामोडींशी परिचय करून घेणं या गोष्टी केल्या. तमिळनाडूत भाषेचा प्रश्न येणार, हे माहिती होतं. ट्रेनमध्ये मला एक तमिळी कुटुंब भेटलं. त्यांच्याशी परिचय झाल्यानंतर त्या कुटुंबात असलेल्या दहावीतल्या एका मुलीकडून मी चार-पाच वाक्यं तमिळमध्ये लिहून घेतली आणि पाठ करून टाकली. 'नमस्कार, मी अमुकतमुक.. महाराष्ट्रातून निवडणुकीचं वार्तांकन करायला आलो आहे' इ. प्रकारची ती चार-पाच  वाक्यं होती. त्यातलं 'येनक्कं तमिल थेरियादं' (मला तमिळ येत नाही) एवढं एकच वाक्य आता लक्षात आहे. गंमत म्हणजे मी हे वाक्य तमिळमधून म्हणत असल्यानं तिकडं सगळे (उदा. रिक्षावाले) हसायचे आणि 'थेरियादं?' (येत नाही काय?) म्हणून माझीच फिरकी घ्यायचे. पण हा एक अनुभवच होता. मी गेलो होतो २००१ च्या ऐन रणरणत्या मे महिन्यात. माझं अंग तिकडं भाजून निघालं. मात्र नवा प्रदेश, नवे लोक, नवी भाषा यांचं आकर्षण जबरदस्त होतं. माझ्या पहिल्या बातमीत अर्थातच तापलेल्या चेन्नईचा उल्लेख होता. जयललिता यांचा वेदनियलम हा प्रासादवजा बंगलाही तेव्हाच पाहिला. त्यांच्या 'जया टीव्ही'च्या ऑफिसात गेलो. द्रमुकच्या ऑफिसात गेलो. मी तेव्हा २५-२६ वर्षांचा होतो. महाराष्ट्रातील मराठी वृत्तपत्राचा प्रतिनिधी एवढ्या लांब तमिळनाडूची विधानसभा कव्हर करायला आलाय, याचंच त्या लोकांना भारी आश्चर्य वाटायचं. त्यामुळं मदतही खूप मिळायची. स्थानिक पत्रकारांनी तर खूपच मदत केली. आमचे एन. सत्यमूर्ती नावाचे प्रतिनिधीही तिथं होते. त्यांनीही बऱ्याच टिप्स दिल्या. यामुळं तिथलं वातावरण बऱ्यापैकी टिपण्यात मी यशस्वी झालो, असं वाटतं. प्रत्येक ठिकाणी टिपिकल राजकीय बातम्या किंवा सभांच्या बातम्या देण्यापेक्षा वेगळं काही दिसतंय का हे पाहत गेलो. चेन्नईच्या एका उपनगरात करुणानिधींच्या भिंतीवरील चित्रासमोरच तेथील बायकांची सार्वजनिक नळावर पाण्यासाठी लांबच लांब रांग लागली होती. चेन्नईत तेव्हा पाण्याचा फारच प्रॉब्लेम होता. मी तो फोटो आणि तिथल्या पाण्याच्या दुर्भिक्ष्याचीच बातमी करून पाठविली होती. रजनीकांत व एकूणच सिनेमांचं तिथल्या लोकांचं वेड, अत्यंत स्वस्त खाणं-पिणं आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यांचाही नकळत उल्लेख बातम्यांमध्ये येत असे.
मी तमिळनाडूतून परत आल्यावर सहाच महिन्यांत दिल्लीत संसदेवर अतिरेक्यांनी हल्ला केला. या घटनेत १२-१३ पोलिस कर्मचारी व निमलष्करी दलाचे अधिकारी मरण पावले होते. या घटनेला २००२ मध्ये एक वर्ष पूर्ण होत असताना, या पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या नातेवाइकांना मी भेटून यावं आणि त्याची एक स्टोरी करावी असं मला आमचे तेव्हाचे संपादक अनंत दीक्षित यांनी सांगितलं. त्यानुसार नोव्हेंबर २००२ मध्ये मी दिल्ली, हरियाना, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांत जाऊन संबंधित जवान व कर्मचाऱ्यांच्या घरच्यांना भेटून आलो. हा अतिशय विलक्षण आणि हृद्य अनुभव होता. किंबहुना ही माझी आत्तापर्यंत केलेली सर्वोत्तम असाइनमेंट होती, असं वाटतं. या वार्तांकनासाठी विविध ठिकाणी फिरावं लागलं. रिक्षा, बस, ट्रेन, सिक्स सीटर, ट्रॅक्टर, टू-व्हीलर आणि पायी अशा सर्व वाहतुकीच्या साधनांचा वापर करून मला त्या त्या ठिकाणी पोचावं लागलं. मात्र, या जवानांच्या घरी झालेलं स्वागत आणि त्यांनी व्यक्त केलेला जिव्हाळा मी कधीच विसरू शकत नाही. जगदीशकुमार यादव या शहीद अधिकाऱ्याचं कुटुंब राजस्थानातील 'नीम का थाना' इथं राहत होतं. मी दिल्लीवरून बसनं चार तासांचा प्रवास करून त्यांच्या घरी गेलो. जगदीशकुमार यांची तिशीतही नसलेली पत्नी, दोन छोटी मुलं आणि जगदीशकुमार यांचे आई-वडील तिथं राहत होते. त्या कुटुंबाला मी तिथं पोचल्याचं पाहून झालेला आनंद व आश्चर्य मी आजही विसरू शकत नाही. अत्यंत भावनिक असा तो क्षण होता. 'देश माझ्या मुलाला विसरला नाही,' हे त्यांच्या वडिलांचे उद्-गार होते. मला निघायला रात्र झाली, तर ते आजोबा मला तिथंच राहण्याचा आग्रह करीत होते. मी खूप निग्रहानं निघालो, तेव्हा जेवण केल्याशिवाय मात्र त्यांनी सोडलं नाही. हे असे क्षण कायमचे लक्षात राहणारे असतात. पत्रकारितेच्या रोजच्या धबगड्यात फार आत्मिक समाधान देणारे असतात. असे क्षण जगून लिहिलेली बातमी किंवा लेख वाचकांच्या हृदयाला भिडल्याशिवाय राहत नाही, असा माझा अनुभव आहे. 
अशा साहित्याला मग कुणी 'घाईत लिहिलेलं साहित्य' वा रद्दी म्हटलं, तरी माझ्या लेखी तो अजरामर असा दस्तावेज आहे.

---
(पूर्वप्रसिद्धी - ऐसी अक्षरे जून-जुलै १७ अंक)

8 comments:

  1. तुमचं कॉफीशॉप हे सदर मला आवडायचं. अलीकडेच लिहिलेला 'रसभंग करणारे प्रेक्षक' या विषयावरचा लेख वाचताना तर आपल्याच भावना मांडल्या आहेत असं वाटत होतं. हा लेखही मनापासून आवडला. पत्रकरितेविषयी मला खूप आकर्षण आहे आणि असं काही वाचलं की ते अजून वाढतंच 😊
    लिखते रहो !!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद.आपलं पूर्ण नाव लिहा.

      Delete
  2. सर,नवोदित पत्रकारांना असे अनुभव क्वचितच वाचायला मिळतात. मागे एकदा तुमचा आणि संजय आवटे यांचा सकाळ मध्ये एकदाच झालेल्या प्रवेशाबद्दलचा प्रसंग वाचला होता. आवटे सरांचा तो लेख होता.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. आपलं पूर्ण नाव लिहा.

      Delete
  3. किती व्रतस्थ राहून काम केलयस...
    खूप दुर्मिळ आहे हे!

    ReplyDelete
  4. बीस साल बाद……

    नगर 'लोकसत्ता'मधून सुरुवात झाली असली तरीही खऱ्या अर्थानं पत्रकारितेची सकाळ (संस्कार) परुळेकरच्या 'सकाळ'मध्ये (पवार यांच्या नाही) अनंत (दीक्षित)च्या दिक्षाने केलेलेल्या पत्रकारितेच्या वाटचालीच्या वीस वर्षांच्या प्रवासाचे परीक्षण (परीस क्षण) छान रेखाटले आहेत.

    नेहमीच तुझे लेख वाचताना कधी कधी मनात फुटाणे फुटातात (कदाचित जमखेडचा परिणाम असावा) तर कधी कधी "अनाहत" (पणे) हृदयाला स्पशून जातात.

    300 हुन अधिक चित्रपटांचे “फर्स्ट डे फर्स्ट शो” (परीक्षण) केल्या नंतर, “कॉफीशॉप” मधे नेवून “यक्षनगरी”-त फ़िरवलेस तरीही तू स्वत;ला जेष्ठ पत्रकार समजत नहीस याचे कारण तुला मिळालेला “स्वामी विवेकानंद राज्यस्तरीय युवा पुरस्कार -2010” हे तर नाही ना…….....

    तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा……....

    ReplyDelete
  5. वा,, कमाल आहे, आव्हानं आणि अनुभव वाचून थक्क झाले

    ReplyDelete