1 Jan 2017

मटा मेट्रो लेख

मेट्रो आली रे अंगणी... 
-------------------------
आज एक जानेवारी. इंग्रजी नववर्षाचा पहिला दिवस... थोडक्यात स्वप्नरंजन करण्याचा दिवस! मागच्या वर्षात (किंवा खरं तर मागील कित्येक वर्षांत) जे आपण करू शकलो नाही, ते आता या वर्षात करणार, असा केवळ फुकाचा आणखी एक संकल्प करण्याचा हा दिवस... पण चालायचंच! आदल्या रात्री अनेकांना 'अंतराळी'ची सफर घडत असल्यानं इंग्रजी कालगणनेनुसार मध्यरात्रीच्या बारा वाजताच उगवणाऱ्या या दिवसाची सुरुवातच झोपेत होते आणि त्या झोपेत हवं तेवढं स्वप्नरंजन करण्यास पूर्ण वाव असतो. त्यामुळं स्वप्नं बघायला काहीच हरकत नाही. आणि मुळात आपल्याला पुण्यात फुकट कुठलीही गोष्ट करायला कधीच ना नसते! स्वप्न हा प्रकार यातच मोडतो.
आपल्या पुण्यनगरीत गेली काही वर्षं असंच एक स्वप्न आपल्याला वाकुल्या दाखवत पुढच्या वर्षांची ‘तारीख पे तारीख’ देत आलंय. हे स्वप्न पुणेकरांना पडलेलं नाही. राजकीय मंडळींनी त्यांच्या स्वप्नात बेकायदेशीरपणे घुसखोरी करून या स्वप्नाचा ट्रेलर त्यांना दाखवला आहे. हे म्हणजे अल्पना किंवा श्रीकृष्ण थिएटरमध्ये (उफ्फ... गेले ते दिन गेले!) मधेच सुरू होणाऱ्या चावट सिनेमांसारखं झालं... पुणेकरांना न मिळता मिळालेल्या या स्वप्नाचं नाव आहे - मेट्रो! वास्तविक मेट्रोपेक्षा किती तरी अजब-गजब गोष्टी पुण्यनगरीत आजही सुखेनैव नांदत आहेत. झेड ब्रिज (जो दिवसा झेड आणि रात्री एक्स ब्रिज असतो!), चितळ्यांची बाकरवडी, कॅम्पातले वेफर्स/सँडविच, गुडलकचा बनमस्का-चाय, वेताळ टेकडी, हडपसरचा वर सिग्नल असलेला जगप्रसिद्ध वाय उड्डाणपूल, सवाई गंधर्व, दिवसा दुचाकींना बंद असलेला आणि रात्री उघडणारा लकडी ऊर्फ संभाजी पूल.. आदी किती तरी आकर्षणं या महान शहरात कित्येक वर्षं वास्तव्यास आहेत. तरीदेखील येथील चिमुकले रस्ते वाढत्या दुचाकी आणि चारचाकींना सामावून घेण्यास फारच अपुरे पडू लागले हे पाहून आणि दिल्लीत झपाट्यानं वाढलेल्या मेट्रोचा पसारा पाहून इथल्या कारभारी मंडळींना मेट्रो आपल्याही गल्लीत धावावी असं वाटू लागलं. त्यात त्यांचं काय चुकलं! जनतेची सेवा करण्यास एवढा आतुर वर्ग पाहायला मिळणं अवघडच. तेव्हा आमच्याकडं या मंडळींनी आधी मेट्रो आणली ती चर्चेत!
पुण्यात आधी मुळात एखादी नवी गोष्ट येऊन रुजणं कठीण. त्यातही एकदा का एखाद्या विषयाला तोंड फुटलं, की वाद-चर्चेला अंत नाही. वाद-चर्चा ही गोष्टही मोफत असल्यानं आणि ती केल्यानं आपल्या खिशातली दमडीही जात नसल्यानं मोठ्या अहमहमिकेनं ती करायला आमची कधीच ना नसते. आम्ही रविवारी सकाळी रांगेत नंबर लावून, शक्यतो मित्राच्या पैशानं मिसळ चापीत मेट्रोवर अनेक तास चिंतन केलंय. मेट्रोमॅन म्हणविल्या जाणाऱ्या श्रीधरनसाहेबांनाही मेट्रो नियोजनातल्या दोन गोष्टी सुनवायला आम्ही कमी केलेलं नाही. कारण प्रश्न मेट्रोचा नसून तत्त्वाचा आहे! कलेसाठी कला की जीवनासाठी कला, सकच्छ की विकच्छ असले वाद फारच जुने झाले. आम्ही ते केवळ पुस्तकातच वाचले. मात्र, ‘जमिनीवरून की भुयारी’ हा अलीकडचा गाजलेला मोठा वाद होय. आम्ही पुणेकर असल्यानं आमच्या खांद्यांवरचा भाग जसा जास्त प्रगत झालाय, तसंच पुणे हे ऐतिहासिक नगर असल्यानं इथं जमिनीखालीही वरच्याएवढीच संस्कृती नांदतेय यावर आमचा गाढ विश्वास होता. मेट्रो जमिनीखालून गेली, की आमचे पेशवेकालीन हौद फुटून मेट्रोतल्या प्रवाशांवर जलाभिषेक होईल की काय, अशी भीती आमच्या एका पेठीय मित्रानं उपस्थित केली होती, ती अगदीच गैर म्हणता येणार नाही. (या मित्राचं सर्व आयुष्य शनिपार केंद्र धरून दीड किलोमीटरच्या त्रिज्येत गेलंय ते सोडा.) मात्र, रविवारच्या सकाळी तुळशीबागेतल्या फेमस मिसळ दुकानातलं टेबल अडवून त्यानं हा मर्मभेदी सवाल केला होता, हे आमच्या अद्याप ध्यानात आहे. शनिवारवाड्याच्या खाली खणलं तर अद्याप पेशव्यांचे दप्तर आणि सोन्या-मोत्यांचे रांजण सापडतील, यावर दुसऱ्या एका मित्रानं अशीच काकडी खिचडीची पैज लावली होती. तिथून मेट्रो जाताना प्लास्टिक कॉइनऐवजी हे सोन्याचे होन सरकवता येतील, असाही त्याचा युक्तिवाद होता. तर ते असो.
आम्हाला स्वतःला जिने चढायचा कंटाळा असल्यानं मेट्रो भुयारी असावी, असंच वाटायचं. मंडईत भाजी घ्यावी, सरकत्या जिन्यातून खाली मेट्रोचं स्टेशन गाठावं, जाताना वाटेत बसलेल्या बायकांकडून आलं-लिंबं-मिरच्या पिशवीत टाकाव्यात, मासिक पासचं कुपन स्वॅप मारावं आणि टुणकन उडी मारून मेट्रोत चढावं असं आमचं स्वप्न होतं... ‘पुढील स्थानक शनिवारवाडा... नेक्स्ट स्टेशन शनिवारवाडा... अगला स्टेशन शनिवारवाडा...’ हा त्या उद्-घोषमंजिरीचा नाजुक स्वर कानी साठवावा, तुळशीबागेतून घरी निघालेल्या आज्यांचा सीरियल-किलर संवाद ऐकावा, मधल्या दांड्याला धरून (मधल्या आळीचं नाव सार्थकी करणाऱ्या) अप्पासाहेब-भाऊसाहेब-अण्णासाहेबांनी राहुल गांधींना दिलेला लग्नाचा सल्ला ऐकावा, शिवाजीनगरला उतरून ‘ब्लू लाइन’वरून सरकत्या जिन्यानं ‘रेडलाइन’ला यावं आणि रामवाडीकडून येणाऱ्या आमच्या वनाझच्या मेट्रोत बसून आयडियल कॉलनी स्टेशन गाठून, घरी जावं एवढं आमचं साधं स्वप्न होतं. मात्र, भुयारी की जमिनीवरून या वादानं आमच्या पिढीचं तारुण्य पोखरलं. एवढ्या काळात जमीन पोखरून काढली असती, तर एखादी ब्लू लाइन किंवा रेड लाइन तयार होऊन धावायलाही लागली असती.
असो. आता बरंच भवती न भवती होऊन अखेर मेट्रोची कुदळ आमच्या गावात मारण्यात आली आहे. साक्षात पंतप्रधानांनी येऊन भूमिपूजन केल्यानं पुढल्या चार-पाच वर्षांत मेट्रो शहरातून धावत आहे, असं दृश्य दिसून आमचे डोळे पाणावले आहेत. मेट्रो स्टेशन परिसरातील पाट्याही आम्हाला दिसू लागल्या आहेत. ‘मेट्रोतील एसी स्वयंनियंत्रित असतो. तो कमी वा जास्त करण्यासाठी कुठलेही बटण दाबू नये’, ‘दरवाजे डाव्या बाजूलाच उघडतील; तुम्ही उजवे असलात तरी इथे डावीकडेच वळा, अन्यथा डोके आपटेल’, ‘मेट्रोतील उद्-घोषणा रेकॉर्डेड असते; तरी बोलणारी कुठे तरी दिसेल या आशेने ज्येष्ठांनी उगाच माना फिरवू नयेत, स्पाँडिलायसिस वाढेल’, ‘येरवडा स्टेशनच्या नावावरून जुने पीजे करू नयेत; लोक तुम्हालाच वेडं समजतील’, ‘आपल्या मताची पिंक टाका, पण पान खाऊन थुंकू नका’ या आणि अशा अनेक पाट्यांनी मेट्रोच्या भिंती रंगतील. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ‘मेट्रो दुपारी एक ते चार बंद राहील... चौकशी करू नये, अपमान करण्यात येईल’ ही पाटी स्टेशनच्या नावाइतकीच ठळक अक्षरात सगळीकडे लावलेली दिसेल. 
मेट्रो आली, की आमच्या चिमुकल्या शहरात सगळीकडं आनंदीआनंद पसरेल. आपले शहर आंतरराष्ट्रीय झाले, या आनंदानं नवपुणेकरही खूश होतील. मेट्रोमुळं बालगंधर्ववरून घरी जाताना रिक्षेवाल्यांशी वाद घालायचे टळले म्हणून जुने पुणेकरही आनंदात असतील. शिवाय घरोघरी तरुण मुले मेट्रो स्टेशनपर्यंत जाण्यासाठी बाइकचा हट्ट करतील, त्यामुळे दुचाकी उत्पादकही हसत शीळ घालतील.
पाच वर्षांनंतरचं चित्र आम्हाला लख्ख दिसतंय. एक जानेवारी २०२२... आम्ही शिवाजीनगर मेट्रो जंक्शनला उभे आहोत. स्टेशन वाय-फाय असल्यानं आणि आमच्याकडं सेव्हन-जी फोन असल्यानं आमच्या मोबाइलमध्ये थेट महापालिका चॅनेल लाइव्ह दिसते. महापालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. आता पालिकेत नवा प्रस्ताव आला आहे.... आत्ता बांधलेले दोन्ही मेट्रोचे मार्ग काढून बीआरटी मेट्रो करायची... एक माननीय तावातावानं विषय मांडत होते - सध्या नदीकाठानं मेट्रो जाते, पण नदीच्या पृष्ठभागावरची बरीचशी जागा वाया जाते... तेव्हा तिथं मेट्रोची बीआरटी करा... दोन बाजूंनी मेट्रो जातील, मध्ये पीएमपी बसचा ट्रॅक टाका... आणि खाली नदीत फास्ट क्रूझ सर्व्हिस द्या... क्रूझमधला माणूस रोप-वेनं बसमध्ये बसेल... बसमधून उतरला, की त्याचं मेट्रोत पाऊल पडेल... तेवढ्यात दुसरे माननीय म्हणाले - अहो, पण क्रूझ चालवण्याएवढे नदीत पाणीच नाही, त्याचं काय करायचं? त्यावर पहिले माननीय म्हणाले - माझी मिनरल वॉटरची फॅक्टरी आहे. टेंडरं काढा... पाहिजे तेवढं मिनरल वॉटर नदीत ओतू...
आणि अचानक पालिका सभेत पूर आला... सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटलं होतं...
----
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे, संवाद, १ जानेवारी २०१७)
-----

No comments:

Post a Comment