23 Dec 2016

तैमूर - मटा लेख

दुरितांचे ‘तैमूर’ जावो... 
---------------------------

आपल्याकडं फेसबुक आणि व्हॉट्सअॅप आदी सोशल मीडिया अस्तित्वात आल्यापासून एक गोष्ट निश्चित झाली. ती म्हणजे सेलिब्रिटींविषयी घडणारी कुठलीही गोष्ट नोंद घेतल्याविना जाणार नाही, हे ठरून गेलं. संपूर्ण भारतात सेलिब्रिटींविषयी कुठंही खुट्ट वाजलं, तरी सोशल मीडियावर असंख्य बोटं कळफलकांवर नाचू लागतात. भराभरा पोस्ट पडतात, त्यावर कमेंट्स पडतात. एकूण तो दिवस साजरा होतो. परवाच्या मंगळवारीही असंच झालं. हिंदी चित्रपटसृष्टीतला एक बरा नट सैफ अली खान आणि कपूर खानदानात जन्मलेली त्याची पत्नी करिना कपूर यांनी एका पुत्राला जन्म दिला. सेलिब्रिटी दाम्पत्य असल्यानं या दोघांची प्रत्येक हालचाल माध्यमं टिपत होती. करिनानं तर ती गर्भवती झाल्यापासूनच ही गोष्ट अजिबात लपविली नव्हती आणि जाहीरपणे मिरविली होती. ती यासाठी अर्थातच कौतुकास पात्र आहे. या दोघांना मंगळवारी मुलगा झाला, ही बातमी लगेचच सगळीकडं पसरली. तोपर्यंत त्या बातमीत कुणाला फार रस वाटेना. मात्र, ज्या क्षणी या मुलाचं नाव ‘तैमूर’ असं ठेवल्याचं जाहीर झालं, त्या क्षणी कळफलकांवर नाचण्यास आतुर अनेक रिकाम्या बोटांना मोठाच आधार मिळाला.
भारतावर आक्रमण करणाऱ्या तैमूरलंगाचं नाव त्यानं कशाला ठेवायचं, हा मुख्य आक्षेप! मग सैफचं मुस्लिम असणं, त्याचा ‘हिंदू’ करिनाशी विवाह, आधीची पत्नी अमृतासिंह हीदेखील ‘हिंदू’ असणं अशा सगळ्याच गोष्टी निघाल्या. वास्तविक, आपल्या मुलाचं नाव काय ठेवायचं हा पूर्णपणे सैफ आणि करिना या दोघांचा अधिकार! इतरांनी त्यात लुडबूड करायचं कारण नाही. आणि राहिला प्रश्न त्यांच्या मुस्लिम-हिंदू विवाहाचा. त्याला तर ‘लव्ह जिहाद’ची पार्श्वभूमी जोडण्यापर्यंत अनेकांची मजल गेली. इथं एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे आपली हिंदी चित्रपटसृष्टी बऱ्यापैकी धर्मनिरपेक्ष आहे. अशा अर्थानं, की इथं अमुक एक व्यक्ती अमुक जातीची म्हणून त्याला काम मिळतं अशी परिस्थिती नाही. इथं गुणवत्ता वाजवून दाखवावी लागते. शिवाय या चित्रपटसृष्टीतल्या लोकांना पैशांपुढं बाकी कशाचीच फिकीर नसल्यानं ते धर्म वगैरे गोष्टींचा किती गांभीर्यानं विचार करतात किंवा त्याचं पालन करतात, हा एक प्रश्नच आहे. म्हणजे सैफ अली मुस्लिम म्हणून सेटवर पाच वेळा नमाज अदा करतो किंवा अक्षयकुमार हिंदू म्हणून रोज सेटवर सकाळ-संध्याकाळ आरती करतो, अशी चर्चा कधी ऐकिवात नाही. मुळात हे लोक अशा धर्म वगैरे गोष्टींच्या पलीकडं गेलेले असतात. धर्मविषयक त्यांच्या काही हालचाली दिसल्याच, तर त्या फक्त धंद्याशी निगडित असतात. सलमान खानचे सिनेमे ईदला प्रदर्शित होतात, यामागे केवळ प्रेक्षकांच्या धार्मिक भावना पैशांच्या रूपात वसूल करणं हीच एकमेव गोष्ट असते. खुद्द सलमानच्या घरी सगळेच सण साजरे होतात.
ज्या सैफचा विषय इथं चर्चेत आहे, त्याची आई शर्मिला टागोर ही बंगालच्या रवींद्रनाथ टागोरांच्या प्रख्यात बंगाली हिंदू ब्राह्मण घरातली आहे. सैफची बहीण सोहा अली खान हिनं ‘हिंदू’ कुणाल खेमूशी लग्न केलं आहे आणि तिला ते करू देण्यात आलं आहे, हेही विसरता कामा नये. करिनाच्या घरातलं उदाहरण घ्या. करिना कपूरच्या आजोबांचं त्या काळातल्या प्रख्यात मुस्लिम अभिनेत्रीबरोबर - अर्थात नर्गिसबरोबर - अफेअर होतं, ही गोष्ट सर्वच जाणतात. त्यांचं लग्न होऊ शकलं नाही, ही बाब अलाहिदा. गंमत म्हणजे नर्गिसनं नंतर लग्न केलं तेही ‘हिंदू’ सुनील दत्तबरोबर आणि जन्मलेल्या मुलाचं नावही संजय असं ‘हिंदू’च ठेवलं. (एवढं छान हिंदू नाव असलेल्या या मुलानं नंतर काय पराक्रम गाजवले, हे आपल्याला माहिती आहेच.) याशिवाय प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट हेही मुस्लिम आई (शिरीन महंमद अली) आणि हिंदू पित्याचे (नानाभाई भट) अपत्य आहेत. (त्यांची आई शिरीन महंमद अली ही तमिळ ब्राह्मण रामशेषाद्री अय्यंगार आणि लखनौच्या एका मुस्लिम महिलेची मुलगी होती, ते वेगळंच!) याखेरीज अयशस्वी प्रेम-प्रकरणं असलेल्या किती तरी हिंदू-मुस्लिम जोड्या सांगता येतील. त्यात धर्मेंद्र-मीनाकुमारीपासून ते गुरुदत्त-वहिदापर्यंत अनेक नावे सांगता येतील. हिंदू पत्नीला तिचा धर्म पाळण्याची मुभा देणारे शाहरुख आणि आमिर यांचाही उल्लेख करायलाच पाहिजे. सांगायचा मुद्दा असा, की या फिल्म इंडस्ट्रीत लोक एखादा माणूस हिंदू वा मुस्लिम आहे, म्हणून त्याच्यावर प्रेम करत नाही. पैसा नावाचा त्याहूनही अधिक ताकदवान ड्रायव्हिंग फोर्स त्यामागं असतो. किंवा मग क्वचित वेगळेच खरेखरे प्रेमाचे बंध असतातही! नाकारण्यात अर्थ नाही. 
सैफ आणि करिना या दाम्पत्याकडं पाहताना ही पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागेल. सैफचं घराणं नवाबाचं. त्याचे वडील मन्सूर अली खान पतौडी भारतीय क्रिकेट संघाचे लोकप्रिय कर्णधार होते. पतौडी या हरियाणातील तत्कालीन संस्थानाचे हे नवाब. सैफ अली खानचे राजकीय आणि धार्मिक विचार काय आहेत, याची कल्पना नाही. मात्र, देशभरातील तमाम मुस्लिम संस्थानिकांप्रमाणेच त्याचे वाडवडील काँग्रेसचे पाठीराखे होते आणि आहेत, हे निश्चित. सेलिब्रिटी किंवा संस्थानिक मंडळींना तसेही फार तीव्र डाव्या किंवा उजव्या राजकीय विचारांना धरून चालता येत नाही. त्यांना जनतेला आवडेल असाच मध्यममार्ग निवडावा लागतो. असं करणं हेच ‘पॉलिटिकली करेक्ट’पण असतं. त्यामुळंच आपल्या देशातले बहुतांश सेलिब्रिटी (काही अपवाद करता) फार जहाल टोकाचे राजकीय वा धार्मिक विचार पसरवताना दिसत नाहीत. या मुद्द्यावर सैफ जरा वेगळा निघाला, हे निश्चित. त्यानं ठेवलेलं नाव मुस्लिम आक्रमकाचं आहे, हे त्याला माहिती नसेल असं वाटत नाही. तरीही त्यानं हे नाव ठेवलं हे नक्कीच काहीसं खोडसाळपणाचं वाटू शकतं, हे मान्य आहे. पण ते काहीही असलं, तरी स्वतःच्या मुलाचं नाव काय ठेवायचं हा सर्वस्वी त्याचा अधिकार आहे, यात वाद नाही.
सैफनं त्याच्या मुलाचं नाव मुस्लिम आक्रमकाचं ठेवलं, यापेक्षा तो या मुलाला कसं वाढवतो, इथल्या धर्मनिरपेक्ष, लोकशाही व्यवस्थेत त्याला वाढू देऊन या समाजाचा, या व्यवस्थेचा आदर करायला शिकवतो की नाही, हे अधिक महत्त्वाचं आहे. एक माणूस म्हणून त्याला सर्वांशी माणुसकीनं, प्रेमानं वागायला शिकवतो की नाही, हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. शेवटी ‘नावात काय आहे?’ असं शेक्सपिअरनं म्हटलं आहे ते खरंच आहे. चिमुकल्या तैमूरला मुस्लिम वा हिंदू होण्यापेक्षा चांगला भारतीय होण्यासाठी शुभेच्छा देऊ या.
--- 
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती - २३ डिसेंबर २०१६)

No comments:

Post a Comment