11 Jul 2016

लेख - हिंदी सिनेमातील हिंसाचारावर


एवढी हिंसा कशासाठी? 
----------------------
काही काळापूर्वी 'मर्डर-२' नावाचा एक टुकार सिनेमा येऊन गेला. त्यातला विकृत खलनायक बायकांना पकडून त्यांचा अत्यंत निर्दयी पद्धतीनं खून करीत असतो. एका दृश्यात तो एका तरुण मुलीला बांधून ठेवतो आणि तिच्या डोक्यात हातोड्यानं खिळा ठोकून तिला मारतो. हे दृश्य इतकं भयंकर होतं, की मला भोवळ आली होती. अनुराग कश्यपचा 'गँग ऑफ वसेपूर' बघा. रक्ता-मांसाचा चिखल दाखवलाय त्यात. अनुष्का शर्माचा 'एनएच-१०' हा चित्रपट असाच. त्यात पळून गेलेल्या त्या मुलीला आणि तिच्या मित्राला जंगलात अत्यंत निर्घृणपणे मारलंय आणि हे सगळं सांगोपांग दाखवलंय सिनेमात. रामगोपाल वर्माचा अलीकडंच आलेला आणि पडलेला 'वीरप्पन' हा सिनेमा. वीरप्पनचं क्रौर्य आणि कसायासारखं त्याचं माणसं मारण्याचं कसब त्यातही अगदी तपशीलवार दाखवलंय. 
हे सगळे सिनेमे पाहताना प्रत्येक वेळी मला त्रास झालाय आणि अनेकांना तो होत असणार यात शंका नाही. या असल्या दृश्यांची चर्चा झाली म्हणून तर 'तितली' नावाचा अगदी अलीकडं आलेला एक चित्रपट पाहण्याचा धीर मी करूच शकलो नाही. तीच गोष्ट अनुराग कश्यपच्याच ताज्या 'रामन राघव'ची. हा सिनेमा मी पाहिला नाही. म्हणजे पाहण्याची इच्छा होती; पण पुन्हा धीर झाला नाही. पण त्याविषयी जे वाचलं, त्यावरून हा भयंकर सिनेमा अनेक जण पाहूच शकणार नाहीत, याची खात्री पटली आहे. 

 या सिनेमात नवाझुद्दीन सिद्दिकी एका दांपत्याचा निर्दयपणे खून करतो असं दृश्य आहे. त्यानंतर या जोडप्याच्या पाच ते सहा वर्षांच्या मुलाला तो एका खुर्चीला बांधून ठेवतो आणि त्याच्यासमोरच बिर्याणी आणि चिकन शिजवून खातो. त्यानंतर तो त्या मुलालाही मारतो, हे सांगायला नकोच. मला प्रश्न पडला आहे, की ही अशी दृश्यं पडद्यावर दाखवून हे सगळे दिग्दर्शक नक्की काय साध्य करीत आहेत? जास्तीत जास्त विकृती कोण पडद्यावर दाखवतो, याची त्यांच्या-त्यांच्यात तर शर्यत लागलेली नाही ना! 
जगात अनेक प्रकारचे सिनेमे बनत असतात. प्रत्येकाचा प्रेक्षकवर्गही वेगवेगळा असतो. जगात जपानी आणि कोरियन चित्रपट अशा हिंसक दृश्यांसाठी प्रसिद्ध आहेत. तिथला समाज या गोष्टीची किंमत मोजतो आहे. दोन्ही देशांत रेल्वेत किंवा सार्वजनिक ठिकाणी हिंसेचे अनेक प्रकार घडले आहेत. अमेरिकेत तर ठायी ठायी हे प्रकार होताना आपण बघतो. पश्चिम आशियात तर अनेक दशकांपासून वांशिक हिंसाचार सुरू आहे. सिनेमाचा कळत-नकळत पडणारा प्रभाव यात महत्त्वाची भूमिका बजावत असतो. सिनेमा हे मोठ्या जनमानसावर प्रचंड प्रभाव टाकू शकणारं माध्यम आहे. या माध्यमातून एवढी टोकाची आणि किळसवाणी हिंसा दाखवण्यामागं नेमका काय हेतू असू शकतो? टोकाच्या भीतीतून किंवा टोकाच्या न्यूनगंडातूनही माणूस हिंसाचार करू शकतो. मानसशास्त्रज्ञ सांगतात, की सिनेमासारखं माध्यम कळत-नकळत आपल्या अबोध मनावर मोठा प्रभाव टाकत असतं. अशा प्रभावाखाली येऊन अनेक गुन्हे घडल्याची उदाहरणं आपल्यासमोरच आहेत. मग पुन्हा हा विकृत हिंसेचा डोस कशासाठी? 
यावर कुणी म्हणेल, की समाजात जे घडतं तेच सिनेमात दाखवलं जातं. सिनेमा हा समाजाचाच आरसा आहे. तेव्हा समाजात विकृती फोफावली असेल, किंवा एवढ्या टोकाची हिंसा प्रत्यक्ष घडत असेल, तर ती सिनेमात दाखवायची नाही का? यावर उत्तर असं, की आपल्याकडं अनेक प्रतिभाशाली दिग्दर्शक होऊन गेले. जगभरातलीही उदाहरणं आहेत. मानवी जीवनातला प्रत्येक रस त्यांनी दाखवला. प्रेम दाखवलं, तसा द्वेषही दाखविला. करुणरस दाखविला, तसाच हास्यरसही प्रकट केला. शांतिरस दाखविला, तशीच हिंसाही दाखविली. पण हे करताना त्यांनी सिनेमा माध्यमाची खरी ताकद वापरली. हिचकॉकचं उदाहरण पुरेसं बोलकं आहे. त्याचे अनेक सिनेमे तर कृष्णधवल आहेत. तरीही रक्ताचा एक थेंबही न दाखवता तो प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणत असे. 'बँडिट क्वीन' या चित्रपटातही फूलनदेवीवर झालेल्या सामूहिक बलात्काराचं दृश्य असंच कुठलाही थेट प्रसंग न दाखवता शेखर कपूरनं प्रत्ययकारकरीत्या दाखवलं होतं. तेव्हा इच्छा असेल, तर हवा ते इफेक्ट साधता येतो हे नक्की. चित्र, ध्वनी आणि प्रकाश या माध्यमांचा वापर करून प्रतिभाशाली दिग्दर्शकांनी निर्जीव पडद्यावर अनेक चमत्कार घडविले आहेत. रक्तामांसाचा चिखल दाखवूनच आपण वेगळे दिग्दर्शक ठरतो, असा त्यांचा भ्रम नसावा.
मुद्दा म्हातारी मेल्याचा नसून, काळ सोकावत जातो याचा आहे. हल्ली अशा अनेक सिनेमांना यू-ए प्रमाणपत्र असतं. मग कित्येक कोवळी मुलं हे सिनेमे पाहतच असतात. त्यात दाखविली जाणारी हिंसा तेही पाहत असतात. मग कुणाच्या तरी डोक्यात दगड घालणं, मानेत स्क्रू-ड्रायव्हर खुपसणं, डोक्यात लोखंडी रॉड घालणं किंवा हात-पाय तोडणं या प्रकारांचं त्यांना काहीच वाटेनासं होतं. हल्लीच मराठवाड्यात उदगीरमध्ये एका टीनएजर मुलानं आपल्या मित्राला सुपारी देऊन आपल्या सख्ख्या आईचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही मुलं कशामुळं एवढी हिंसक झाली? असल्या सिनेमांचा प्रभाव हे त्यामागचं एक प्रमुख कारण आहे, असं अनेक पोलिस अधिकारीही सांगतात. हल्ली तर हे प्रकार काही प्रेक्षक एंजॉय करतात, असं एक निरीक्षण आहे. म्हणजे दाखवणारा आणि पाहणारा या दोघांच्या पातळीवर विकृतीचं असं अद्वैत झालं आहे. असं असेल तर आपण समाज म्हणून पुढं कुठं जाणार आहोत?
या विकृतीत अनुराग कश्यप आणि त्याचे शिष्योत्तम, महेश भट कॅम्प आदी मंडळी आघाडीवर आहेत. असं काही तरी दाखवून आपण नक्की काय साध्य करतो आहोत, याचं उत्तर त्यांनी द्यायला हवं. सिनेमा ही धंदेवाइक कला आहे. इथं जे पिकतं तेच विकलं जातं. त्यामुळं मुळात प्रेक्षकांनी याविरुद्ध आवाज उठवला आणि अशा सिनेमांना जाणं टाळलं, तर या मंडळींचं फिरलेलं डोकं नक्कीच ताळ्यावर येईल. (अर्थात अतिगोडगोड सिनेमे दाखवणं हीसुद्धा एक प्रकारची हिंसाच आहे, असं मी मानतो.) तेव्हा या मंडळींना असं सांगावंसं वाटतं, की सिनेमा माध्यमाची खरी ताकद वापरा आणि व्यक्त व्हा. वास्तविक रामगोपाल र्मा आणि अनुराग कश्यप यांच्याकडं ते कसब आहेच. सुरुवातीच्या त्यांच्या अनेक सिनेमांतून त्यांनी ते छान दाखवलं आहे आणि म्हणूनच ते प्रेक्षकांचे लाडके दिग्दर्शक आहेत. मलाही हे दोघेही आवडतात. पण याचा अर्थ त्यांनी वाट्टेल ते दाखवावं आणि प्रेक्षकांनी खपवून घ्यावं असा होत नाही. गरज नसताना विकृत हिंसा सांगोपांग दाखवू नये आणि दाखवायची असेल तर त्यामागे ठोस कारण उभं असलं पाहिजे, एवढी अपेक्षा अवाजवी नसावी.
---

(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती, ११ जुलै २०१६)
---

No comments:

Post a Comment