30 Aug 2015

रिव्ह्यू - हायवे : एक सेल्फी आरपार




स्वतःकडे नेणारा महामार्ग
-------------------------------


उमेश कुलकर्णी हा श्वासोत्तर मराठी सिनेमाच्या प्रमुख बिनीच्या शिलेदारांपैकी एक महत्त्वाचा चित्रकर्मी आहे. वळू, विहीर आणि देऊळ या त्याच्या तिन्ही मराठी चित्रपटांतून त्यानं स्वतःची अशी एक खास चित्रभाषा, शैली विकसित केली आहे. लेखक गिरीश कुलकर्णी त्याचा या प्रक्रियेतील महत्त्वाचा जोडीदार. त्यामुळंच या जोडगोळीचा नवा सिनेमा येतोय म्हटल्यावर अनेकांना त्याची उत्सुकता लागलेली असते. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या चित्रपटातून काही तरी महत्त्वाचं, सकस असं आशयसूत्र गवसेल, अशी अनेकांना अपेक्षा असते. हायवे - एक सेल्फी आरपार हा त्यांचा नवा चित्रपट या दृष्टीनं आपली निराशा करीत नाही. किंबहुना उमेश-गिरीश यांच्या आधीच्या वाटचालीकडं पाहता, ती शैली आणि तो आशय पुढं नेणारीच कलाकृती त्यांच्याकडून तयार झाली आहे, असं म्हणायला हरकत नाही.
मुंबईकडून पुण्याला निघालेली वेगवेगळ्या स्वभावाची, वयाची, पेशाची माणसं आणि त्यांचा एकाच वेळी सुरू असलेला, पण तरीही एकमेकांशी अनभिज्ञ असलेला प्रवास आणि अचानक या वेगवान प्रवासात खंड पडल्यानंतर त्यांचं थबकणं आणि त्यातून स्वतःकडं त्यांचा वेगळा प्रवास सुरू होणं ही या चित्रपटाची वनलायनर सांगता येईल. चित्रपटाचा प्रारंभ होतो तो एका वैशिष्ट्यपूर्ण फ्रेममधून. मुंबईत चाळीत राहणारा एक तरुण मुलगा बाहेर पडतो आहे, आणि तो चाळ सोडून रस्त्यावर येतोय तेव्हा मागे एक टोलेजंग इमारत जणू त्या चाळीला विळखा घालून तिचा घास घ्यायला टपलेली अशी. या एकाच दृश्यचौकटीमधून दिग्दर्शक किती तरी गोष्टी न बोलता सांगून जातो. 


महानगरांमधले वेगवान बदल, त्यात राहणाऱ्या लोकांचं बदललेलं जीवनमान आणि रस्त्यावर वाढलेली गर्दी अशा अनेक गोष्टींवरचं हे बोलकं भाष्य. त्यानंतर एकेका पात्राची ओळख होत जाते. यात सुनील बर्वे आणि व वृषाली कुलकर्णी (सौ. गिरीश कुलकर्णी) या उच्चभ्रू जोडप्यासह एक फडात नाचणारी तरुणी (मुक्ता बर्वे), तिची आई (शकुंतला नगरकर), एक एनआरआय इंजिनीअर (गिरीश कुलकर्णी), एका सीरियलमधल्या लोकप्रिय नटीला (हुमा कुरेशी) राजकीय कार्यक्रमासाठी पुण्याला घेऊन चाललेला कार्यकर्ता (श्रीकांत यादव), एक श्रीमंत पण एकटी महिला (टिस्का चोप्रा), तिच्यासोबत मसाज (!) करण्यासाठी लोणावळ्याला निघालेला तरुण,  एक निम्नमध्यमवर्गीय भांडणारं जोडपं (किशोर कदम व छाया कदम), गिरीश कुलकर्णीनं गाडीतून खाली उतरवलेला तरुण (निपुण धर्माधिकारी), किरकोळ अॅक्सिडेंट झाल्यामुळं गिरीश कुलकर्णीच्या गाडीत (पोलिसांच्या मध्यस्थीनंतर) बसलेलं जोडपं (विद्याधर जोशी व रेणुका शहाणे), एका गाडीत बसलेले सगळेच अनोळखी लोक (सतीश आळेकर आणि धीरेश जोशी आदी) आणि ट्रकमधून लिफ्ट घेणारे नागराज मंजुळे व त्याचे दोन संशयास्पद साथीदार अशी अनेक पात्रं भेटत राहतात. या प्रत्येकाची ओळख आणि त्यांच्या प्रत्येकाच्या वैचित्र्यपूर्ण तऱ्हा हे मांडण्यातच सिनेमाचा पूर्वार्ध जवळपास संपतो. पण या काळात अनेक पात्रं आपल्यासमोर येत असल्यानं आणि वेगवान घडामोडी घडत असल्यानं मध्यंतरापर्यंत हा सिनेमा चांगलाच खिळवून ठेवतो. या सर्व मांडणीत गिरीशचे चटपटीत संवाद, सर्वच अभिनेत्यांनी केलेला कमाल अभिनय आणि दृश्यमांडणीतले वेगळे प्रयोग (गाडीच्या वेगवेगळ्या कोनांतून दिसणारी पात्रं आणि त्यामुळं आपणच गाडीत बसलो आहोत असा येणारा फील किंवा हायवेवरच्या वेगाची अनुभूती देणारे प्रसंग इ.) यामुळं हा पूर्वार्ध पाहताना आपण दंग होऊन जातो. यात सगळ्यांत जमलेले प्रसंग आहेत ते सुनील बर्वे आणि वृषाली कुलकर्णी यांचे. व्यारूती असं नाव असलेली ही गर्भवती तरुणी गडबडीत लिफ्टमध्ये अडकते इथून पुढच्या सर्व प्रवासात या जोडप्याच्या आयुष्यातल्या सर्व प्रकारच्या विसंगती विनोदी पद्धतीनं समोर येत राहतात. 
या तुलनेत उत्तरार्ध संपूर्ण वेगळा आहे. हायवेवर घाटात ट्रॅफिक जॅम होतं आणि आपले हे सगळे लोक एकाच ठिकाणी अडकून पडतात. त्यानंतर जे काही होतं, तो या सिनेमाचा कळसाध्याय आहे. सगळे जण वेगानं कुठं तरी निघाले आहेत आणि त्यांना त्यांची इच्छा नसतानाही अडकून पडावं लागलं आहे. यामुळं सगळेच जण आधी उद्विग्न, मग चिडचिडे, नंतर हतबल आणि शेवटी अगदी शांत होतात. त्यांचा हा जो स्वतःकडं जाण्याचा प्रवास आहे, तोच हा सिनेमा आहे. यातलं मर्म ज्याला कळलं, त्याला सिनेमा कळला! शेवटी रेणुका शहाणे घनतमी शुक्र बघ राज्य करी या भा. रा. तांब्यांच्या कवितेच्या ओळी म्हणते आणि मग त्या अनुषंगानं जे जे काही घडतं, ते या सगळ्या खटाटोपाचं सार आहे. आपलं आत्ताचं आयुष्य म्हणजे असाच एक वेगवान प्रवास आहे आणि तो करत असताना आपल्याला कुठंही थांबायचं नाहीये, कुणासाठीही थांबायचं नाहीये. कुठल्याही अज्ञात शक्तीनं जादू केल्याप्रमाणं आपण फक्त तिच्या दिशेनं वेगानं खेचले जात आहोत. हे करताना आपण स्वतःशी बोलायचंही विसरून जात आहोत. कुणी आपल्याला हा अवसर मिळवून दिलाच तर त्याचं महत्त्व कळण्याऐवजी आपण वेळ घालविल्याबद्दल त्याच्यावर चिडचिड करू, अशी आत्ताची स्थिती आहे. हे सगळं या सिनेमात नीट आलं आहे.
एक मात्र झालंय. कितीही समजून घ्यायचं म्हटलं तरी उत्तरार्धाचा अत्यंत कमी झालेला पेस प्रेक्षकांना लवकर झेपत नाही, हे खरं आहे. आत्तापर्यंत सुरू असलेला सगळा गोंधळ, सगळा केऑस एकदम थांबतो. त्यानंतर सिनेमा थेट पात्रांच्या एकमेकांशी सुरू होणाऱ्या संवादावर भर द्यायला लागतो. हा सांधेबदल अलवारपणे न होता, अगदी आघात केल्याप्रमाणं होतो. त्यामुळं त्या बदललेल्या गतीशी प्रेक्षक म्हणून आपल्याला मॅच करणं काहीसं कठीण जातं. शिवाय ट्रॅफिक जॅमचं चित्रिकरण (अर्थातच) स्टुडिओत किंवा इनडोअर झालंय हे स्पष्ट दिसतं. त्यामुळं पूर्वार्धातल्या हायवेवरच्या दृश्यांमुळं कथावस्तूला मिळालेली एक ऑथेंटिसिटी इथं मार खाते. आणि एकदा का नेपथ्याला भगदाड पडलं, की पात्रांमधील आपली गुंतवणूक आपोआपच कमी व्हायला लागते. इथं काही पात्रांच्या गोष्टीला लॉजिकल शेवट मिळतो आणि तो आपल्यालाही समजून घेता येतो. मात्र, काही दृश्यं यात का आहेत, हे शेवटपर्यंत कळत नाही. म्हणजे मुक्ता बर्वे आणि तिची आई एका दाक्षिणात्य ट्रकड्रायव्हरला उभं करून निसर्गाच्या हाकेला साद द्यायला जातात तो, किंवा शशांक शेंडेचा मुलगा हरवतो तो प्रसंग किंवा श्रीकांत यादवचा कार्यकर्ता दारू पिऊन स्वतःची उद्विग्नता व्यक्त करतात तो, किंवा तो पक्षी पाळणारा मतिमंद माणूस आणि एक मुलगी यांचा संवाद यांचे धागेदोरे नीट जुळत नाहीत. मुक्ता बर्वेशी आधी भांडण करणारा माणूस, नंतर त्याला फीट आल्यावर याच दोघी त्याची शुश्रूषा करतात, तेव्हा मुक्ताच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतो हा प्रसंग जबरदस्त आहे. मात्र, घनतमी गाण्याच्या पार्श्वभूमीवर हे दृश्य दिसतं तेव्हा प्रेक्षकांत हशा पिकतो. (जो अगदीच अस्थानी आहे. वास्तविक या दृश्यातलं कारुण्य अंगावर येतं...) टिस्का चोप्राची कथाही यथातथाच आहे आणि त्या मसाजवाल्या मुलाचा सगळा भाग किंवा हुमा कुरेशीचा सगळा भाग हा सिनेमात ग्लॅम कोशंट अॅड करण्यासाठीच आला असावा, असं वाटतं. दोघींनी कामं मात्र झकास केलीयत. सगळ्यांत ठसतात वृषाली कुलकर्णी, छाया कदम आणि मुक्ता बर्वे. या तिन्ही बायकांनी (आणि अर्थात टिस्का व हुमा) कमाल केली आहे. गिरीश कुलकर्णीनं यात साकारलेला एनआरआय इंजिनीअर आणि त्याची भाषा बघण्या-ऐकण्यासारखी आहे. रेणुका शहाणेनं अगदी छोटया रोलमध्ये कमाल केली आहे आणि ती दिसलीयसुद्धा छान!
सिनेमाचं संगीत अमित त्रिवेदीचं आहे. ते फार काही लक्षात राहत नाही. मात्र, सिनेमॅटोग्राफी (सुधाकर रेड्डी) अप्रतिम. विशेषतः पहिल्या भागात तर झक्कासच.
तेव्हा स्वतःकडं जाणाऱ्या या महामार्गाची सफर न चुकता कराच.

दर्जा - साडेतीन स्टार

------------------

2 Aug 2015

मोबाइल क्रांतीची दोन दशकं....

भारताच्या आधुनिक इतिहासात मोबाइल क्रांतीमुळं मोठाच आर्थिक, सामाजिक बदल घडवून आणला आहे, हे वाक्य काहीसं गुळगुळीत वाटत असलं, तरी वास्तव मांडणारं आहे. मला तर वाटतं, इसवी सन पूर्व आणि इसवी सन अशी जुन्या काळाची आपण विभागणी केली आहे, तशीच आता मोबाइलपूर्व आणि मोबाइलोत्तर अशी आधुनिक काळाची वाटणी करायला हवी. १९९५ मध्ये किंवा त्यानंतर जन्मलेली पिढी आता वीस वर्षांची झालीय. त्यांना मतदानाचाही अधिकार मिळाला आहे. प्रौढांसाठीचे सिनेमे पाहण्याचा अधिकार मिळालाय. एका अर्थानं ही भारताची खरी आधुनिक पिढी आहे. तंत्रज्ञानामुळं प्रत्येक पुढील पिढीला फायदा होतो, ही गोष्ट खरी असली, तरी मोबाइलमुळं समाजातल्या वर्गविग्रहांचं जे सपाटीकरण झालं आहे, ते अभूतपूर्व आहे. भारतासारख्या मोठ्या लोकशाही देशाला तंत्रज्ञानानं दिलेली ही फार मोठी देणगी आहे. त्या अर्थानं मोबाइल हा आपल्या देशासाठी ग्रेट इक्वलायझर ठरला आहे.
भारतात मोबाइलचं आगमन होण्यासाठी अनुकूल स्थिती तयार झाली ती १९९१ या वर्षामुळं. भारतानं याच वर्षात आर्थिक उदारीकरणाच्या राजमार्गावर पाऊल ठेवलं. काही विपरीत आर्थिक व राजकीय परिस्थितीमुळं तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव आणि तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहनसिंग यांना हा निर्णय घ्यावा लागला. मात्र, तो भारताच्या दीर्घकालीन फायद्यासाठी पथ्याचाच ठरला. भारताची प्रचंड मोठी बाजारपेठ जगासाठी खुली झाली. राजीव गांधींच्या काळात एसटीडी, आयएसडीच्या माध्यमातून टेलिफोन क्रांती झालीच होती आणि आता मोबाइलच्या आगमनासाठी देश सज्ज झाला होता. तेव्हा बिर्ला एटी अँड टी, बीपीएल, हच आणि एअरटेल अशा काही मोजक्या कंपन्यांनी देशात मोबाइल सेवा सुरू केली. (पहिली व्यावसायिक मोबाइल सेवा सुरू झाली ती कोलकत्यावरून - तारीख होती १५ ऑगस्ट १९९५.) तेव्हा वृत्तपत्रांत या मोबाइल कंपन्यांच्या मोठमोठ्या पानभर ब्लॅक अँड व्हाइट जाहिराती येत असत. मोटोरोला कंपनीचे वॉकीटॉकीसारखे मोठ्या आकाराचे हँडसेट तेव्हा मिळत. आणि तेव्हाचे २४ रुपये प्रतिमिनिट आउटगोइंग आणि १६ रुपये इनकमिंग हे दर अनेकांना आठवत असतील. या महागड्या दरांमुळं मोबाइल लगेचच सर्वव्यापी झाला नाही. तेव्हा अनेकांकडं लँडलाइन फोन होते आणि ते बऱ्यापैकी उपयुक्त होते. शिवाय तुलनेनं स्वस्त होते. शिवाय मोबाइलला पर्याय म्हणून तेव्हा पेजर वापरले जायचे. हे उपकरण तर अगदी झपाट्यानं कालबाह्य झालं. छोट्या चौकोनी डबीसारखं हे उपकरण केवळ संदेशांची देवाणघेवाण करण्यासाठी वापरलं जायचं. त्यासाठी लँडलाइनवरून हा मेसेज द्यावा लागायचा. किचकट तंत्रामुळं ते लगेच वापरातून बाहेर गेलं. तरीही मोबाइल ही मूठभर श्रीमंतांची मिराशी होती पहिली काही वर्षं... 
एकविसावं शतक उजाडायच्या काळात म्हणजे १९९९-२००० मध्ये देशात अचानक डॉट कॉम कंपन्यांचं आणि बीपीओंचं पेव फुटलं. जगभराला तेव्हा वायटूकेच्या समस्येनं ग्रासलं होतं. जगभरातल्या संगणकांमध्ये तेव्हा वर्षाच्या जागी दोनच आकडे (म्हणजे १९९९ च्या ऐवजी ९९) वापरले जात. तेव्हा २००० हे वर्ष संपून २००१ हे वर्ष सुरू सुरू होईल, तेव्हा संगणक गडबडणार आणि अनेक व्यवहार गोत्यात येणार, अशी भीती होती. या समस्येवर मात करण्यासाठी अमेरिकी कंपन्यांनी जगभरातलं कुशल मनुष्यबळ हायर केलं. त्यात भारतीय आघाडीवर होते. काही का असेना, आपल्या देशात अनेकांना अचानक रोजगार उपलब्ध झाला आणि तुलनेनं बरे पैसेही मिळू लागले. मोबाइलच्या प्रसाराला ही स्थिती अनुकूल होती. दरम्यानच्या काळात अनेक कंपन्या या व्यवसायात उतरू लागल्यानं स्पर्धेचा परिणाम म्हणून कॉलचे दर झपाट्यानं कमी होत गेले. विशेषतः इनकमिंग कॉल लवकरच मोफत झाले. (यानंतर मिस कॉलचं फॅड आलं.) 

या काळापर्यंत भारतीय बाजारपेठेत नोकिया या हँडसेट बनवणाऱ्या कंपनीचं निर्विवाद वर्चस्व होतं. मोबाइल घ्यायचा तर तो नोकियाचाच, हे अगदी पक्कं असायचं. नोकियाची ती विशिष्ट कॉलर ट्यून जिथं जाऊ तिथं ऐकू यायची. कित्येक नाटकांत, सिनेमांत मोबाइल वाजलाय हे दाखवण्यासाठी कॉमनली हीच ट्यून वापरली जाऊ लागली. तरीही या काळात म्हणजे २००१ पर्यंत भारतातील मोबाइलधारकांची संख्या ५५ लाखांपर्यंतच मर्यादित होती. 
एकविसाव्या शतकात प्रवेश करताना भारतानं बऱ्याच क्षेत्रांत कात टाकली. महानगरांमध्ये पायाभूत सुविधा उभ्या राहू लागल्या, सुवर्ण चतुष्कोनसारख्या प्रकल्पांनी देशभरातले महामार्ग मोठे होऊ लागले, एक्स्प्रेस-वे उभारले जाऊ लागले, महानगरांपासून ते टु-टिअर शहरांपर्यंत सर्वत्र मॉल उभे राहिले, सिनेमांमध्ये मल्टिप्लेक्स संस्कृती आली, तरुण एम-एट्या विकून बाइक घेऊ लागले, दिल चाहता हैसारख्या सिनेमांतून वेगळ्या स्वरूपाची तरुणाईची अभिव्यक्ती समोर आली, कौन बनेगा करोडपतीसारख्या मेगास्टार अमिताभ बच्चनला छोट्या पडद्यावर आणणाऱ्या कार्यक्रमानं तर (मेसेज करण्यासाठी) हातात मोबाइल असणं ही एक मस्ट गोष्ट करून टाकली. अशक्य वाटणारा विमानप्रवास आवाक्यात आला, तर परदेशप्रवास हे मध्यमवर्गीयांसाठी केवळ स्वप्न न राहता, एक सुखद वास्तव बनलं. एका अर्थानं इंडिया शायनिंग होतंच हे! (फक्त त्याचा राजकीय अर्थ आणि राजकीय गणित पार चुकलं...) या सर्व प्रवासात मोबाइल हाती धरून भारतीय जनता एका पातळीवर येण्यासाठी धडपडत होती.
भारताची अवाढव्य बाजारपेठ आणि नित्य वाढत जाणारा येथील मध्यमवर्ग यामुळं जगभरातील हँडसेट कंपन्यांना भारताचं आकर्षण न वाटतं तरच नवल! नोकियापाठोपाठ सॅमसंग, मायक्रोमॅक्स, कार्बन, मोटो, एलजी अशा किती तरी कंपन्या या बाजारपेठेत उतरल्या. हँडसेटचा आकारही वॉकीटॉकीपासून ते तळहातावर मावणाऱ्या छोट्या डबीएवढ्या आकारापर्यंत बदलत गेला. आता प्रत्येक घरात एक मोबाइल नव्हे, तर प्रत्येक व्यक्तीकडं एक मोबाइल असण्याचे दिवस आले होते. एसएमएसचं मार्केट प्रचंड होतं. त्यामुळंच टीव्ही शोवर मागवल्या जाणाऱ्या एसएमएसच्या स्पर्धांना सुरुवात झाली. झीवरच्या सारेगमपचं उदाहरण यासाठी पुरेसं ठरावं. जवळपास प्रत्येक रिॲलिटी शोचा विजेता हा या एसएमएसच्या माध्यमातून ठरवला जाऊ लागला. या एसएमएससाठी जास्त पैसे मोजावे लागायचे. शिवाय एरवी तुम्हाला विशिष्ट एसएमएस फ्री असले, तरी सणांच्या दिवशी प्रत्येक मेसेजला पैसे आकारण्याची टूम मोबाइल कंपन्यांनी काढली. मोबाइल कंपन्यांचा सगळा व्यवहार चालतो तो हवेतल्या तरंगपट्ट्यावर, अर्थात स्पेक्ट्रमवर. (या स्पेक्ट्रमच्या लिलावातूनच पुढं ए. राजा प्रकरण घडलं. पण इथं तो विषय नाही.) या स्पेक्ट्रमच्या ताब्यासाठी मोठमोठ्या मोबाइल कंपन्यांची युद्धं सुरू झाली. महानगरांची वेगळी सर्कल आहेत. त्यांच्यासाठी तर अधिकचे पैसे मोजण्याची वेळ आली. पाहता पाहता कॉलच्या रेटचंही युद्ध सुरू झालं आणि ग्राहकराजाची चांदी झाली. जगभरातल्या दरांच्या तुलनेत भारतीयांना फारच स्वस्तात सेवा मिळू लागली. इथल्या मार्केटचा अवाढव्य आकार हे त्याचं उघड गुपित होतं.
मार्केट वाढत चाललं, तसं ग्राहकांना नवीन काही देण्याची गरज कंपन्यांना भासू लागली. त्यातूनच मग जन्मला स्मार्टफोन. भारतात सॅमसंग या कोरियन कंपनीनं सर्वांत प्रथम स्मार्टफोन आणला आणि पाहता पाहता बाजारपेठ या फोनच्या प्रेमात पडली. 
काय नव्हतं या फोनमध्ये? चांगला कॅमेरा होता, संगीत होतं, भरपूर स्पेस होती, सर्वांत महत्त्वाचं म्हणजे इंटरनेट होतं, त्यामुळं फेसबुक होतं अन् व्हॉट्सॲपही... बघता बघता खिशातल्या स्मार्टफोननं अनेकांना आपल्या खिशात टाकलं. त्या प्रसिद्ध कंपनीच्या जाहिरातीत म्हटल्याप्रमाणं खरोखर सगळी दुनिया आता मुठीत आली होती. भारतात साधारणतः २००५-०६ मध्ये स्मार्टफोन मिळू लागले. पण २००८ नंतर ते सार्वत्रिक झाले. नोकिया कंपनी या स्पर्धेत फार मागं पडली आणि पुढं तर ही एके काळची बलाढ्य फिनिश कंपनी बघता बघता 'फिनिश' झाली. सॅमसंगनं आपला दबदबा भारतीय बाजारपेठेत कायम ठेवला. स्मार्टफोन हातात आल्यानं आपल्याला वेडावल्यासारखं झालं, यात शंका नाही. सतत अपडेट पाहणं, बोटांना सतत काही तरी टाइप करायचा चाळा लागणं, दर अर्ध्या मिनिटानं फोन उघडून काही अपडेट किंवा काही मेसेज आलाय का हे पाहणं, कानात इयरफोन घालून किंवा खाली मान घालून टाइप करत करत जवळपास वेड्यासारखं सगळीकडं हिंडणं या सवयी आता अनेकांना वाईट पद्धतीनं जडल्या आहेत. आता सध्या सेल्फीचं फॅड आहे. एके काळी गरजेच्या मानल्या गेलेल्या या स्मार्टफोनच्या अतिसवयीचं रूपांतर व्यसनात होऊ लागलं आहे. आता लवकरच फोर-जी तंत्रज्ञान सर्वत्र बोकाळेल. तेव्हा काय होईल याची कल्पना करणं सहज शक्य आहे. 
मोबाइल नावाच्या या साधनानं संवाद वाढवला, पण जवळच्या नात्यांतला संवाद मात्र संपुष्टात आणला. आता काही जणांनी यावर उपाय म्हणून स्मार्टफोनविना आयुष्य काढायचं, असं ठरवायला सुरुवातही केलीय. कुठलंही तंत्रज्ञान मानवाच्या भल्यासाठीच असतं. आपण त्याचा उपयोग कसा करून घेतो यावर त्याचं यशापयश अवलंबून असतं. आपण तंत्रज्ञानावर स्वार व्हायचं की तंत्रज्ञानाला आपल्यावर स्वार होऊ द्यायचं हा निर्णय शहाण्या माणसांना अवघड जाऊ नये. मोबाइल क्रांतीची द्विदशकपूर्ती साजरी करत असताना या वास्तवाचं भान कायम राहो, एवढंच!
---

(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे, २ ऑगस्ट २०१५)

----