28 Jul 2015

मसान रिव्ह्यू




चुकवू नये असा संगम
--------------------------- 


मसान हा चित्रपट पाहिल्यावर माझ्या मनात पहिली प्रतिक्रिया अशी आली, की या सिनेमाचं शीर्षक मसान (स्मशान) याऐवजी संगम असं हवं होतं. अर्थात संगम नावाचा यापूर्वीचा राज कपूरचा गाजलेला सिनेमा आणि या सिनेमाचा आशय यांचा अजिबातच संबंध नाही आणि केवळ तशी अनाठायी तुलना होऊ नये म्हणूनच निर्मात्यांनी हे शीर्षक टाळलं असावं. अन्यथा संगम हेच अत्यंत उचित असं शीर्षक आहे या कलाकृतीला....!
चित्रपटाच्या सुरुवातीला ब्रिजनारायण चकबस्त यांच्या ओळी येतात -
ज़िंदगी क्या है अनासिर में जहुर-ए-तरतीब
मौत क्या है इन्ही अज़ा का परेशान होना
(जगणं म्हणजे काय, तर सगळ्या गोष्टी सुरळीत असणं आणि मृत्यू म्हणजे काय, तर त्या केवळ विखुरणं...) मरणाला अजिबात न घाबरणाऱ्या, किंबहुना गंगेच्या कुशीत मरण म्हणजे मोक्ष असं मानणाऱ्या काशीत हे कथानक घडतं. स्मशानाचा संदर्भ येतो तो इथं! गंगा म्हणजे भारताची आदिम काळापासून चालत असलेली संस्कृतीच. या गंगेच्या काठी काशीच्या घाटांवर मसानची गोष्ट घडते. किंबहुना दोन व्यक्तींच्या दोन समांतर चालणाऱ्या गोष्टी घडतात आणि शेवटी त्यांचा संगम होतो. माणसाचं जगणं असतं अगदीच क्षणभंगुर... पण या साध्या जगण्यातही त्याला किती ताणतणावांना सामोरं जावं लागतं. आपणच हे जगणं अनेकदा गुंतागुंतीचं करतो. कधी आपल्याला नशिबात अचानक काही तरी घडतं आणि होत्याचं नव्हतं होऊन जातं. प्रेमाची गोष्ट असो की प्रेमभंगाची, काही तरी मिळतं आणि काही तरी निसटून जातं... अर्थात माणूस गेला तरी त्याचा आत्मा अमर असतो, या आपल्या तत्त्वज्ञानाप्रमाणेच गंगेच्या किनारीही तुम्ही काही तरी गमावता त्याच वेळी काही तरी तुम्हाला गवसलेलं असतं...
अनुराग कश्यपला गँग्ज ऑफ वसेपूरसाठी साह्य करणाऱ्या नीरज घायवाननं मसान दिग्दर्शित केला आहे. त्याचं सांगणं अगदी स्पष्ट आहे. अविनाश अरुणनं अप्रतिम टिपलेल्या वाराणसीच्या माध्यमातून तो हे त्याचं सांगणं ठामपणे सांगत राहतो. वरुण ग्रोव्हरनं लिहिलेली पटकथा मुळात भक्कम आहे. त्यामुळं नव्या-जुन्या पिढ्यांचा संघर्ष, काशीसारख्या सनातन शहरात राहणाऱ्या आजच्या काळातल्या तरुण पिढीची भावनिक आंदोलनं, जातीपातींचा प्रभाव, पोलिस यंत्रणेचा भ्रष्टाचार आणि सेक्ससारख्या माणसाच्या मूलभूत प्रेरणांबाबत होत असलेली त्यांची कुचंबणा म्हणा किंवा त्यात वाहवत जाणं म्हणा... हे सगळं या गोष्टींतून दिग्दर्शक मांडत राहतो. पुन्हा या सगळ्या प्रवासाला गंगेच्या अथांग आणि अथकपणे सुरू असलेल्या संथ प्रवाहाचा एक अनाहत नाद पार्श्वभूमीसारखा सतत ऐकू येतो आहे. ते घाट, तिथं सतत सुरू असलेले अंत्यसंस्कार किंवा दशक्रियांसारखे विधी, गंगेच्या पाण्यातून पैसे काढणाऱ्या छोट्या पोरांच्या जीवावर सुरू असलेला जुगार... हे सगळं आपल्याला सतत काही ना काही सांगत राहतात. आपल्या मृत्यूनंतरही आपलं जगणं संपत नाही, तर अन्य कुणाच्या मृत्यूमुळं ते संपण्याचं कारणच काय, असं सांगत राहतो...
देवी पाठक (रिचा चढ्ढा) आणि दीपक चौधरी (विकी कौशल) यांच्या आयुष्यात घडणाऱ्या दोन गोष्टी समांतरपणे आपल्याला दिसत राहतात. देवीनं मोहाच्या एका क्षणी केलेली चूक तिला आणि तिच्या विद्वान पित्याला पोलिसांकडून ब्लॅकमेल केलं जाण्यापर्यंत गेली आहे, तर दुसरीकडं डोम जातीचा दीपक गंगेच्या घाटावर मृतदेहांना अग्नी देण्याच्या कामापासून सुटका करून घेण्यासाठी जिद्दीनं शिक्षण घेतोय. देवीच्या आयुष्यातलं एकमेव प्रेम अचानक नष्ट झालंय, तर दीपकच्या वैराण आयुष्यात शालूच्या (श्वेता त्रिपाठी) रूपानं नुकतंच एक प्रेम उमलू लागलंय. देवी सगळं विसरून आयुष्यात पुढं जाऊ पाहते, तर दीपकच्या आयुष्यात अचानक एक वज्राघात होतो. सगळं काही उलटपालट होतं. हे दोन्ही प्रवाह आपापलं प्राक्तन घेऊन पुढं वाहत राहतात. सिनेमाच्या शेवटी त्यांचा संगम होणं अटळ असतं.
इंडो-फ्रेंच संयुक्त निर्मिती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती मूल्यं उच्च आहेत. दिग्दर्शकाची विषयावरची पकड जाणवतेच. अगदी साध्या साध्या प्रसंगांतून त्यानं यातलं नाट्य अधोरेखित केलं आहे. या दिग्दर्शकाला चित्रभाषा अवगत आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी शांतताच बोलते. देवी त्या प्रसंगानंतर घरी आल्यानंतर तिचे वडील ज्या पद्धतीनं व्यक्त होतात, तो प्रसंग किंवा देवी नंतर अलाहाबादमध्ये तिच्या दिवंगत मित्राच्या घरी जाते, तेव्हा फक्त दाराचं फाटक दाखवून आत काय घडलं असेल हे सूचित करणारा प्रसंग... किंवा दीपकचं त्या घाटावरचं उन्मळून पडणं असेल किंवा त्या छोट्या मुलाला अंगठी सापडण्याचा प्रसंग असेल... या सर्व जागा दिग्दर्शकानं सुरेख भरल्या आहेत.

अभिनयात सर्वांनीच उजवी कामगिरी केली आहे. रिचा चढ्ढाला तिच्या करियरमधला हा एक महत्त्वाचा रोल मिळाला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. तिनं देवी मनापासून उभी केली आहे. संजय मिश्रांचा विद्याधर पाठक जबरदस्त. हा माणूस भूमिकेत कायाप्रवेश करून शिरतो आणि त्या पात्राचे अगदी सूक्ष्मातिसूक्ष्म रंग दाखवतो. नवोदित कलाकार विकी कौशलनं दीपकच्या भूमिकेत कमाल केली आहे. श्वेता त्रिपाठीही गोड.
थोडक्यात, चुकवू नये असाच हा चित्रपट आहे.
---
निर्मिती :  दृश्यम फिल्म्स, फँटम फिल्म्स, मॅकॅस्सर प्रॉडक्शन्स आणि सिख्या एंटरटेन्मेंट
दिग्दर्शक : नीरज घायवान
पटकथा : वरुण ग्रोव्हर
संगीत : इंडियन ओशन
प्रमुख भूमिका : रिचा चढ्ढा, संजय मिश्रा, विकी कौशल, श्वेता त्रिपाठी, पंकज त्रिपाठी
दर्जा : चार स्टार
---

9 Jul 2015

'आकाशवाणी सिडनी'चे दिवस



जगातील काही काही शहरांविषयी आपल्याला उगाच एक आपुलकी, जिव्हाळा वाटत असतो. मला लहानपणापासून लंडन, पॅरिस आणि सिडनी या शहरांचं आकर्षण वाटायचं. कधी तरी या शहरांना भेट द्यावी, तिथं फिरावं असं वाटायचं. अजूनही वाटतं. तो योग अजून आला नसला, तरी यातल्या सिडनी या शहराशी माझे अचानक ऋणानुबंध जुळले. तेही माझ्या आवाजाच्या माध्यमातून! आणि तब्बल साडेसहा वर्षं हा सिलसिला सुरू होता. म्हणजे जुलै २००० ते डिसेंबर २००६ या काळात दर महिन्याला माझा आवाज सिडनीतली शेकडो मराठी माणसं ऐकत होती. अर्थातच आकाशवाणी सिडनीच्या माध्यमातून...
पहिल्यापासूनच सांगायला हवं. मी पुण्यात रानडे इन्स्टिट्यूटमध्ये पत्रकारितेचा पदवी अभ्यासक्रम (१९९९-२०००) करीत होतो, तेव्हाची ही गोष्ट. या एका वर्षाच्या अभ्यासक्रमात दिल्लीची ट्रिप हा एक आकर्षणाचा भाग असायचा. आमची दिल्ली ट्रिप झाली, त्यानंतर आमच्या शिक्षिका उज्ज्वला बर्वे यांनी आम्हाला त्या ट्रिपविषयी एक टिपण लिहायला सांगितलं. मी ते जरा रंजक पद्धतीनं, प्रवासवर्णन लिहावं तसं लिहिलं. ते त्यांना आवडलं असावं. त्या तेव्हा आकाशवाणी सिडनीसाठी दर आठवड्याला बातम्या सादर करायच्या. आता आकाशवाणी सिडनी हा काय प्रकार आहे, हे सांगायला हवं. सिडनीतल्या मराठी लोकांनी एकत्र येऊन राबवलेला हा एक हौशी उपक्रम आहे. तिथं विविध भाषक गटांना विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर काही टाइम-स्लॉट मिळतात. मराठी कार्यक्रम मंगळवारी आणि रविवारी सादर होत असत. हे दोन तासांचे कार्यक्रम तिथली बहुतेक मराठी मंडळी आवडीनं ऐकतात. तर त्या वेळी त्यांना भारतातल्या घडामोडींचा काहीसा रंजक पद्धतीनं घेतलेला मासिक आढावा असा एक कार्यक्रम माझ्याकडून हवा होता. साधारण दहा मिनिटांचा हा पीस असेल आणि तो दर महिन्याच्या चौथ्या रविवारी प्रक्षेपित होईल, असं ठरलं. मी आधी एक पायलट एपिसोड लिहून दाखवला. तो त्यांना आवडला. 'भारत डायरी' असं या कार्यक्रमाचं नाव ठरलं. मग जुलैच्या चौथ्या शनिवारपासून, म्हणजे २८ जुलै २००० या दिवसापासून आमचा हा 'भारत डायरी'चा सिलसिला सुरू झाला. मी तेव्हा सकाळमध्ये काम करतच होतो. विषयांची वानवा नसायचीच. रंजक पद्धतीनं लिहिण्याची हातोटी होती. शिवाय रेडिओसाठी बोलीभाषेत कसं लिहायचं... 'व' हा शब्द न वापरता कायम 'आणि' लिहायचं (कारण आपण बोलताना व म्हणत नाही...) वगैरे ते सगळं मला माहिती होतं. बर्वेबाईंनीच शिकवलं होतं. मला हे काम आवडायचं.

तेव्हा आकाशवाणी सिडनीचे डॉ. पुरुषोत्तम सावरीकर यांच्याशी माझी ओळख झाली. डॉ. सावरीकर हे एक भन्नाट व्यक्तिमत्त्व आहे. ते दर शनिवारी दुपारी त्यांचं क्लिनिक संपवून पुण्याला फोन करायचे. त्यांच्याकडच्या साडेबारा वाजता ते फोन करायचे. म्हणजे तेव्हा इथं सकाळचे सात किंवा आठ (हिवाळा-उन्हाळा यानुसार) वाजलेले असायचे. तेव्हा मी भाऊमहाराज बोळात रूमवर राहत असे. माझ्याकडं मोबाइल सोडा, पण लँडलाइन फोनही असण्याचा प्रश्नच नव्हता. मग मी दर चौथ्या शनिवारी बर्वे मॅडमच्या घरी जायचं असं ठरलं. मला रात्रपाळीच्या कामामुळं उशिरा उठायची सवय होती. पण चौथा शनिवार येऊ लागला, की माझं वेळापत्रक बदलायचं. साधारण दोन दिवस आधी, म्हणजे गुरुवारी व शुक्रवारी मी हा मजकूर हातानं कागदांवर लिहून काढत असे. दहा मिनिटांचा कार्यक्रम म्हणजे पाच ते सहा फुलस्केप पानं लिहावी लागायची. हा मजकूर घेऊन मी दर शनिवारी सकाळी सात-साडेसातपर्यंत बर्वेबाईंकडे जायचो. त्या तेव्हा डहाणूकर कॉलनीत राहायच्या. त्यांचं स्वतःचं बुलेटिनही असायचं. त्यामुळे भरपूर पेपर आजूबाजूला घेऊन त्या बुलेटिन लिहिण्याच्या गडबडीत असायच्या. त्यांचे यजमान सुनील यांच्याशीही चांगला परिचय झाला नंतर. त्यांच्या दोन्ही मुली तेव्हा लहान होत्या. त्या बऱ्याचदा झोपलेल्या असायच्या. मग आमची एक कॉफी व्हायचीच. बुलेटिन सुरू असताना दूधवाल्यानं डोअरबेल वाजवू नये, म्हणून सुनील दार उघडं ठेवून ती काळजी घ्यायचे. किंबहुना बुलेटिनचं रेकॉर्डिंग सुरू असताना कुठलाच आवाज व्हायला नको असायचा. पण आम्हाला एकदाही असा अडथळा कधी आला नाही. सावरीकरांचा फोन आला, की बहुतांश वेळा बर्वेबाई मला आधी तू डायरी सांग, असं म्हणायच्या. मग मी फोनवर ती वाचून दाखवायचो. आधी डॉक्टर ट्रायल म्हणून एखादं वाक्य म्हणायला सांगायचे. त्यांनी ओके म्हणून सांगितलं, की मी मंडळी नमस्कार, आकाशवाणी सिडनीसाठी मी- श्रीपाद ब्रह्मे - पुण्याहून भारत डायरी सादर करीत आहे, असं म्हणून सुरू करायचो. क्वचित कधी तरी अडखळायला झालं, तर पुन्हा पहिल्यापासून सादर करायला लागायचं. कारण तेव्हा त्यांच्याकडं व्हॉइस एडिटिंगची सोय नव्हती बहुतेक. मग वन टेक ओके व्हावं यासाठी माझी धडपड चालायची. पण पहिल्या भागापासूनच हे चांगलं जमलं असं वाटतं. माझं बुलेटिन झालं, की मग बर्वेबाईंच्या बातम्या सादर व्हायच्या. आणि मग सावरीकरांशी इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, की फोन संपत असे. सावरीकर नसतील, तर विजय जोशी फोन करायचे. (विजय जोशी हेही एक भन्नाट व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी प्लास्टिक कचऱ्यापासून रस्ते तयार करण्याचं तंत्रज्ञान शोधलं असून, त्यांना 'ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया' हा तिथल्या पद्म पुरस्कारासारखा सर्वोच्च सन्मान मिळाला आहे.) जोशी हे व्यक्तिमत्त्व एवढं मोठं आहे, याची मला तेव्हा मुळीच कल्पना नव्हती. मी अगदी निवांत त्यांच्याशीही बोलत असायचो. ते मला कायम श्रीपाद अशीच हाक मारायचे आणि ते मला आवडायचं. (तेव्हा मला ऑफिसमध्ये सगळेच ब्रह्मे अशी हाक मारायचे. मला ते मुळीच आवडायचं नाही. पण इलाज नव्हता. कारण माझ्याबरोबर श्रीपाद कुलकर्णी आणि मंदार कुलकर्णी हे दोघं असायचे. त्यामुळं मला श्रीपाद हाक मारली, तर कन्फ्युजन व्हायचं आणि कुलकर्णी हाक तर पुण्यात मारूच शकत नाहीत कुणी... सो, त्या दोघांना श्रीपाद अन् मंदार आणि मला मात्र सगळे ब्रह्मे म्हणायला लागले. पण बर्वेबाई आणि विजय जोशी हे अपवाद. असो.)
आकाशवाणी सिडनी हा हौशी उपक्रम असूनही ही मंडळी आम्हाला या सादरीकरणाचं मानधन द्यायची. दीपक बापट हेही या आकाशवाणी सिडनीच्या उपक्रमात असायचे. त्यांची माझी थेट ओळख कधी झाली नाही, पण त्यांच्या मातुःश्री शोभा बापट यांच्याशी झाली. कारण आमचं मानधन पुण्यात त्यांच्याकडून आमच्यापर्यंत पोचतं व्हायचं. मी एरंडवण्यात बापट आजींकडं जायचो. त्या अतिशय प्रेमळ होत्या आणि अत्यंत उत्साही होत्या. कायम एका वाटीत पेढा किंवा बर्फी आणि एक बाकरवडी असा खाऊ त्यांच्याकडं मिळायचा. क्वचित कधी तरी माझी पत्नीही बरोबर असायची. मग दोघांचाही पाहुणचार व्हायचा. बापट आजी सत्तरी ओलांडलेल्या होत्या, पण क्वांटास एअरलाइन्सच्या विमानानं त्या सिंगापूरचा हॉल्ट घेऊन एकटीनं मुलाकडं म्हणजेच दीपककडं सिडनीला जात असत.
आकाशवाणी सिडनीमुळं माझा आवाज आणि नाव सिडनीतल्या अनेक मराठी माणसांना माहिती झालं. विजय आणि अंजली श्रोत्रीय यांच्याशी घट्ट ओळख झाली. हे दांपत्य आधी सिडनीला होतं. आता ते पुण्यात परत आले आहेत. दोघंही अत्यंत हुशार आणि प्रेमळ. एकदा डॉ. सावरीकर पुण्यात आले. (ते मूळचे हैदराबादचे.) तेव्हा बर्वेबाईंकडं आम्हाला जेवायलाच बोलावलं. सावरीकरांनी आम्हाला 'आकाशवाणी सिडनी'च्या तेथील कार्यक्रमांची एक सीडी, एक मानपत्र आणि त्यांचं एक मासिक निघालं होतं, ते दिलं. खूप मजा आली.
'आकाशवाणी सिडनी'चा हा प्रवास डिसेंबर २००६ मध्ये संपला. माझे एकूण ७६ भाग लिहून झाले. दोन महिन्यांचा अपवाद सोडला, तर दर महिन्याला सलगपणे ही डायरी सादर झाली. नंतर माझ्या नगरच्या घरचा लँडलाइन फोन मी देऊन ठेवला होता. मी सुट्टीत घरी गेलो, तर तिथंही डॉक्टरांचा फोन यायचा आणि मी घरून डायरी सादर करू शकायचो. या ७६ भागांमुळं या साडेसहा वर्षांतील भारतातील प्रमुख घटनांचा एक महत्त्वाचा दस्तावेजच माझ्याकडं लिखित रूपात जमा झाला आहे. (या डायरीचे नमुना म्हणून पहिला आणि शेवटचा असे दोन भाग याच ब्लॉगवर खाली स्वतंत्रपणे दिले आहेत. जिज्ञासूंनी ते नक्की पाहावेत.)
'आकाशवाणी सिडनी'चे दिवस हा माझ्या आयुष्यातलाही खूप आनंददायक आठवणींचा काळ आहे. त्यासाठी बर्वेबाई, डॉ. सावरीकर, विजय जोशी, शोभा बापट आज्जी या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार...
---