24 Nov 2014

बलमा, ‘जाडा’ लगे...

फार्फार वर्षांपूर्वी मी लहान-कम्-कुमार होतो, तेव्हा गोविंदाचं एक गाणं फार फेमस होतं - ‘सरकाइलो खटिया... जाडा लगे...’ या गाण्यात नायिका नायकाला तो जाड असल्याबद्दल चिडवत असते, अशी आपली माझी समजूत होती. (आठवीत हिंदी सोडल्याचा परिणाम!) पण ‘जाडा’ म्हणजे थंडी हे कळल्यावर पुलंच्या शब्दांत सांगायचं, तर त्या भाषेच्या यथार्थ शब्दयोजना-सामर्थ्यावर माझे एकदम प्रेम बसले.
हिवाळा आणि जाडेपणा यांचं काय अद्वैत आहे, ते कळत नाही. पण तापमापकातल्या पाऱ्याची घसरण सुरू झाली, की इकडं ‘देहाची तिजोरी’ प्रसरण पावायला लागलीच म्हणून समजा. पण बँकेतल्या लॉकरसारखं हे वाढतं धन फार काही अभिमान बाळगावं असं नसतं. लहानपणी जी चरबी अंगावर चढली, की बाळसं धरलं म्हणून कौतुक व्हायचं तीच चरबी मोठेपणी आपली आबाळच करते. अतएव, हे वाढतं शारीरिक वजन कमी करण्याचे फंडे सुरू होतात. हल्ली तर फेसबुक, व्हॉट्सअप किंवा हाइक आदी सामाजिक कार्यामुळं एक बोटं सोडली, तर अन्य अवयवांच्या व्यायामाला वेळ मिळत नसल्यानं दुसऱ्या शॉर्टकट मार्गानं काही होतंय का, याचा शोध सुरू होतो. एखाद्या आजाराची साथ यावी, तसंच हे असतं. डेंगी किंवा स्वाइन फ्लू परवडले अशी ही ‘वेटलॉस’ची साथ असते. पेपरांतून चकचकीत कागदांतून वजन कमी करण्याचे शंभर उपाय (आणि त्यांच्या हजारोंच्या घरातल्या फिया) डोळ्यांसमोर नाचू लागतात. वास्तविक केवळ नुसती एवढी फी देण्याच्या कल्पनेनं आपलं वजन निम्मं कमी होऊ शकतं. (पण ही आयडिया अजून कुणी काढलेली नाही, तेव्हा तिचं पेटंट घेऊन ठेवावं हे बरं.)
डाएट नामक प्रकाराचं तर आता अजीर्ण झालंय. हे खाऊ नको, ते खाऊ नको, हेच पी, ते ढोसू नको... वगैरे आदेश कानी यायला लागतात. झणझणीत मिसळ-तर्री अन् वडापावला सोकावलेली आमची जठर, आतडं, प्लीहा, यकृत आदी मंडळी पालेभाज्यांचं सूप किंवा कडधान्याचा सुकामेवा पाहून कोमेजून जातात. त्यांच्याकडं बघवत नाही. पण काय करणार... चरबीचा इंडिकेटर ट्वेंटी-२० सामन्यातल्या शेवटच्या षटकांत धावा वाढाव्यात तसा वाढत असतो. हल्ली आहारशास्त्राची भरपूर पुस्तकं निघाली आहेत. मोठमोठ्या सेलिब्रिटींनी आपापल्या कमरा ती पुस्तकं वाचून शून्यावर आणल्या, हे वाचून मला सुन्न व्हायला झालं. 
 साइझ झिरोचं फॅड पुरुषांत नाही, हे केवढं बरं झालं, हा एकच विचार माझ्या मनात त्यानंतर आला. आम्हाला कंबर ३६ वरून ३८ वर जाण्याऐवजी ३४ कडं नेण्याचं अल्पसं ध्येयही झेपत नाही! या वाढत्या घेरामुळं नाही नाही ते ऐकून घेण्याची वेळ तेवढी आली. सामाजिक वर्तुळात माझ्या पोटाच्या अर्धवर्तुळाचीच जास्त चर्चा... कधीही, कुणीही, केव्हाही भेटलं, की पोटाकडं एक लूक देऊन ‘तब्येत सुधारलीय,’ असं जे कुचकटपणाच्या कमाल पातळीवर बोलतं ना, ते ऐकून धरणी दुभंगून तिच्या त्या मोठ्ठ्या पोटात घेईल, तर बरं असं वाटतं. अर्थात जाता जाता त्या लूकवाल्यालाही ‘पोटावर बोट ठेवायची गरज नव्हती,’ हे सुनावल्याशिवाय मी राहणार नाही. ‘पाठीवर बोला, पण पोटावर बोलू नका,’ असं एक ब्रीदवाक्य तातडीनं जाहीर वापरात आणलं पाहिजे. अहो, या वाढत्या चरबीमुळं माझी झोप उडविली हितचिंतक-कम्-हितदुष्टांनी. कोलेस्टेरॉल, लिपिड प्रोफाइल, बीएमआय, अँजायना, अँजिओग्राफी हे काय प्रकार आहेत, हे मला आत्ताआत्तापर्यंत माहिती नव्हतं. रशियाच्या ‘केजीबी’ किंवा इस्रायलच्या ‘मोसाद’ या गुप्तचर संस्थेत टोपणनावानं काम करणारे हे अधिकारी आहेत, असं कुणी मला सांगितलं असतं, तरी आपण ‘बाय हार्ट’ विश्वास ठेवला असता. पण त्या अधिकाऱ्यांपेक्षा अधिक माणसं मारणारे हे आपल्याच शरीरात लपून बसलेले दुष्ट गुप्तहेर आहेत, हे कळल्यावर माझी ‘धक धक’ वाढली. हार्टअटॅक येईल तेव्हा येईल, पण तो येईल या भीतीनं वजन कमी व्हायला हरकत नव्हती. पण चिंताग्रस्त होऊन, मी सुन्न की कायसा होऊन बसूनच राहिल्यानं वजन पुन्हा वाढलं.
हिवाळा हा मेदवृद्धी करणारा ऋतू आहे, असं कुठल्याशा अरसिक गुरुजींनी कुठं तरी लिहून ठेवलं आहे. पण त्याहीपेक्षा तो मोदवृद्धी करणारा ऋतू आहे माझ्यासाठी! या काळात पहाटेची साखरझोप जशी लागते तशी ती अन्य ऋतूंत लागत नाही. या साखरझोपेनं मधुमेह होत नाही, हे सांगायला नकोच. ही साखरझोप वसंत बापटांच्या शब्दांत सांगायचं, तर पहाटे पहाटे जे साखरचुंबन देऊन जाते ना, बस्स, त्यासाठी आपल्याला हा ऋतू आवडतो! गोधड्यांवर गोधड्या अंगावर घेऊन उन्हं चांगली वर येईपर्यंत झोपून राहण्यात जे सुख आहे, ते पहाटे उठून फिरायला जाणाऱ्यांना कधीच कळणार नाही. मीही कधी काळी बहकलो होतो आणि पहाटे उठून व्यायाम करण्यासाठी म्हणून पर्वतीवर वगैरे जायचो. मात्र, पर्वती उतरून आल्यावर तुडुंब मिसळ खाऊन, दुपारी पुन्हा भरपेट जेवून झोपण्याच्या सवयीमुळं वजन ‘जैसे थे’च राहिलं, तेव्हा कुठं मला पर्वतीवर जाणाऱ्यांचं खरं प्रयोजन कळलं. वजन कमी करण्यासाठी जिम वगैरेचा नाद तर मी कधीच केला नाही. ‘जिम पोरा जिम’ हे गाणं माझ्या आयुष्यात कधी वाजलं नाही. ती एक राहून गेलेली गोष्ट आहे. मात्र, अनेक जण जिम करतात. अगदी देवधर्म करावा तशा भक्तिभावानं जिम ‘करतात’. छान तब्येतही कमावतात. (त्याहीपेक्षा छान पैसे गमावतात.) अन् नंतर येऊन सांगतात, काय राव, एवढी जिम लावली, पण वजन पाहिजे तसं उतरलं नाही. तेव्हा भूतदयाळू नजरेनं त्यांच्याकडं पाहण्याची दुर्मिळ संधी मला मिळते. आखाडा वगैरे गोष्टींना तर मी कल्पनेतही हात लावला नाही. एक तर उघड्याबंब अंगानं केवळ लंगोट लावून चार-चौघांत फिरणं मला जमणार नाही. शिवाय ती अंगाला माती लागते, तेही आपल्याला नाही आवडत! आखाड्यापेक्षा आखाड आवडीचा. आखाडातले खाण्याचे साटोऱ्या वगैरे पदार्थ मला प्रिय... म्हणून शड्डू ठोकले, पण शाब्दिक!
त्यातल्या त्यात सकाळी चालणे ही एक चांगली क्रिया आहे. पण त्यासाठी सकाळी लवकर उठणं हे एक कटकटीचं उपकलम आहे. त्यावर उपाय म्हणून मी आपण जेव्हा केव्हा उठू, त्यानंतर चालायचं असा निर्धार केला आणि तो बऱ्यापैकी टिकवला. चालता चालता गावभरच्या गप्पा मारता येतात, रेडिओ ऐकता येतो आणि आरजे मुलींची बडबड ऐकून दिवसभरात कुठलाही शाब्दिक आघात पचवण्याची सहनशीलता अंगी येते. (ज्यांना लेडी बॉस आहे, त्यांनी हा उपाय करून बघायला हरकत नाही.) केवळ ४०-४५ मिनिटं झपझप चालण्यानं आपलं वजन स्थिर राहू शकतं, या विचारानं आता मला फारच हुरूप आला आहे. या आनंदापोटी रसमलाई, बासुंदी अन् आम्रखंडाचं त्रिखंडी जेवण ओरपून आत्ता हे लिहीत बसलोय. नुसतं लिहीतच बसणं मला केव्हाही पटलं नाही आणि जमलं नाही. त्यामुळं एवढं लिहिताना बशीभर शेंगादाणे, वाटीभर डाळिंबाचे दाणे, हे उगाच आपले एवढेसे पावकिलो ओले मटार, प्लेटभर मनुका, काजू, बदाम आणि सहज तोंडी टाकायला म्हणून अंजीरबर्फी इतकंच घेतलं... एवढं तर लागतंच ना हो वाढत्या अंगाला... चला, हे आटपलं की मिसळ पार्टी आहे अन् लगेच त्या प्रसिद्ध डायनिंग हॉलमध्ये जायचंय जेवायला! अन् हो, संध्याकाळी आमच्या त्या फेमस समोसेवाल्याचा समोसा खाल्ल्याशिवाय आपल्याला नाही बुवा चैन पडत... रात्री परत मस्त ओली पार्टी आहे, त्यामुळं आज एकच समोसा खाणार... नक्की एकच. डाएट कॉन्शस आहे मी तसा!

(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे - संवाद पुरवणी - २३ नोव्हेंबर २०१४ )
----

16 Nov 2014

जडणघडणीचे दिवस...



मी कधी पत्रकार म्हणून काम करीन असं मला आयुष्यात वाटलं नव्हतं. पण आपल्या आयुष्यात आपण काय व्हायचं, हे फारच थोड्या लोकांना आधी ठरवता येतं. माझंही तसंच झालं. चांगला मेकॅनिकल इंजिनीअरचा डिप्लोमा थर्ड इयरला सोडून देऊन मी नगरमध्ये लोकसत्ता’त प्रूफरीडर म्हणून काम धरलं, तेव्हा ‘भिकेचे डोहाळे’ हा शब्द कुणी वापरला नसला, तरी अनेकांच्या चेहऱ्यावरचे भाव तेच होते. मला मात्र दुसरं काही येईल असं वाटत नव्हतं. पेपरमधलं काम मात्र फार चित्ताकर्षक वाटत होतं. मी केवळ प्रूफरीडर नव्हे, तर चांगला उपसंपादक होऊ शकतो, हे माझे तिथले गुरुजी सतीश कुलकर्णी यांनी हेरलं आणि मला पुण्याला पाठवलं.
पुण्यातल्या लोकसत्तातही मी प्रूफरीडिंग करत होतो, पण त्याच वेळेस सकाळ’मध्येही ट्रेनी जर्नालिस्ट म्हणून अर्ज पाठवला होता. जुलै १९९७ मध्ये आमची तिथं लेखी परीक्षा झाली. शेकडो लोक आले होते. अनेक वर्षांच्या कालखंडानंतर सकाळमध्ये भरती होत होती, असं कळलं. मी तर साधा पदवीधरही नव्हतो, ना माझ्याकडं पत्रकारितेचं काही औपचारिक शिक्षण होतं... पण महिनाभरानं मला चक्क मुलाखतीचा कॉल आला. तरीही माझी निवड होईल, अशी मला मुळीच शक्यता वाटत नव्हती. (स्वतःला ओव्हर अंडरएस्टिमेट करायची सवय तेव्हापासूनचीच!) तेव्हा सुरेशचंद्र पाध्ये, उत्तम कांबळे, राधाकृष्ण नार्वेकर आणि अनंत दीक्षित या चार ज्येष्ठांनी माझा पहिला इंटरव्ह्यू घेतला. पाध्ये सरांनी काही कौटुंबिक प्रश्न विचारले. कांबळे सरांनी मला सध्या शेतीचा कोणता हंगाम सुरू आहे, असं विचारलं. मी 'खरीप' असं (योग्य) उत्तर दिलं. दीक्षित सरांनी काही प्रश्न विचारले. नार्वेकरांनी एकही प्रश्न विचारला नाही.
मी नर्व्हस होऊन बाहेर बसलो होतो. तिथं मुलाखतीला आलेला एक जण बसला होता. तो मला म्हणाला, अरे, तू ब्रह्मे का? तू एवढा नर्व्हस का दिसतोयस? तुला शंभरपैकी ७६ मार्क आहेत लेखी परीक्षेत. तू पहिला आला आहेस. तेव्हा तुझं सिलेक्शन झाल्यात जमा आहे. माझंही सिलेक्शन होणार आहे. मला ७२ (की ७३) मार्क आहेत. इंटरव्ह्यू होण्याच्या आत सकाळमधील अंतर्गत यंत्रणेत शिरून आमचे मार्क काढून घेणाऱ्या त्या आत्मविश्वासू मित्राला मी नाव विचारलं. ‘मी संजय आवटे, तुझ्या शेजारच्याच करमाळ्याचा, केत्तूरचा, असं उत्तर त्यानं दिलं(मी जामखेडचा!) आवटेच्या दिलाशानंतरही मला विश्वास वाटत नव्हता; पण थोडा धीर आला इतकंच. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळचे संपादक विजय कुवळेकर आणि मॅनेजर के. मो. भिडे या दोघांनी कुवळेकर साहेबांच्या केबिनमध्ये माझा इंटरव्ह्यू घेतला. मी लिहिलेला पेपर त्यांच्या हातात होता. मी कुठं राहतो, असं कुवळेकर साहेबांनी विचारलं. भाऊमहाराज बोळात,’ मी उत्तर दिलं. त्यावर ते भिडेंकडं पाहून हसले. का, ते मला नंतर कळलं. ते सुरुवातीला पुण्यात आले, तेव्हा तिथंच राहत होते म्हणे. मी पु. लं. वर त्यात काही तरी लिहिलं होतं. त्यात पु. लं.चा विनोद निर्विष असतो, असं मी लिहिलं होतं. निर्विष’ हा शब्द कुणाचा आहे, असा प्रश्न त्यांनी मला विचारला. तो शब्द अर्थातच माझा नव्हता. मी वाचलाय कुठं तरी, असं काही तरी उत्तर मी दिलं आणि मुलाखत संपली. दुसऱ्या दिवशी मला एक सप्टेंबर रोजी हजर होण्याबाबतचा फोन आला. आवटेचं म्हणणं खरं ठरलं होतं. तो, मी, मंदार कुलकर्णी, श्रीपाद कुलकर्णी, सूरश्री चांडक आणि आणखी एक संजीव ओहो‍ळ नावाचा मुलगा असे आम्ही सहा जण सिलेक्ट झालो होतो. (हा संजीव नंतर आठवड्याभरातच, त्याची तहसीलदार म्हणून निवड झाल्यानं सोडून गेला. यापैकी सूरश्रीही लग्न होऊन नंतर दोन वर्षांत काम सोडून गेली. संजय साधारण आठ-दहा महिन्यांनी लगेचच सोलापूरला संचार’मध्ये वृत्तसंपादक म्हणून गेला. मी, मंदार आणि श्रीपाद २०१० पर्यंत सकाळमध्ये एकत्र राहिलो. नंतर मी आधी बाहेर पडलो आणि नंतर श्रीपाद... आम्ही दोघंही महाराष्ट्र टाइम्स’मध्ये जॉइन झालो. मंदार कुलकर्णी अजूनही ‘सकाळमध्ये आमच्या बॅचचं प्रतिनिधित्व टिकवून आहे...) आम्हाला पहिल्याच दिवशी कुवळेकर साहेबांनी त्यांच्या केबिनमध्ये बोलावून अनेक सूचना दिल्या. त्या एवढ्या कडक होत्या, की पुढं आपलं कसं होणार, असंच आम्हा सगळ्यांना वाटलं. पण कुवळेकर साहेबांसमोर एक शब्द बोलण्याची कुणाची प्राज्ञा नव्हती. ना आम्ही कुठल्या शंका विचारल्या, ना काही प्रश्न उपस्थित केले... माझ्या पगाराविषयी एक अडचण निर्माण झाली होती. ती मी पाध्ये सरांच्या कानावर घातली आणि ती त्यांनी तत्काळ दूर केली.
 ...तर आम्हा पाच ट्रेनी पोरांना सकाळचे तत्कालीन सहसंपादक राजीव साबडे यांच्या ताब्यात देण्यात आलं. साबडे सरांच्या हाताखाली आम्ही शिकत होतो. पत्रकारितेचे एकेक धडे गिरवत होतो. मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या नगर केंद्रात यापूर्वीच बी. .साठी प्रवेश घेतला होता. दर आठवड्याला रविवारी सकाळी नगरला क्लासेस असत. मला तेव्हा शनिवारी सुट्टी होती. शुक्रवारची नाइट संपवून मी नगरला घरी जात असे. शनिवारचा दिवस पूर्ण घरी आणि रविवारी सकाळी न्यू आर्टस कॉलेजमध्ये बी. . चे दोन-तीन क्लास करून सायंकाळी सहाला पुण्याला ऑफिसात पुन्हा नाइटसाठी येत असे. ट्रेनिंग पीरियडमध्ये आम्हाला एकेक आठवडा एकेका सेक्शनला काम करावं लागे. एक आठवडा रिपोर्टिंग, मग एक आठवडा डेस्क म्हणजे उपसंपादकी, मग एक आठवडा क्रीडा विभाग आणि लायब्ररी मिळून, तर चौथा आठवडा प्रांतिकला. हा प्रांतिक’ शब्द मला नवा नसला, तरी सकाळमध्ये तो प्रादेशिक बातम्यांचा विभाग अशा अर्थानं वापरत असल्याचं मी प्रथमच ऐकत होतो. ‘सकाळमध्ये संपादकीय विभागात काही टिपिकल शब्द वापरले जात, त्यातला हा एक. दुसरा एक म्हणजे वाढावा. एखाद्या मजकुराचा वाढावा काढणे म्हणजे पान १ वरून तो पुढे कुठल्या तरी पानावर कंटिन्यू करणे. अनेक वृत्तपत्रांत याला कंटिन्यूएशन देणे असंच म्हणतात. पण सकाळमध्ये मात्र ‘वाढावा काढणे’ हा खास मराठी शब्द वापरला जातो. बातमीदार’ हाही खास सकाळचा शब्द. आम्ही ‘लोकसत्ता’त वार्ताहर म्हणत असू. सकाळमध्ये बायलाइन देण्याची पद्धत तेव्हा उदा. ‘श्रीपाद ब्रह्मे यांजकडून’ अशी होती. अन्य वृत्तपत्रांत केवळ नाव असे. याशिवाय डेटलाइनमध्ये ‘ता.’ (तारीख) हा शब्दही केवळ सकाळमध्येच वापरला जात असे. प्रतिनिधी वगैरे असं नाव देण्याचीही पद्धत नव्हती. बायलाइन नसेल, तर थेट डेटलाइनने बातमी सुरू व्हायची. जाहिरात डमी किंवा नुसतंच डमी हाही शब्द नवा नसला, तरी डमी आली का रे, या आरोळीला किती महत्त्व आहे, ते संपादकीय विभागातच कळतं. डमी म्हणजे दुसऱ्या दिवशीचं वृत्तपत्र किती पानांचं आहे आणि त्यात प्रत्येक पानात किती जाहिराती असतील, याचा अंदाज देणारं शीट. या डमीनुसार संपादकीय विभागाला रोज आपल्या कामाचं नियोजन करावं लागतं. असो.
तर आमच्या ट्रेनिंगला सुरुवात झाली. साबडे सरांनी आम्हाला एक वही करायला सांगितली आणि प्रत्येक दिवशी काय काम केलं हे त्यात नोंदवून ठेवायला सांगितलं. मला डायरी लिहायला आवडायचंच. मग मी अगदी पहिल्या दिवसापासून या नियमाचं काटेकोर पालन करायला सुरुवात केली. ही वही आजही माझ्याकडं आहे. अधूनमधून ती काढून वाचणं हा माझ्या स्मरणरंजनाचा एक भाग झालाय
तेव्हा सकाळमध्ये डेस्कला विजय साळुंके, अशोक रानडे, मुकुंद मोघे, यमाजी मालकर, लक्ष्मण रत्नपारखे, अनिल पवार, नवनीत देशपांडे, गोपाळ जोशी, मुकुंद लेले, उदय हर्डीकर आदी मंडळी कामाला होती. अर्थमंथनला प्रभाकर खोले आणि चंद्रशेखर पटवर्धन होते. साबडे आणि वरुणराज भिडे सर दोघेही सहसंपादक होते आणि अग्रलेखाच्या पानाचं काम पाहायचे. रिपोर्टिंगला मल्हार अरणकल्ले, सुधीर भोंगळे, रमेश डोईफोडे, संतोष शेणई, श्रीधर लोणी, निसार शेख, आबिद शेख आदी मंडळी होती. अरणकल्ले मुख्य वार्ताहर होते तेव्हा. रविवारला स्वाती राजे, ऋता बावडेकर, वर्षा कुलकर्णी होत्या, तर स्वाती महाळंक, नयना निर्गुण, अस्मिता खोले, मीना संभू ‘प्रांतिक’ला होत्या. प्रल्हाद सावंत, शशिकांत भागवत, पराग करंदीकर हे क्रीडा विभागातील सहकारी होते, तर संदेश भंडारे, प्रल्हाद खरात, वल्लभ कुलकर्णी हे फोटोग्राफर होते. नंतर थोड्यात दिवसांत अनंत कुलकर्णी आणि गजेंद्र कळसकर त्यांना जॉइन झाले. या नावांवर नजर टाकली तरी लक्षात येईल, की आम्ही तसे नशीबवान होतो. या सर्वांसमवेत काम करून आमचा पत्रकारितेचा पाया खरोखर पक्का, मजबूत झाला
 एखाद्या मोठ्या व्यक्तीचं निधन झालं, की त्याचं अल्पचरित्र लिहायचं अशी वृत्तपत्रांत पद्धत आहे. मी ट्रेनी असताना अशी अनेक अल्पचरित्रं लिहिली. गो. नी. दांडेकर, यशवंत दत्त, मालती पांडे-बर्वे, ‘काँटिनेंटल’चे अनंतराव कुलकर्णी ही त्यातली काही. मार्च १९९८ मध्ये वाजपेयी पुन्हा पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांचंही चरित्र मी लिहिलं. हर चुनौती से दो हाथ मैंने किए या नावानं ते प्रसिद्ध झालं. सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षा झाल्या, तेव्हाही त्यांचा प्रवास लिहिला. हा सर्व संकलित मजकूर असल्यानं त्यावर लिहिणाऱ्याचं नाव देण्याची पद्धत सकाळ’मध्ये नव्हती. मात्र, हे सर्व लेख आजही माझ्याकडं आहेत आणि ते आज वाचताना मी तेव्हा बऱ्यापैकी लिहीत होतो, असंच तटस्थपणे विचार करता वाटून जातं. गोनीदां’च्या वेळी थोडी गंमत झाली. नोव्हेंबर की डिसेंबर १९९७ मध्ये अप्पांची प्रकृती बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा मला अरणकल्लेंनी बोलावून सांगितलं, की त्यांचं चरित्र तयार कर. मी ते लगेच ग्रंथालयात जाऊन, संदर्भांची मदत घेऊन तयारही केलं. तेव्हाचे ग्रंथपाल सुरेश जाधव सर खूप उत्साही होते आणि ते आम्हाला कायम मार्गदर्शन करायचे. (सकाळमध्ये रुजू झाल्याच्या पहिल्याच दिवशी मी ग्रंथालयात जाऊन, त्यांना माणूस चंद्रावर उतरला’ तेव्हाचा ‘सकाळ’चा अंक दाखवायची विनंती केली होती.) सुदैवानं अप्पांची प्रकृती ठीक झाली आणि मी लिहिलेला मजकूर वापरण्याची वेळ आली नाही. मी तेव्हा २२ वर्षांचा म्हणजे तसा लहानच होतो. त्यामुळं आपण खपून तयार केलेला २०-२२ पानांचा मजकूर वाया गेल्याचं पाहून मला मनातून वाईटच वाटलं. पुढं सहा महिन्यांनी एक जून १९९८ रोजी अप्पा निवर्तले आणि सकाळच्या ग्रंथालयात मीच तयार करून ठेवलेलं त्यांचं अल्पचरित्र अंकात वापरलं गेलं


जॉइन झाल्यानंतर पंधरा दिवसांतच मला संस्थेसाठी रक्त सांडावं लागलं आणि झुंजार(की पळपुटा?) पत्रकार हे बिरुद मीच माझ्यामागं लावून घेतलं. ते गणपतीचे दिवस होते आणि विसर्जन मिरवणुकीत मी आणि श्रीपाद कुलकर्णी सहभागी झालो होतो. आम्हाला असाइनमेंटच होती. पहाटे पाच वाजता लक्ष्मी रोड आणि बाजीराव रोड जिथं छेदतात, त्या लिंबराज महाराज चौकात अनिल भोसलेंच्या मंडळानं काही वादातून ठिय्या दिला. तेव्हा चंद्रकांत उघडे डीसीपी होते. त्यांनी लाठीचार्जचा आदेश दिला. मी आणि श्रीपाद एकमेकांचा निरोप घेऊन तो नूमविकडं आणि मी शनिपाराकडं निघालो होतो. एसआरपीएफच्या लाठीचार्ज’मध्ये मी सापडलो. मला काय करावं ते न कळून मी जनतेसोबत पळत सुटलो आणि डावीकडं तुळशीबागेत घुसलो. सगळ्या परिसरात चपलांचा खच पडला होता. समोरून एक पोलिस आला आणि त्याच्या लाठीचा तडाखा मला बसला. तो वाचविण्यासाठी मी खाली वाकलो आणि डोक्यातच लाठी लागली मागून. मग मात्र मी कळवळलो आणि तसाच रूमवर गेलो. तिथं पाहिलं तर माझ्या डोक्यातून रक्त येत होतं. रूममेट्सनी काही हळद वगैरे लावून उपचार केले. मग मला बरं वाटलं आणि मी झोपलो ते थेट दुपारी एकला उठलो. आवरून आधी ऑफिसला गेलो. कारण बातम्या द्यायच्या होत्या. त्या चौकात पलीकडं उभ्या असलेल्या सकाळमधल्या सहकाऱ्यांनी मला पळताना पाहिलं होतं. त्यामुळं मला लागलं आहे ही बातमी आधीच पाध्ये साहेबांपर्यंतच पोचली होती. (तेव्हा मोबाइल निवडक लोकांकडंच होते.) मी ऑफिसात आल्यावर त्यांनी मला बोलावून घेतलं. तातडीने डॉक्टरांना दाखवून यायला सांगितलं. एक तर ती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशीची दुपार. त्या वेळी बाजीराव रोडवर काय माहौल असतो, याची आपल्याला कल्पना आहेच. तशा वातावरणात मी डॉक्टर शोधत निघालो. बिनीवालेंचा दवाखाना मागंच आहे. पण तो बहुतेक बंद होता. मग मी एक डॉ. सेठी म्हणून होते, त्यांना दाखवलं आणि पुन्हा पाध्ये साहेबांकडं येऊन, मी उपचार घेतल्याचं कळवलं. त्यांनी लगेच मला घरी जाऊन विश्रांती घ्यायला सांगितलं. वास्तविक मला तेव्हा बरं वाटत होतं. पण पडत्या फळाची आज्ञा झेलून, मी माझी बातमी लिहिली आणि लगेच रूमवर रवाना झालो. या घटनेनंतर एक झालं. आम्हा सर्वांना तातडीनं ओळखपत्रं देण्यात आली.
 रिपोर्टिंगचा आठवडा मला आवडे. मी सायकलीवरूनच सगळीकडं जात असे. भारत इतिहास संशोधक मंडळ, शिवाजी मंदिर, वेदशास्त्रोत्तेजक सभागृह, मंडई, पुणे मराठी ग्रंथालय, गरवारे सभागृह, पदमजी हॉल, बालगंधर्व, महापालिका, शनिवारवाडा, फरासखाना, फर्ग्युसनचं अॅम्फी थिएटर, विद्यापीठ, गुलटेकडी मार्केट यार्ड, कँटोन्मेंट, पोलिस कमिशनर ऑफिस, शिवाजीनगर, स्वारगेट बसस्टँड, लक्ष्मी रोड ही बातम्या गोळा करण्याची किंवा वार्तांकनाला जाण्याची ठिकाणं होती. (अजूनही तीच आहेत.) दिघीच्या एआयटीच्या पदवीप्रदान समारंभालाही गेलो. संजीवनी विद्यालयाच्या अमृतमहोत्सवानिमित्त पाचगणीलाही गेलो. तेव्हा प्रत्येक बीटच्या बातमीदारासोबत त्या त्या बीटवर जायचं असं आम्हाला सांगितलं होतं. गणपती आले होतेच. मी आमच्या ऑफिसच्या आजूबाजूला फिरून एक बातमी लिहिली. ‘अवघ्या शहरावर उत्सवाचा रंग...’ अशा शीर्षकानं ती पान ५ वर छापून आली, तेव्हा मला प्रचंड आनंद झाला होता. वास्तविक या बातम्यांवर आमचं नाव नसे. तरीही मी बातमीला चौकोन करून तो पेपर जपून ठेवत असे. गणपतीत आम्ही एकेक दिवस वाटून घेतला आणि तसं रिपोर्टिंग केलं. सकाळची गाडी बरोबर असे. ड्रायव्हर आणि एक फोटोग्राफर असे आम्ही तिघं जात असू. मी अण्णा खरातांसोबत घोरपडी, मुंढवा, कोंढवा, साडेसतरा नळी वगैरे नाही नाही त्या ठिकाणी जाऊन आलो. ही ठिकाणं मी माझ्या आयुष्यात पूर्वी कधी पाहिलीही नव्हती. पण ‘सकाळ’ची गाडी आल्याबरोबर त्या मंडळांकडून आम्हाला फारच मान मिळत असे. नारळ (पुण्यातल्या भाषेत सांगायचं तर श्रीफळ) तर हमखास मिळेच. आम्ही ऑफिसात पहाटे परत येत असू, तेव्हा जीपची मागची बाजू नारळांनी भरून गेलेली असे. मी रिपोर्टिंगला असतानाही ‘सकाळ’च्या या दबदब्याचा अनेकदा अनुभव येई. केवळ मी (म्हणजे ‘सकाळ’चा प्रतिनिधी म्हणून) अजून यायचो आहे, म्हणून पत्रकार परिषदा सुरू व्हायच्या थांबल्याचा अनुभव अनेक वेळेला घेतला आहे. अर्थात मी बहुतांश प्रसंगी वेळेतच जात असे, हा भाग सोडा. पण तिथं गेल्यावर हमखास जाणवे, की आयोजकांचं आपल्या येण्याकडं खास लक्ष आहे. (पुढं एकदा एका सिनेमाच्या प्रेस कॉन्फरन्सची गंमत सांगतो. मी मागे आहे, हे त्या दिग्दर्शकाला माहिती नव्हतं. त्याचं विमान केव्हाच वर उडायला लागलं होतं. तो त्याच्या सहकाऱ्यांना माझं नाव घेऊन सांगत होता, की हा माणूस आपल्याला महत्त्वाचा आहे. याच्याकडं लक्ष द्या. शेवटी त्याच्या मित्रांनी त्याला ढोसून सांगितलं, की जरा थांब. तो आपल्या मागंच उभा आहे.) अर्थात, हे सगळं महत्त्व त्या संस्थेला आहे आणि आपण निमित्तमात्र प्रतिनिधी आहोत, याचं भान मी कधीही सोडलं नाही आणि कुठली हवा डोक्यात जाऊ दिली नाही. पण ही परिस्थिती आम्ही सगळे एंजॉय नक्कीच करायचो. अनेकदा प्रेस कॉन्फरन्स झाली किंवा कुठलाही कार्यक्रम झाला, की बाहेर सर्व पत्रकारांचं कोंडाळं एकत्र जमायचं आणि लीड (बातमीचा गाभा, सुरुवात) काय काढायचा, यावर सामुदायिक चर्चा चालायची. विशेषतः ‘सकाळ’चा माणूस काय ‘लीड’ करणार आहे किंवा त्यानं काय लीड काढावं याकडं अनेकांचं लक्ष असायचं. शेवटी एखादा समान मुद्दा निघायचा आणि हेच लीड काढू या असं काही तरी ठरवून ती स्टँडिंग कमिटीची मीटिंग संपायची. (हे अजूनही चालू असतं.)
डेस्कवरचं कामही मी मनापासून करायचो. मला भाषांतर करायचं काम आव्हानात्मक वाटे. संदर्भ अडला, तर ग्रंथालय, शब्दाचा अर्थ कळला नाही तर ज्येष्ठ सहकाऱ्याला विचारणे किंवा डिक्शनरी, एखाद्या विविक्षित क्षेत्रातला पारिभाषिक शब्द असेल, तर त्यातील तज्ज्ञाला फोन लावून विचारणे या सगळ्या चांगल्या सवयी लागल्या, त्या डेस्कवर. काय वाट्टेल ते झालं, तरी चुकीची माहिती किंवा शब्द अंकात जाता कामा नये, यावर सर्वांचा कटाक्ष असायचा. कारण सकाळची वाचकसंख्या मोठी होती. शिवाय आम्हाला सांगितलं जायचं, की आपला अंक एकाच वेळी विद्यापीठाचे कुलगुरूही वाचणार आहेत, शहरात राहणारे मोठमोठे सेलिब्रिटीही वाचणार आहेत आणि त्याच वेळी मार्केट यार्डातला शेतकरीही वाचणार आहे. त्यामुळे या दोघांनाही कळेल अशाच भाषेत बातमी लिहिली गेली पाहिजे. हे कुणालाही पटण्यासारखं होतं. ‘सकाळ’च्या तिसऱ्या मजल्यावर समोरच स्टेशनवरचा एक हमाल ‘सकाळ’ वाचतो आहे, असा फोटो अनेक वर्षं होता. तो मला आवडायचा.
सकाळ’मध्ये एक जानेवारीला होणारा वर्धापनदिनाचा कार्यक्रम हाही एक सोहळा असायचा. शिकण्याचाच भाग असायचा. तिथं वेगवेगळ्या क्षेत्रांतले सेलिब्रिटी यायचे. (दिवंगत) बॅरिस्टर भास्करराव घोरपडे, अनिल अवचट, अण्णा हजारे या व्यक्तिमत्त्वांशी माझा परिचय झाला तो या सोहळ्यातच.
सुमारे वर्षभर आमचं हे ट्रेनिंग चाललं आणि नंतर सहा महिन्यांनी आम्ही परमनंट झालो. मग आम्हाला ठराविक विभाग कायमस्वरूपी काम करण्यासाठी मिळाले. मी मुख्य डेस्कवर आलो. त्यानंतरच्या दिवसांविषयी नंतर कधी तरी... पण जडणघडणीचं हे दीड वर्ष माझ्यासाठी तरी पुढील करिअरची पायाभरणी करणारं असंच होतं यात शंका नाही. मी या काळाविषयी आणि त्यात मला शिकवणाऱ्या सर्वांविषयी कृतज्ञ आहे!

-----
(पूर्वप्रसिद्धी - चपराक दिवाळी अंक 2014)
----