27 Feb 2024

आपले छंद दिवाळी अंक २३ - लेख

नातं रूपेरी पडद्याशी...
---------------------------


रूपेरी पडद्यावर रंगणारी अनेक नाती आपण पाहतोच; पण ती पाहत असताना त्या रूपेरी पडद्याशीच आपले वेगळे भावबंध तयार होतात. आपल्या आयुष्यातील कधीही पूर्ण न होणारी रंगीत स्वप्नं दाखवणारा सिनेमा आणि हे सगळं जिथं घडतं ते सिनेमा थिएटर यांच्याशी आपलं अनोखं नातं जडतं. हे नातं मात्र ‘फिल्मी’ किंवा खोटं खोटं नसतं, कारण त्याला आपल्या संवेदनांची, भावभावनांची, मनोज्ञ आठवणींची पटकथा जोडलेली असते...

....

आपल्या आयुष्यात जन्माला आल्यापासून आपण वेगवेगळ्या नात्यांमध्ये बांधले जातो ते थेट शेवटचा श्वास घेईपर्यंत! हे नातं जसं जैविक असतं, तसंच भावनिक किंवा अशारीरही असतं. ते एखाद्या व्यक्तीसोबत असतं, तसंच एखाद्या वास्तूशी, स्थळाशी, पुस्तकाशी, कलाकृतीशी, एखाद्या वस्तूशी... इतकंच काय, आठवणींसोबतही असू शकतं. नात्यांचंही एखाद्या व्यक्तीसारखंच असतं. नात्याला जन्म असतो, तसाच मृत्यूही असतो. नात्याचीही वाढ होते, विकास होतो आणि नातं आजारीही पडू शकतं. नात्याची गंमत ही, ती ते निर्माण करणाऱ्याच्या आठवणीत ते कायम राहतंच! एकोणिसाव्या शतकात सिनेमाच्या कलेचा उदय झाला आणि त्यासोबतच जन्म झाला सिनेमा दाखविणाऱ्या वास्तूचा - सिनेमा थिएटरचा! या सिनेमा थिएटरशी नातं जडलं नाही, असा माणूस आपल्या भारतात सापडणं कठीण. अगदी कितीही विपरीत परिस्थितीत राहणारा असो, पण प्रत्येकाने कधी ना कधी सिनेमा थिएटरमध्ये सिनेमा बघितलेलाच असतो. एखाद्या ठिकाणी आपण वारंवार जातो, तेव्हा आपलं त्या वास्तूसोबतही नातं जडतं. उदाहरणार्थ, आपल्या घराप्रमाणेच आपली शाळा, आपला वर्ग, आपलं आवडीचं हॉटेल, तिथली आपली आवडती जागा, आपलं कॉलेज, आपली बाइक, आपली नेहमीची बस किंवा लोकल, तिथली आपली नेहमी बसायची जागा, आपलं दुकान, आपलं मंदिर किंवा प्रार्थनास्थळ, आपलं आवडतं पर्यटनस्थळ... अशा अक्षरश: कुठल्याही वस्तूसोबत आपलं नातं जडत असतं. सिनेमा थिएटरसोबत माझं असंच नातं जडलं. या लेखाच्या निमित्तानं या खास नात्याला उजाळा देण्याचा हा प्रयत्न.
मी पहिल्यांदा कोणतं थिएटर बघितलं असेल, तर ती होती आमच्या गावातली टुरिंग टॉकीज. तो साधारण १९८० चा काळ होता. आमच्या तालुक्याचं ठिकाण असलेल्या गावी एकच टुरिंग टॉकीज असल्यानं जो कुठला सिनेमा तिथं लागेल तो बघण्याशिवाय दुसरा पर्याय नसायचा. त्या टॉकीजचं नाव एका आठवड्याला ‘दत्त’ असं असायचं, तर एका आठवड्याला ‘श्री दत्त’ किंवा असंच काही तरी! त्या टॉकीजचा परवाना ‘टुरिंग टॉकीज’चा असल्यामुळं त्याला हे प्रकार करावे लागायचे. याचं कारण एकाच ठिकाणी व्यवसाय करण्याचा मुळी तो परवानाच नव्हता. त्यानं गावोगावी फिरून (टुरिंग) सिनेमा दाखवणं अपेक्षित असायचं. अर्थात हे झालं कागदोपत्री. प्रत्यक्षात ती टॉकीज एकाच जागी स्थिर असायची. ते ओपन थिएटर असल्यानं तिथं फक्त रात्री एकच खेळ व्हायचा. साधारण साडेनऊच्या सुमारास सिनेमा सुरू होत असे आणि बाराच्या आसपास संपत असे. नऊ वाजल्यापासून तिथल्या लाउडस्पीकरवर सिनेमाची गाणी (तेव्हा जो कुठला नवा असेल तो) वाजविली जात. माझ्या पहिल्या-वहिल्या आठवणींनुसार, तेव्हा ‘एक दुजे के लिए’ नुकताच प्रदर्शित झाला होता. त्याची गाणी तेव्हा तुफान गाजत होती. त्यामुळं त्या टॉकीजवर कायम हीच गाणी लागलेली असत. ‘सोलह बरस की बाली उमर को सलाम...’ हे लतादीदींचं गाणं ऐकलं, की आजही मला त्या गावातल्या थिएटरची आठवण येते. गाव अगदी लहान. त्यामुळं आठ-साडेआठनंतर सगळीकडं सामसूम होत असे. त्यामुळं ही लाउडस्पीकरवर लावलेली गाणी दूरपर्यंत ऐकू येत. अगदी आमच्या घरातही स्वच्छ ऐकू येत. साधारण नऊ वाजून २५ मिनिटांनी तो टॉकीजवाला सिनेमातली गाणी संपवून सनई लावत असे. ही एक प्रकारची तिसरी बेल असायची. गावातून कुठूनही पाच मिनिटांत थिएटर गाठता येत असे. त्यामुळं सनई सुरू झाली, की लोक कपडे वगैरे करून थिएटरकडे चालायला लागत. मला कुठल्याही परिस्थितीत सिनेमाची सुरुवात चुकवायची नसे. त्यामुळं सिनेमाची गाणी वाजत असतानाच तिथं जायचा माझा हट्ट असे. गाव लहान असलं, तरी तिथंही ‘रात्रीचं जग’ होतंच. सिनेमाच्या जवळच एक-दोन बार होते. काही हॉटेलं होती. समोरच बस स्टँड होतं. त्यामुळं पानटपऱ्या असायच्याच. एरवी त्या रात्रीच्या वेळी नुसतं तिकडं फिरकायला आम्हाला परवानगी नव्हती आणि आमची तेवढी हिंमतही नव्हती. मात्र, सिनेमाला जाताना आपल्याच गावातलं हे पेट्रोमॅक्सच्या बत्तीच्या प्रकाशातलं वेगळं जग थोडा वेळ तरी बघायला मिळे. दिवसा कधीही न दिसणारी माणसं तिथं दिसत. आणि दिवसा दिसणारी माणसं चुकूनमाकून दिसलीच तरी ती त्या पिवळसर प्रकाशात वेगळीच कुणी तरी भासत. पुढं आम्ही प्रवेश करणार असलेल्या आभासी जगाचा हा ट्रेलरच असायचा जणू! माझे वडील एसटीत असल्यानं ‘एसटी साहेबां’ची मुलं म्हणून आम्हाला तिथं भाव असायचा. माझ्या माहितीप्रमाणे, तेव्हा दोन रुपये तिकीट असायचं. आम्ही कधीही रांगेत वगैरे उभं राहून ही तिकिटं काढली नाहीत. आम्हाला थेट आत प्रवेश मिळायचा. आत वाळूवर खाली बसूनच सिनेमा बघायचा. एका बाजूला बायका आणि एका बाजूला गडीमाणसं. मध्ये अगदी दोन-अडीच फूट उंचीची छोटीशी भिंत घातली होती. बायकांची संख्या मुळात फारशी नसायचीच. त्या आल्या, तरी ग्रुपने यायच्या. एकटी-दुकटी बाई तिथं दिसणं कठीण. सगळे गावातलेच लोक असल्याने ओळखीचं कुणी ना कुणी असायचंच. त्यामुळं एकट्यानं कधी तिथं जाण्याची शामत नव्हती. शिवाय ‘कुटुंबासोबत पाहण्याचे’ सिनेमेच बघायला आम्हाला तिथं नेलं जात असे, हे उघड आहे. आम्ही एसटी साहेबांचं कुटुंब म्हणून आम्हाला सगळ्यांत शेवटी बाकडी टाकली जात. त्या बाकांच्या बरोबर मागे प्रोजेक्टर रूम होती. मला त्या खोलीच्या आत जायची भयंकर उत्सुकता असे. मी अनेकदा त्या दारात जाऊन आत डोकावून बघतही असे. पुढं बाकांवर त्या रिळांचा ‘टर्रर्रर्र’ असा बारीक आवाजही सतत येत असे. अनेकदा रिळं बदलावी लागत. मग त्या वेळी दोन मिनिटांसाठी सिनेमा थांबे. तेवढ्यात बाहेर जाऊन बिड्या मारून येणारे लोक होते. सिनेमाला रीतसर मध्यंतर होई. मात्र, आम्हाला बाहेर जाऊन तिथलं काही खायची परवानगी नसे. अगदी चहाही नाही. त्यामुळं तिथं बाहेर नक्की काय विकत, याचा मला आजतागायत पत्ता नाही. ही ओपन एअर टॉकीज असल्यानं वारा आला, की पडदा वर-खाली हाले. त्यामुळं निळू फुले, अशोक सराफ, अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा आदी मंडळी ब्रेकडान्स केल्यासारखी हलत-बोलत. मात्र, सिनेमा बघण्याच्या आनंदापुढं त्याचं काही वाटत नसे. पडद्याच्या मागं मोठा लाउडस्पीकर लावलेला असे. मी तिथंही जाऊन वाकून वाकून, आवाज कुठून येतो हे बघत बसे.
कालांतराने गावात अजून एक टॉकीज झाली. ती ज्या माणसाने सुरू केली, त्याने स्वत:चंच नाव तिला दिलं होतं. त्यामुळं ही टॉकीज ‘अरोरा टॉकीज’ म्हणूनच ओळखली जात असे. ही जरा घरापासून लांब होती. मात्र, इथं पक्क्या भिंती होत्या. वर ओपन असलं, तरी पडदा मोठा होता आणि खुर्च्यांच्या दोन रांगाही होत्या. तिकीट आता जरा वाढलं होतं. इथं पाच रुपये घ्यायचे. तरी काही चांगले सिनेमे आले तर आम्ही नक्की जायचो. एकदा एक कुठला तरी चांगला सिनेमा आला, म्हणून बघायला गेलो, तर ऐन वेळी ‘रॉकी’ हा संजय दत्तचा पहिला सिनेमा बघावा लागल्याच्या दुःखद आठवणीही याच थिएटरमधल्या. ‘अनोखा बंधन’ हा शबाना आझमी अभिनित, त्या दोन छोट्या मुलांचा आणि त्यांच्या लाडक्या बोकडाचा सिनेमाही इथंच बघितल्याचं आठवतंय. त्यानंतर लवकरच व्हिडिओचा जमाना सुरू झाला आणि टॉकीजचं महत्त्व कमी व्हायला लागलं. मुळात तेव्हा मोठ्या शहरात प्रदर्शित झालेले सिनेमे गावात लगेच येत नसत. दोन-तीन महिन्यांनी ते लागत. त्याउलट व्हिडिओ पार्लरवाले लगेचच नवा सिनेमा दाखवत. (आता लक्षात येतंय, की त्यांच्याकडे पायरेटेड कॉपी असणार...) हे व्हिडिओ पार्लर गावात मध्यवर्ती ठिकाणी, एखाद्या छोट्या हॉलमध्ये असत. तिथे दुपारीही सिनेमा बघता येई. तोवर आम्हाला फक्त रात्री साडेनऊचाच सिनेमा बघायची सवय होती. एक रंगीत टीव्ही आणि एक व्हीसीआर या भांडवलावर तेव्हा अनेकांनी व्हिडिओ पार्लर सुरू केले होते. या पार्लरमध्ये सिनेमाला एक रुपया तिकीट असे. तेव्हा थिएटरला दोन ते पाच रुपये लागत असताना एक रुपयात सिनेमा बघायला मिळणं ही मोठीच गोष्ट होती. मी ‘मरते दम तक’ नावाचा, राजकुमारचा एक सिनेमा अशा व्हिडिओ पार्लरमध्ये, सुट्टीत आमच्याकडं आलेल्या माझ्या लहान आत्येभावासोबत बघितला होता. याच पार्लरमध्ये मी ‘शोले’ पहिल्यांदा बघितला. लहान पडदा असला तरी त्या सिनेमाचा मोठा प्रभाव पडल्याचं मला आजही चांगलं आठवतं. विशेषत: त्या सिनेमाचं पार्श्वसंगीत विशेष लक्षात राहिलं होतं. नंतर आमच्या गावात बंदिस्त थिएटर झालं. चार चार खेळ व्हायला लागले. मात्र, तोवर मी गाव सोडलेलं असल्यानं तिथं जाण्याचा योग काही आलाच नाही.
पुढं आठवीत गेल्यानंतर मी कुटुंबासह नगरमध्ये आलो. हे जिल्ह्याचं ठिकाण. त्यामुळं इथं बंदिस्त थिएटर्स होती. तेव्हा नगरमध्ये सहा थिएटर होती. पूर्वी ‘बालशिवाजी’ हा सिनेमा बघायला आम्हाला गावावरून इथं आणण्यात आलं होतं. तेव्हा अप्सरा नावाच्या थिएटरमध्ये हा सिनेमा बघितल्याचं आठवतं. नंतर या टॉकीजचं नाव शिवम प्लाझा असं झालं. तेव्हा नगरमध्ये आशा, चित्रा, छाया, दीपाली, अप्सरा (शिवम प्लाझा) आणि महेश अशी सहा थिएटर होती. यात सगळ्यांत नवं झालेलं होतं ते महेश थिएटर. हे माझं सर्वांत आवडतं थिएटर होतं. तेव्हा नगरमध्येच काय, पुण्यातही एवढं भव्य थिएटर मी तोवर बघितलं नव्हतं. जवळपास आठशे ते नऊशे लोकांची क्षमता असलेलं हे थिएटर सुंदर बांधलं होतं. याची बाल्कनी अतिशय मोठी होती. एका रांगेत जवळपास ३५-४० खुर्च्या होत्या आणि एकूण बाल्कनीतच ३००-४०० लोक बसू शकत. वर उत्कृष्ट फॉल सीलिंग होतं आणि त्यात पिवळसर दिवे बसवले होते. प्रत्येक वेळी सिनेमा सुरू होताना मरून रंगाचा मखमली पडदा वर जात असे. ७० एमएमचा भव्य पडदा होता. या थिएटरला तेव्हा १५ व २० रुपये तिकीट होतं. मी अनेकदा मॅटिनी शो बघायला एकटा जात असे. आमच्या घरापासून सायकलवरून इथं यायचं आणि एकट्यानं मॅटिनीचा शो बघायचा, असं मी अनेकदा केलं. विशेषत: अमिताभचे बहुतेक सर्व सिनेमे री-रनसाठी इथं मॅटिनीला लागायचे. जंजीर, दीवार, शोले, अमर अकबर अँथनी, मुकद्दर का सिकंदर, त्रिशूल असे सर्व महत्त्वाचे सिनेमे मला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाले, ते केवळ महेश थिएटरमुळे. अलीकडे कोव्हिडमध्ये बहुतांश सिंगल स्क्रीन थिएटर बंद पडली, त्यात हे सुंदर थिएटरही बंद पडल्याचं कळलं तेव्हा मला अतोनात दु:ख झालं.
नगरमध्ये ‘आशा’ हे मध्यवर्ती भागातलं एक चांगलं थिएटर होतं. आकारानं लहान असलं, तरी शहराच्या मध्यवर्ती भागात असल्यानं तिथं कायम गर्दी असायची. या टॉकीजला कायम ब्लॅकनं तिकिटं विकली जायची. तिकीट खिडकीसमोर त्यांनी एक बंदिस्त आणि एकामागे एक असं एकच माणूस उभं राहू शकेल, असा कॉरिडॉर बांधला होता. प्रचंड गर्दी असली, की तिथं शिरायला भीती वाटायची. शिवाय आत उभं राहिलं तरी तिकीट मिळेल याची कुठलीही खात्री नसायची. सुरुवातीला ब्लॅकवाल्याचीच मुलं उभी असायची. त्यांना तिकिटं दिली, की तो माणूस बुकिंग विंडो बंद करून टाकायचा. तेव्हा राम-लखन, चांदनी, किशन-कन्हैया असे एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे मी या थिएटरला बघितले. मात्र, दहा रुपयांचं तिकीट थेट ४० रुपयांना ब्लॅकमध्ये मिळायचं. मी एखादेवेळी घेतलंही असेल; मात्र, शक्यतो घरी परत जाण्याकडं माझा कल असायचा. नंतर गर्दी ओसरल्यावर मग जाऊन मी तो सिनेमा बघत असे. ‘माहेरची साडी’ हा सिनेमा याच थिएटरला विक्रमी चालला होता. नंतर मणिरत्नमचा गाजलेला ‘बॉम्बे’ही मी इथंच बघितला. आमच्या शाळेसमोर ‘चित्रा’ नावाची टॉकीज होती. इथं मी ‘तेजाब’, सचिन व अशोक सराफचा ‘भुताचा भाऊ’ यांसह अनेक सिनेमे बघितले. मात्र, या टॉकीजलगतच्या गल्लीत (तिला चित्रा गल्ली असंच म्हणत) वेश्यावस्ती होती. त्यामुळं शाळेतून आमच्यावर अनेक शिक्षकांची कडक नजर असे. शाळा चुकवून कोणी त्या थिएटरला जात नाही ना, हे बघितलं जाई. चित्रा टॉकीज अगदी छोटी होती आणि तिथं तीन रुपये खाली आणि चार रुपये बाल्कनी असे तिकीट दर असायचे. तिथंही भरपूर मारामारी व्हायची आणि ब्लॅकचा धंदा चालायचा. नगरच्या प्रसिद्ध अशा चितळे रोडवर अगदी मध्यवर्ती भागात छाया टॉकीज होती. खरं म्हणजे ते एक गोडाउन होतं. त्या टॉकीजला बाल्कनी अशी नव्हतीच. दोन रांगा मागे जरा उंचीवर होत्या. लगेच एक लाकडी कठडा आणि समोर ड्रेस सर्कल. या टॉकीजमध्ये मी फारसा कधी गेलो नाही. पूर्वीचं हे बागडे थिएटर आणि तिथं नाटकं वगैरे होत, असं नंतर कळलं. मात्र, मी नगरमध्ये होतो तेव्हा तिथं ही छाया टॉकीजच होती.
नगरच्या झेंडीगेट भागात दीपाली टॉकीज होती. भव्यतेच्या बाबतीत महेशच्या खालोखाल मला ही दीपाली टॉकीज आवडायची. दहावीची परीक्षा दुपारी दोन वाजता संपल्यावर घरी न जाता, मित्रांसोबत या टॉकीजला येऊन आम्ही संजय दत्तचा ‘फतेह’ नावाचा अतिटुकार सिनेमा बघितला होता. मुळात सिनेमा कोणता, याच्याशी आम्हाला देणं-घेणं नव्हतंच. दहावीची परीक्षा संपली याचा आनंद आम्हाला साजरा करायचा होता. याच टॉकीजला मी ‘मैंने प्यार किया’ आणि ‘हम आप के हैं कौन?’ हे दोन सुपरडुपर हिट सिनेमे बघितले. त्या काळात या टॉकीजलाही कायम तिकिटं ब्लॅक व्हायची. या टॉकीजचं पूर्वीचं नाव सरोष टॉकीज असं होतं. तिथल्या कँटीनला सरोष कँटीन म्हणूनच ओळखलं जायचं. पुण्यात ‘लकी’ किंवा ‘गुडलक’ किंवा ‘नाझ’विषयी हळवं होऊन बोलणारे खवय्ये आहेत, तसेच एके काळी नगरमध्ये ‘सरोष कँटीन’ची आणि तिथल्या इराणी पदार्थांची क्रेझ होती म्हणे. मला मात्र कधी तिथल्या कँटीनला जाण्याचा आणि काही खाण्याचा योग काही आला नाही.
मी दहावी झाल्यानंतर नगर सोडलं आणि १९९१ मध्ये डिप्लोमा इंजिनीअरिंगसाठी पुण्यात आलो. पुण्यात आल्यावर विविध थिएटर्सचं अनोखं आणि विशाल जग माझ्यासाठी खुलं झालं. खरं तर पुण्यात राहायला येण्यापूर्वीच मी पुण्यातली काही थिएटर बघितली होती. याचं कारण आत्याकडे मे महिन्याच्या सुट्टीत येणं व्हायचं. तेव्हा मोठ्या आत्येभावासोबत अनेक सिनेमे पाहिले. तेव्हा पुण्यात मंगला, राहुल, अलंकार, नीलायम, अलका, प्रभात आणि लक्ष्मीनारायण ही सर्वांत प्रमुख आणि मोठी चित्रपटगृहे होती. सुट्ट्यांमधल्या सिनेमांची सर्वांत ठळक आठवण ‘अलंकार’ला बघितलेल्या श्रीदेवीच्या ‘नगीना’ या सिनेमाची आहे. यासोबतच ‘मंगला’ला तेव्हा अतिशय चर्चेत असलेल्या ‘छोटा चेतन’ या पहिल्या थ्री-डी सिनेमाचीही आठवण अगदी ठळक आहे. पहिल्यांदाच तो गॉगल घालून तो सिनेमा बघितला होता. त्यातला तो पुढ्यात येणारा आइस्क्रीमचा कोन, त्या भगतानं उगारलेला त्रिशूळ थेट अंगावर येणं असले अचाट प्रकार बघून १२ वर्षांचा मी भलताच थक्क झालो होतो. त्याही आधी काही वर्षांपूर्वी ‘अष्टविनायक’ हा चित्रपट ‘प्रभात’ला मी कुटुंबीयांसोबत बघितल्याची आठवण माझी आई सांगते. मला मात्र या सिनेमाची कुठलीही आठवण नाही. पुढं ‘प्रभात’ या चित्रपटगृहाशी आपलं फार जवळचं आणि जिव्हाळ्याचं नातं जडणार आहे हे तेव्हा कुठं ठाऊक होतं?
त्याआधी १९९१ मध्ये गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेतला, तेव्हा आम्हाला सर्वांत जवळचं थिएटर म्हणजे ‘राहुल - ७० एमएम’. पुण्यातलं पहिलं ७० एमएम थिएटर. आमच्या कॉलेजपासून गणेशखिंड रोडने कृषी महाविद्यालयाच्या चौकापर्यंत उतार होता. सायकलला दोन-चार पायडल मारली, की थेट त्या चौकापर्यंत सायकल जायची. आम्ही अनेकदा ‘राहुल’ला जायचो. तेव्हा तिथं फक्त इंग्लिश सिनेमे असायचे. त्यातले अनेक ‘फक्त प्रौढांसाठी’ असायचे. आम्ही १६-१७ वर्षांची मुलं अगदीच लहान दिसायचो. त्यामुळं डोअरकीपर आम्हाला सोडायचा नाही. कधी चुकून सोडलंच तर तो सिनेमा बघायचा. नाही तर तिकिटं कुणाला तरी विकून पुढच्या थिएटरला निघायचं, असा कार्यक्रम असायचा. एकदा आम्ही ‘अलका’ला ‘घोस्ट’ सिनेमा बघायला गेलो. तिथल्या डोअरकीपरला मला आणि माझ्या मित्राला आत सोडलं नाही. तेव्हापासून तो सिनेमा बघायचा जो राहिला तो राहिलाच. अगदी अलीकडं ‘ओटीटी’वर बघितला, तेव्हा खूप दिवसांचं ऋण फिटल्याची भावना मनात आली. पुढं खरेखुरे ‘ॲडल्ट’ झाल्यावर ‘राहुल’ आणि ‘अलका’च्या भरपूर वाऱ्या केल्या, हे सांगणे न लगे!

पुढं १९९७ मध्ये मी ‘सकाळ’मध्ये रुजू झालो, तेव्हा आमच्या ऑफिसपासून सर्वांत जवळचं थिएटर होतं ते म्हणजे प्रभात! तिथं कायम मराठी सिनेमे लागायचे. ‘मराठी सिनेमांचं माहेरघर’ असा उल्लेख तेव्हा महाराष्ट्रात दोन थिएटरच्या बाबतीत केला जात असे. एक म्हणजे ‘प्रभात’ आणि दुसरं म्हणजे दादरचं शांतारामांचं ‘प्लाझा’! (या प्लाझात एखादा सिनेमा बघायची माझी इच्छा आजही अपुरीच आहे...) असो. तर त्या उमेदवारीच्या काळात मी ‘प्रभात’ला जवळपास येतील ते सर्व सिनेमे पाहिले. पुढे ‘सकाळ’मध्ये मी चित्रपट परीक्षणं लिहू लागल्यावर तर ‘प्रभात’ला दर आठवड्याला जाणं हे अपरिहार्य झालं. माझ्या जर्नालिझमच्या वर्षात आम्हाला एक प्रोजेक्ट होता. त्यात वेगळ्या, हट के क्षेत्रातील व्यक्तीची मुलाखत घ्यायची होती. मी ‘प्रभात’चे तेव्हाचे डोअरकीपर मेहेंदळेकाका यांची मुलाखत घेतली. ‘प्रभातनगरीचा द्वारपाल’ असं त्याचं शीर्षक होतं, हे मला आजही आठवतं. आमच्या त्या ‘वृत्तविद्या’ या विद्यार्थी वृत्तपत्राचा अंकही मी काकांना आवर्जून नेऊन दिला होता. तेव्हापासून ‘प्रभात’मधल्या या काकांशी आणि नंतर इतर स्टाफशीही चांगली गट्टी जमली. भिडेकाका हे मॅनेजर होते. ते एरवी अतिशय कडक होते. गैर वागणाऱ्यांना, बायका-मुलींची छेड काढणाऱ्या आगाऊ मुलांना ते काठीनेही मारायला कमी करायचे नाहीत. मात्र, माझे आणि त्यांचे संबंध अतिशय स्नेहाचे होते. मला नंतर ‘प्रभात’मध्ये कायमच घरचा सदस्य असल्यासारखी वागणूक मिळाली. तेथील वाघकाका यांच्याशीही स्नेह जमला. ‘प्रभात’चे मालक विवेक दामले यांच्याशी नंतर ओळख झाल्यानंतर तर मी कायम त्यांच्याकडे गप्पा मारायला जात असे. सिनेमाच्या वेळेआधी किमान एक तास आधी मी तिथं जाऊन दामलेंशी गप्पा मारत असे. त्यांच्या तीन पिढ्या प्रभात स्टुडिओच्या काळापासून या व्यवसायात असल्याने त्यांच्याकडे किश्श्यांची कमतरता अजिबात नसे. चित्रपटसृष्टीतल्या नानाविध गमतीजमती त्यांच्या तोंडून ऐकून मी अगदी हरखून जात असे. त्यांच्याकडे चहा व्हायचाच. मध्यंतरातही ऑफिसमध्ये या सगळ्यांसोबत बसूनच चहा व्हायचा. सिनेमा संपल्यावर मग तो कसा होता, प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळेल, यावर चर्चा व्हायची आणि मग मी ऑफिसला जायचो. अनेकदा रविवारी माझं परीक्षण आल्यावर (जर त्यात सिनेमाचं कौतुक असेल तर) रविवारच्या खेळांना गर्दी वाढलेली असे. स्वत: दामले किंवा भिडेकाका मला हे सांगत. मी जवळपास ११ वर्षं आधी ‘सकाळ’ व नंतर ‘मटा’त सिनेमा परीक्षणं लिहिली. त्या दहा-अकरा वर्षांत मी तीनशेहून अधिक सिनेमांवर लिहिलं. त्यात ‘प्रभात’मध्ये किती सिनेमे पाहिले असतील, याची गणतीच नाही. ‘बिनधास्त’ हा सिनेमा प्रदर्शित झाला, तेव्हा तो मला इतका आवडला, की वेगवेगळ्या १४ लोकांसोबत मी १४ वेळा तो सिनेमा त्या काळात पाहिला. दहा वर्षांपूर्वी ‘प्रभात’ने चित्रपट पुरस्कार देण्याची घोषणा केली. दोन वर्षं मोठा समारंभ करून त्यांनी हे पुरस्कार दिलेही. त्या काळात त्या चित्रपट पुरस्कार निवड समितीवर मी दोन वर्षं काम केलं. तो अनुभव फार समृद्ध करणारा होता. पुढं हे पुरस्कार बंद झाले, तरी दामलेंशी वैयक्तिक स्नेह कायम राहिला. मात्र, नंतर त्यांनी हे थिएटर मूळ मालकांना - इंदूरचे किबे यांना - करारानुसार परत केलं. (‘प्रभात’चं मूळ नाव किबे लक्ष्मी थिएटर. आता पुन्हा हेच नाव प्रचलित झाले आहे.) काय योगायोग असेल तो असेल. मात्र, मालकी बदलल्यापासून मी एकदाही पुन्हा त्या थिएटरला गेलोच नाही. मुद्दाम ठरवून असं नाही, पण नाहीच जाणं झालं. माझे आणि त्या थिएटरचे ऋणानुबंध असे अचानक संपुष्टात आले.

चाफळकर बंधूंनी पुण्यात पहिलं मल्टिप्लेस २००१ मध्ये ‘सातारा रोड सिटीप्राइड’च्या रूपात उभं केलं आणि थिएटरच्या दुनियेत एक नवं पर्व सुरू झालं. एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीच देशभर भराभर मल्टिप्लेसची उभारणी होत गेली. मी सातारा रोड सिटीप्राइडला २००१ मध्ये ‘लगान’ बघितला आणि त्या अनुभवाने अगदी भारावून गेलो. नंतर त्यांनी २००६ मध्ये कोथरूडमध्ये ‘सिटीप्राइड’ उभारलं आणि माझी फार मोठी सोय झाली. मी तेव्हा वारज्यात राहत असल्यानं मला हे नवं चकाचक मल्टिप्लेक्स जवळ पण पडत असे. थोड्याच काळात ‘प्रभात’प्रमाणे इथल्याही सगळ्या स्टाफशी चांगली ओळख झाली. चाफळकरांप्रमाणेच इथं आधी हितेश गायकवाड नावाचे मॅनेजर होते, त्यांच्याशी मैत्री झाली. नंतर सुगत थोरात आले. अनिल तपस्वी, राजेश गायकवाड, अंबरीश आदी सर्व स्टाफशी खूप चांगली दोस्ती झाली आणि ती आजही कायम आहे. मी ‘प्रभात’ आणि ‘कोथरूड सिटीप्राइड’ या दोन्ही चित्रपटगृहांना माझं दुसरं घरच मानतो. पुढं २०१७ मध्ये मनस्विनी प्रभुणेनं तिच्या समदा प्रकाशनातर्फे माझ्या चित्रपटविषयक लेखनाचं ‘यक्षनगरी’ हे पुस्तक प्रकाशित केलं, तेव्हा मी ते याच दोन चित्रपटगृहांना अर्पण केलं आहे. ‘कोथरूड सिटीप्राइड’मध्ये नंतर आशियाई चित्रपट महोत्सव, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव असे अनेक चित्रपट महोत्सवही भरू लागले. तेव्हाचा माहौल हा केवळ अनुभवण्यासारखाच असायचा. या महोत्सवांनी चित्रपटगृहांत सिनेमा पाहण्याचा आनंद नव्यानं उपभोगता आला, असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. जागतिक पातळीवरचा, अन्य देशांतील सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहता आला तो केवळ अशा महोत्सवांमुळंच!
मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांनी भारतात सिनेमा क्षेत्रात एक नवी क्रांतीच केली, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. सिनेमा पाहण्याचा भव्य अनुभव तिथल्या आधुनिक तंत्रज्ञानामुळं प्रेक्षकांना घेता आला. उत्तम दर्जाची ध्वनिव्यवस्था, उत्कृष्ट दर्जाचे पडदे, अत्याधुनिक प्रक्षेपण यंत्रणा, वातानुकूलित यंत्रणा, आरामदायी आसनव्यवस्था यामुळं मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा पाहणं हा एक सुखद अनुभव ठरू लागला. तिथली अवाढव्य यंत्रणा, स्वच्छ वॉशरूम आदी व्यवस्था यामुळं तिथले महागामोलाचे खाद्यपदार्थही प्रेक्षकांनी (‘कुरकुर’ करत) स्वीकारले. भारतातील प्रचंड प्रेक्षकसंख्या आणि मल्टिप्लेक्सचे वाढते स्क्रीन यामुळं चित्रपट धंद्याची यशाची गणितंही बदलून गेली. पूर्वी सिंगल स्क्रीनमध्ये रौप्यमहोत्सव, सुवर्णमहोत्सव साजरा करूनही न होणारी कमाई मल्टिप्लेक्समधल्या प्रचंड मोठ्या संख्येनं असलेल्या खेळांमुळे अवघ्या आठवडाभरात करता येऊ लागली. अर्थात, मल्टिप्लेक्सच्या भव्यपणामुळं प्रेक्षकाचा एखाद्या वास्तूशी जो वैयक्तिक ‘कनेक्ट’ होतो, तो होईलच असं काही सांगता येत नाही. एखाद्या मॉलमध्ये आपण जातो, दुकानं न्याहाळतो तशा पद्धतीनं येणारा प्रेक्षकही वाढला. माझ्याबाबत मात्र असं काही झालं नाही. ‘कोथरूड सिटीप्राइड’शी वैयक्तिक स्नेहबंध तयार झाला. तिथल्या वास्तूत घरासारखं वाटतं. ही माझी एकट्याची नाही तर तिथं नेहमी येणाऱ्या अनेकांची भावना असेल, यात काही शंका नाही.
हे सर्व चित्र २०२० च्या मार्चपर्यंत कायम होतं. मात्र, तेव्हा ‘कोव्हिड’ नावाच्या जागतिक साथरोगानं सर्व जगाला विळखा घातला आणि आपलं सगळ्यांचंच जगणं पूर्वीसारखं राहिलं नाही. करोनाकाळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या क्षेत्रांमध्ये मनोरंजन आणि चित्रपटसृष्टी होती. अनेक एकपडदा चित्रपटगृहं दीर्घकाळ बंद राहिल्यानं कायमची बंद पडली. लॉकडाउनच्या काळात ‘ओटीटी’ माध्यमाची चांगलीच भरभराट झाली. घरबसल्या मनोरंजनाची ही पर्वणीच होती. सिनेमाप्रेमींना लवकरच त्याची चटक लागली. चित्रपटगृहांचे वाढलेले तिकीटदर, मोठ्या शहरांत वाहतूक कोंडीची, पार्किंगची समस्या आणि चार जणांच्या कुटुंबाला येणारा एक हजार रुपयांहून अधिकचा खर्च यामुळं अनेक जणांनी चित्रपटगृहांकडं पाठ फिरवली. आता तीन वर्षांनी सगळं जगणं पूर्वपदावर आलं असताना मल्टिप्लेक्सही पुन्हा गर्दीनं ओसंडून वाहत आहेत. एकपडदा थिएटर्स मात्र या साथरोगाचे बळी ठरले. आता काही मोजकीच एकपडदा चित्रपटगृहं सुरू आहेत. मात्र, ती आहेत तोवर सिनेमाप्रेमींच्या डोळ्यांतली ती नवा सिनेमा पाहण्याची उत्सुकता, ती चमक कायम राहील. सिनेमा थिएटर्सनी दिलेल्या आठवणी आणि त्यामुळं त्यांच्याशी तयार झालेलं अतूट नातंही शेवटच्या श्वासापर्यंत असंच कायम राहील...

---

(पूर्वप्रसिद्धी : आपले छंद दिवाळी अंक २०२३)

----

26 Feb 2024

ग्राहकहित दिवाळी अंक २३ - लेख

यक्ष
-----


भारतीय चित्रपटसृष्टीतील दिलीपकुमार, राज कपूर व देव आनंद या प्रख्यात नायकत्रयीतील देव आनंदची जन्मशताब्दी नुकतीच २६ सप्टेंबरला झाली. याचाच अर्थ देव आनंद हयात असता तर तो त्या दिवशी शंभर वर्षांचा झाला असता. पण मग असं वाटलं, की देव आनंद केवळ शरीरानं आपल्यातून गेला आहे. एरवी तो आपल्या अवतीभवती आहेच. त्याच्या त्या देखण्या रूपानं, केसांच्या कोंबड्याच्या स्टाइलनं, तिरकं तिरकं धावण्याच्या शैलीनं, थोडासा तुटलेला दात दाखवत नायिकेला प्रेमात पाडणाऱ्या स्मितहास्याच्या रूपानं, त्याच्या त्या विशिष्ट टोपीच्या रूपानं, त्या स्वेटरच्या रूपानं - देव आनंद आपल्यात आहेच.
उण्यापुऱ्या शंभर-सव्वाशे वर्षांचा इतिहास असलेल्या चित्रपटसृष्टीवर तब्बल सहा दशकं आपल्या अस्तित्वाची ठसठशीत मोहोर उमटवणारा हा माणूस म्हणजे ‘यक्ष’ होता - आणि ‘यक्ष’ अजरामर असतात. आणि हो, ‘नंदा प्रधान’मध्ये पु. ल. देशपांडे म्हणाले, तसं ‘यक्षांना शापही असतात.’ देव आनंदलाही ते होते. त्याला चिरतरुण राहण्याच्या एका झपाटलेपणाचा शाप होता. त्यामुळं तो आयुष्यभर २५ वर्षांचाच राहिला. आपणही आपल्या भावासारखे उत्तम चित्रपट दिग्दर्शन करू शकतो, असं त्याला वाटायचं. हा आत्मविश्वास अजब होता. त्यामुळं वयाच्या उत्तरार्धात देव आनंदचा नवा सिनेमा ही एक हास्यास्पद, टर उडविली जाणारी गोष्ट ठरली. मात्र, ‘देवसाब’ना त्याचं काही वाटायचं नाही. मुळात भूतकाळात रमणारा हा माणूसच नव्हता. सतत पुढच्या काळाचा आणि प्रसंगी काळाच्या पुढचा विचार करायचा. स्वत:चे प्रदर्शित झालेले सिनेमेही हा माणूस पाहायचा नाही. त्याच वेळी आपण मात्र त्याच्या ‘अभी ना जाओ छोडकर’, ‘खोया खोया चांद’, ‘ये दिल ना होता बेचारा’, ‘होठों पे ऐसी बात’, ‘तेरा मेरा प्यार अमर’, ‘हैं अपना दिल तो आवारा’, ‘उपरवाला जान कर अंजान है’, ‘दिल का भंवर करे पुकार’ या आणि अशाच कित्येक कृष्णधवल गाण्यांत हरवून गेलेलो असतो.
बारा वर्षांपूर्वी देव आनंद शरीराने आपल्यातून गेला... एका रविवारी सकाळीच तो गेल्याचा एसेमेस मोबाइलवर आला आणि पहिला विचार मनात आला, की अरेरे, अकाली गेला...! ८८ हे काय वय होतं त्याचं जाण्याचं? देव आनंद किमान पावणेदोनशे वर्षं जगेल, अशी खात्री होती. ८८ हे आपल्यासारख्या सामान्यजनांसाठी वृद्धत्वाचं वय असेल... पण देव आनंद नावाच्या अजब रसायनासाठी नाही. तो वरचा देव या भूलोकीच्या देवाला घडविताना त्यात वृद्धत्व घालायला विसरला असावा. त्यामुळंच देव आनंद लौकिकार्थानं, वयाच्या हिशेबानं वाढला असेल, पण मनानं तो पंचविशीच्या पुढं कधीच गेला नाही. म्हणून तर तो गेला त्याच वर्षी त्याचा 'हम दोनो' पन्नास वर्षांनी रंगीत होऊन झळकला होता आणि त्याच वेळी 'चार्जशीट' हा त्याचा नवा-कोरा सिनेमाही रिलीज झाला होता. त्यातही 'हम दोनो'च अधिक चालला हे वेगळं सांगायला नको. देव आनंदसाठी जसं त्याचं वय पंचविशीला गोठलं होतं, तसं प्रेक्षकांसाठीही तोच 'हर फिक्र को धुएं में उडाता चला गया' म्हणणारा देवच आठवणींत कायमचा ‘फ्रीज’ झाला होता. स्वतः देव आनंदला याची फिकीर नव्हती. 'हर फिक्र को धुएं में उडाता चला गया' हेच त्याचं जीवनविषयक तत्त्वज्ञान होतं. एखाद्या माणसाला एखाद्या गोष्टीची किती पराकोटीची पॅशन असावी, याचं देव हे जितंजागतं उदाहरण होतं. देव सिनेमासाठी होता आणि सिनेमा देवसाठी... दोघांनीही परस्परांची साथ शेवटपर्यंत सोडली नाही. त्यामुळंच त्याच्या नव्या सिनेमांच्या पोस्टरवर नातीपेक्षा लहान वयाच्या नायिकांना कवेत घेऊन उभा राहिलेला देव कधीही खटकला नाही.
देव आनंद ही काय चीज होती? एव्हरग्रीन, चॉकलेट हिरो, बॉलिवूडचा ग्रेगरी पेक (खरं तर ग्रेगरीला हॉलिवूडचा देव आनंद का म्हणू नये?), समस्त महिलांच्या हृदयाची धडकन अशा विविध नामाभिधानांनी ओळखलं जाणारं हे प्रकरण नक्की काय होतं? पन्नासच्या दशकानं हिंदी चित्रपटसृष्टीला दिलेल्या तीन महानायकांपैकी देव एक होता, हे तर निर्विवाद! पुण्यात प्रभात स्टुडिओत उमेदवारी करणारा आणि 'लकी'त चाय-बनमस्का खायला येणारा, सडपातळ बांध्याचा देव आनंद नावाचा हा देखणा युवक पुढं समस्त चित्रसृष्टीवर साठ वर्षांहून अधिक काळ राज्य करतो याचं रहस्य काय? एक तर देव आनंदचं पडद्यावरचं व्यक्तिमत्त्व सदाबहार, प्रसन्न असायचं. त्याचा अभिनय अगदी महान दर्जाचा होता, असं नाही, पण स्वतःला छान प्रेझेंट करायला त्याला जमायचं. शिवाय तो देखणा होताच. साठच्या दशकात त्यानं केलेल्या सिनेमांमुळं रोमँटिक हिरो हे बिरुद त्याला आपोआपच येऊन चिकटलं. त्याचं ते हातवारे करीत गाणी म्हणणं, त्याचा तो केसांचा कोंबडा, मिश्कीलपणे नायिकेच्या मागे गोंडा घोळणं या सगळ्यांतून देवचा नायक साकारायचा. जेव्हा सिनेमा हे एकमेव मनोरंजनाचं साधन होतं, त्या काळात भारतातल्या तमाम महिलांच्या हृदयस्थानी हे महाशय का विराजमान झाले असतील, याचा सहजच तर्क बांधता येतो. देव आनंदनं प्रेक्षकांना रोमँटिकपणा म्हणजे काय, हे शिकवलं... व्यवस्थित टापटीप राहणं, उत्कृष्ट फर्डं इंग्रजी बोलणं आणि सुंदर स्त्रीवर मनसोक्त प्रेम करणं या गोष्टी (तत्कालीन) भारतीय तरुणाई कुणाकडून शिकली असेल, तर फक्त 'देवसाब'कडून...
... कारण देव आनंद नट असला, तरी शिकलेला होता. इंग्रजी साहित्याचा पदवीधर होता. त्याला गीत-संगीताची उत्तम समज होती. त्याचे भाऊ चेतन आनंद आणि विजय आनंदही तसेच बुद्धिमान होते. पन्नास-साठच्या दशकातल्या, स्वातंत्र्यानंतर स्वतःच्या पायावर धडपड करून उभ्या राहणाऱ्या, तरुण रक्तानं सळसळणाऱ्या भारताचं देव आनंद हे प्रतीक होतं. 'गाइड'सारख्या अभिजात साहित्यकृतीवर या बंधूंनी तयार केलेला सिनेमाही याची साक्ष आहे. पडद्यावर अतिविक्षिप्त किंवा वाह्यात प्रकार त्यांनी कधी केले नाहीत. पुढं 'हरे रामा हरे कृष्णा'सारखा सिनेमा दिग्दर्शित केल्यावर देवला आपण मोठे दिग्दर्शक आहोत, याचा 'साक्षात्कार' झाला. त्यानंतर आतापर्यंतचा त्याचा प्रवास केवळ थक्क होऊन पाहत राहण्यासारखा होता. मला देव आनंदला प्रत्यक्ष बघण्याची संधी एकदाच मिळाली. साधारण १६-१७ वर्षांपूर्वी तो पुणे आंतरराष्ट्रीय महोत्सवात आला होता, तेव्हा पत्रकार परिषदेत त्याच्या नातवांच्या वयाच्या पत्रकार पोरा-पोरींसमोर त्यानं केलेली तुफान बॅटिंग लक्षात राहिलीय. त्याचे नवे सिनेमे, त्याच्या पत्रकार परिषदा, त्या सिनेमांचं प्रदर्शित होऊन पडणं हे सगळं पब्लिकच्याही अंगवळणी पडलं होतं. दर वेळेला एवढी अफाट एनर्जी कुठून आणतो हा माणूस, असा एकच प्रश्न पडायचा.
देव आनंदचा जन्म २६ सप्टेंबर १९२३ चा. तत्कालीन ‘ब्रिटिश इंडिया’मधील पंजाब प्रांतातील शकरगड (जि. गुरुदासपूर) येथे जन्मलेल्या देवचं जन्मनाव होतं धरमदेव. देवचे वडील पिशोरीलाल आनंद गुरुदासपूर जिल्हा न्यायालयातील नावाजलेले वकील होते. पिशोरीलाल यांना चार मुलगे झाले, त्यातील देव तिसरा. देवची बहीण शीलकांता कपूर म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूरची आई. देवचे थोरले भाऊ म्हणजे मनमोहन आनंद (हेही वकीलच होते), चेतन आनंद आणि धाकटा विजय आनंद. देव आनंदचं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण डलहौसी येथील सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झालं. त्यानंतर तो धरमशाला येथे कॉलेज शिक्षणासाठी गेला. नंतर तो लाहोरला गेला आणि तेथील गव्हर्न्मेंट कॉलेजमधून त्याने इंग्रजी साहित्य हा विषय घेऊन बी. ए. केलं.
पदवी मिळविल्यानंतर लगेचच तो मुंबईला आला. सुरुवातीला त्याने चर्चगेट येथील मिलिटरी सेन्सॉर ऑफिस येथे नोकरी केली. तेव्हा त्याला ६५ रुपये पगार मिळायचा. त्यानंतर त्याने आणखी एका अकाउंटिंग फर्ममध्ये ८५ रुपये पगारावर नोकरी गेली. देवचा मोठा भाऊ चेतन आनंद तेव्हा ‘इंडियन पीपल थिएटर्स असोसिएशन’मध्ये (इप्टा) जात असे. त्याच्यासोबत देव सिनेमे पाहत असे. अशोककुमारचा ‘किस्मत’ हा चित्रपट तेव्हा जोरात चालला होता. तो बघून देवच्या मनात अभिनेता होण्याची ऊर्मी निर्माण झाली.
प्रभात फिल्म कंपनीचे बाबूराव पै यांनी देव आनंदला पहिला ‘ब्रेक’ दिला. देव पहिल्यांदा त्यांच्या कार्यालयात धडकला, तेव्हा देवचा चेहरा, त्याचं हास्य व आत्मविश्वास बघून पै खूप प्रभावित झाले. त्यांच्यामुळेच प्रभात फिल्म कंपनीच्या ‘हम एक है’ (१९४६) या चित्रपटात त्याला नायकाची भूमिका मिळाली. हिंदू-मुस्लिम एकतेवर आधारित या चित्रपटात देवने हिंदू तरुणाची भूमिका केली होती आणि कमला कोटणीस त्याची नायिका होती. या चित्रपटाचं पुण्यात चित्रीकरण सुरू असताना देवची मैत्री गुरुदत्तशी झाली. त्या दोघांनी असं ठरवलं होतं, की ज्याला चित्रपटसृष्टीत आधी मोठं काम मिळेल, त्याने दुसऱ्याला मदत करायची. त्यानुसार देवने जेव्हा ‘बाजी’ (१९५१) चित्रपट तयार करायचं ठरवलं, तेव्हा त्याचं दिग्दर्शन गुरुदत्तकडं दिलं.
याच काळात देव आनंदला सुरैयासोबत काही सिनेमे करायला मिळाले. त्या दोघांची जोडी जमली. इतकंच नव्हे, तर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. देव तुलनेने नवखा होता, तर सुरैया तेव्हाही मोठी स्टार होती. ‘विद्या’, ‘जीत’, ‘शायर’, ‘अफसर’, ‘निली’, ‘सनम’ अशा काही सिनेमांत दोघे एकत्र झळकले. सुरैयाचं नाव कायम आधी पडद्यावर येई. ‘विद्या’ चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी ‘किनारे किनारे चले जाएंगे’ या गाण्याचं चित्रीकरण सुरू असताना, सुरैयाची बोट उलटली व ती पाण्यात पडली. देवनं तिला वाचवलं. या घटनेनंतर ती त्याच्या प्रेमात पडली. सुरैयाची आजी या दोघांवर लक्ष ठेवून असायची. ‘जीत’ चित्रपटाच्या सेटवर या दोघांनी प्रत्यक्ष लग्न करायचंही ठरवलं होतं. दोघं एकमेकांना पत्रं पाठवायचे. मात्र, नियतीच्या मनात निराळंच काही होतं. देवनं सुरैयाला तेव्हाच्या तीन हजार रुपये किमतीची हिऱ्याची अंगठीही दिली होती. मात्र, सुरैयाच्या आजीनं या लग्नाला विरोध केला. सुरैयाचं कुटुंब मुस्लिम होतं, तर देव हिंदू! अखेर लग्न काही झालेच नाही. सुरैया अखेरपर्यंत अविवाहित राहिली. त्या दोघांनीही एकत्र काम करणं थांबवलं आणि एका प्रेमकहाणीचा करुण अंत झाला.
देवला पहिला मोठा ब्रेक अशोककुमार यांनी दिला. बॉम्बे टॉकीजची निर्मिती असलेल्या ‘जिद्दी’ (१९४८) या चित्रपटात त्यांनी देवला नायक म्हणून घेतलं. हा चित्रपट जोरदार चालला. यात देवची नायिका होती कामिनी कौशल. पुढच्याच वर्षी देवनं ‘नवकेतन’ ही स्वत:ची निर्मिती संस्था काढली आणि तो स्वत: चित्रपट काढू लागला. गुरुदत्तनं दिग्दर्शित केलेला ‘बाजी’ हा क्राइम थ्रिलर चित्रपट जोरदार चालला. यात देवच्या नायिका होत्या गीता बाली आणि कल्पना कार्तिक. कल्पना कार्तिकचं मूळ नाव होतं मोनासिंह. या दोघांनी नंतर ‘आँधियाँ’, ‘टॅक्सी ड्रायव्हर’, ‘हाउस नं. ४४’ व ‘नौ दो ग्यारह’ हे चित्रपट सोबत केले. ‘टॅक्सी ड्रायव्हर’च्या चित्रीकरणाच्या वेळी कल्पना व देव प्रेमात पडले व देवनं तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला.
यानंतर कल्पना कार्तिकनं आपल्या अभिनय कारकिर्दीला पूर्णविराम दिला. देवची घोडदौड सुरूच होती. ‘मुनीमजी’, ‘फंटूश’, ‘सीआयडी’, ‘पेइंग गेस्ट’ असे त्याचे चित्रपट आले आणि जोरदार हिट झाले. देवची एक स्टाइल आता प्रस्थापित झाली होती. देखणा-रुबाबदार चेहरा, मान तिरकी करत बोलण्याची लकब, भरभर भरभर चालण्याची अनोखी अदा आणि त्याचं ते ‘मिलियन डॉलर’ हास्य याच्या जोरावर त्यानं त्या काळातल्या तमाम प्रेक्षकवर्गावर, विशेषत: महिलांवर गारूड केलं.
याच काळात देवची जोडी वहिदा रेहमानबरोबर जमली. वहिदाला चित्रपटसृष्टीत आणले ते गुरुदत्तनं. ती देव आनंदच्या राज खोसला दिग्दर्शित ‘सीआयडी’मध्ये पहिल्यांदा झळकली. त्यानंतर ‘सोलहवां साल’ (१९५८), काला बाजार (१९६०) आणि ‘बात एक रात की’ (१९६२) या यशस्वी चित्रपटांत या दोघांची जोडी दिसली. मधल्या काळात देवनं दिलीपकुमारसोबत ‘इन्सानियत’ (१९५५) हा सुपरहिट चित्रपट दिला. मधुबाला व नलिनी जयवंतसोबतचा ‘काला पानी’ (१९५८) हा सिनेमाही जोरदार चालला. याच चित्रपटासाठी देवला पहिल्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं ‘फिल्म फेअर’ ॲवॉर्ड मिळालं. या सर्व काळात देवनं आपल्या भूमिकांत वैविध्य आणण्याचा प्रयत्न केला. त्यानं ‘जाल’, ‘दुश्मन’, ‘काला बाजार’ अशा सिनेमांत नकारात्मक छटा असलेल्या भमिका केल्या, तर ‘पॉकेटमार’, ‘काला पानी’, ‘शराबी’, ‘बंबई का बाबू’ अशा सिनेमांत काहीशा दु:खी छटा असलेल्या भूमिकाही केल्या. मात्र, रोमँटिक हिरो हीच त्याची प्रतिमा सर्वाधिक प्रबळ ठरली व चाहत्यांमध्ये ठसली. त्यातही वहिदा रेहमान, नूतन, साधना, कल्पना कार्तिक, गीताबाली या नायिकांसोबत त्याची जोडी विशेष जमली. नूतनसोबत ‘दिल का भंवर करे पुकार...’ या गाण्यात कुतुबमिनारच्या पायऱ्या उतरतानाचा देव आनंद (आणि नूतनही) विसरणं अशक्य! तीच गोष्ट ‘तेरा मेरा प्यार अमर...’ गाण्यातल्या साधना आणि देवची.

साठचं दशक देवसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार होतं. त्याची कारकीर्द याच दशकात चढत्या भाजणीनं सर्वोच्च शिखरावर जाणार होती. सन १९६१ मध्ये त्याचा ‘हम दोनो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानं तुफान यश मिळवलं. एस. डी. बर्मन हे ‘नवकेतन’चे ठरलेले संगीतकार होते. जयदेव हे त्यांचे सहायक. मात्र, या चित्रपटासाठी देवनं एस. डी. बर्मन यांची परवानगी घेऊन जयदेव यांना स्वतंत्रपणे संगीत द्यायला सांगितलं. त्याचा हा निर्णय किती योग्य ठरला, हे नंतर काळानं सिद्ध केलंच. आजही ‘हम दोनो’ची सर्व गाणी तितकीच लोकप्रिय आहेत. ‘अभी ना जाओ छोडकर...’ हे हिंदी चित्रपट संगीतातील महत्त्वाच्या युगुलगीतांपैकी एक मानलं जातं. या चित्रपटात साधना व नंदा या त्याच्या नायिका होत्या. देवची यात दुहेरी भूमिका होती. हा चित्रपट ५० वर्षांनी, म्हणजे २०११ मध्ये रंगीत अवतारात पुन्हा थिएटमध्ये प्रदर्शित झाला होता आणि तेव्हाही त्याला बऱ्यापैकी प्रतिसाद लाभला होता. (मी स्वत: तेव्हा हा चित्रपट प्रथमच मोठ्या पडद्यावर पाहिला.) यानंतर ‘तेरे घर के सामने’, ‘मंझिल’ नूतनसोबत, ‘किनारे किनारे’ मीनाकुमारीसोबत, ‘माया’ माला सिन्हासोबत, ‘असली नकली’ साधनासोबत, ‘जब प्यार किसी से होता है’ आणि ‘महल’ आशा पारेखसोबत आणि ‘तीन देवियाँ’ कल्पना, सिमी गरेवाल व नंदासोबत असे देवचे एकापाठोपाठ एक ब्लॉकबस्टर चित्रपट प्रदर्शित झाले आणि बॉलिवूडचा रोमँटिक नायक अशी त्याची नाममुद्रा आणखी ठळकपणे सिद्ध करून गेले.

‘गाइड’ नावाची दंतकथा

याच दशकात, १९६५ मध्ये देव आनंदच्या कारकिर्दीतला कदाचित सर्वांत महत्त्वाचा चित्रपट ‘गाइड’ प्रदर्शित झाला. हा त्याचा पहिला रंगीत चित्रपट. या चित्रपटाने इतिहास घडवला. प्रसिद्ध लेखक आर. के. नारायण यांच्या याच नावाच्या कादंबरीवरून हा चित्रपट तयार करण्यात आला. इंग्रजी साहित्याचा अभ्यासक असलेल्या देवला ही कादंबरी भावली. ती रूपेरी पडद्यावर आणायची हे त्याचं स्वप्न होतं. ‘गाइड’च्या निर्मितीच्या अनेक कथा, दंतकथा प्रचलित आहेत. यातील ‘रोझी’ची भूमिका वहिदा रेहमानच करणार, यावर देव ठाम होता. दिग्दर्शन आधी चेतन आनंद करणार होता, मात्र त्यानं नायिकेच्या भूमिकेसाठी प्रिया राजवंश (त्याची प्रेयसी) असावी, असा हट्ट धरला. त्याबरोबर देवनं चेतन आनंदचाच पत्ता कट केला. त्यानंतर त्याने राज खोसला यांना विचारलं. मात्र, राज खोसला आणि वहिदा रेहमान यांचं फार बरं नव्हतं. त्यामुळं त्यांनीही नायिकेबाबत नाराजी व्यक्त केली, असं सांगतात. अखेर वहिदानंही ‘मी या प्रोजेक्टमधून बाजूला होते, तुमच्या दिग्दर्शकाला मी चालणार नाही,’ असं सांगून पाहिलं. मात्र, देव वहिदालाच ती भूमिका देण्यावर ठाम होता. त्यामुळं राज खोसलाही गेले आणि तिथं मग विजय आनंद आला. विजय आनंद ऊर्फ ‘गोल्डी’नं ‘गाइड’चं सोनं केलं. पुढचा सगळा इतिहास आहे. राजू गाइड ही भूमिका देव आनंदच्या कारकिर्दीतील अजरामर भूमिका ठरली. या चित्रपटापूर्वी नृत्यनिपुण वहिदाला तिची नृत्यकला दाखविण्याची संधी देणाऱ्या फारशा भूमिका मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे तिनं देवला अशी अट घातली होती म्हणे, की माझं एकही नृत्य कापायचं नाही; तरच मी ही भूमिका करीन. देवनं अर्थातच ही अट मान्य केली आणि वहिदाचं नृत्यनैपुण्य सर्वांसमोर आलं. देवला हा चित्रपट हिंदीसोबतच इंग्लिशमध्येही तयार करायचा होता. त्यासाठी त्यानं हॉलिवूड प्रॉडक्शनसोबत काम केलं. नोबेल पारितोषिक विजेत्या प्रख्यात लेखिका पर्ल बक यांना त्याने इंग्लिश चित्रपटासाठी लेखन करायला सांगितलं होतं. खुद्द आर. के. नारायण यांना ‘गाइड’ चित्रपट फारसा भावला नव्हता, असं म्हणतात. ते काही का असेना, भारतीय प्रेक्षकांनी हा सिनेमा डोक्यावर घेतला, यात शंका नाही. मुळात ‘गाइड’मधील राजू आणि रोझीचं प्रेम त्या काळाच्या पुढचं होतं. असा काळाच्या पुढचा चित्रपट काढण्याचं आणि (भारतीय जनमानसाची नाडी ओळखून) त्यातल्या प्रेमाला वासनेचा स्पर्श होऊ न देता ते उदात्त वाटेल याची काळजी घेण्याचं काम देव व विजय आनंद या बंधूंनी यशस्वीपणे केलं, हे निश्चित.
विजय आनंदनेच दिग्दर्शित केलेला ‘ज्वेल थीफ’ हा पुढचा क्राइम थ्रिलरदेखील जोरदार हिट झाला. यात देवची नायिका नृत्यनिपुण वैजयंतीमाला होती. यातलं ‘होठों पे ऐसी बात’ हे गाणं आजही गणेशोत्सवातलं रोषणाईसाठीचं लाडकं गाणं आहे. यानंतर देव व विजय आनंद यांनी ‘जॉनी मेरा नाम’च्या (१९७०) रूपाने आणखी एक ब्लॉकबस्टर सिनेमा दिला. या वेळी देवचं वय होतं ४७, तर त्याच्याहून तब्बल २५ वर्षांनी लहान असलेली, २२ वर्षीय हेमामालिनी त्याची नायिका होती. या सिनेमाला मिळालेल्या तुडुंब यशामुळं हेमामालिनी मोठी स्टार म्हणून ओळखली जाऊ लागली.

दिग्दर्शनात पदार्पण

साठचं दशक अशा रीतीनं देवला त्याच्या कारकिर्दीच्या शिखरावर घेऊन गेलं. आता देवला स्वत:ला चित्रपट दिग्दर्शित करण्याची इच्छा निर्माण झाली. ‘प्रेमपुजारी’द्वारे देव दिग्दर्शनातही उतरला. जहिदा या अभिनेत्रीचं या चित्रपटाद्वारे पदार्पण झालं होतं. दुसरी नायिका अर्थात वहिदा रेहमान होती. मात्र, हा सिनेमा फ्लॉप ठरला. देवला दिग्दर्शक म्हणून खरं यश मिळवून दिलं ते ‘हरे रामा हरे कृष्णा’ (१९७१) या चित्रपटाने. हिप्पी संस्कृतीवर आधारित या चित्रपटाचं बहुतांश चित्रीकरण नेपाळमध्ये झालं होतं. या चित्रपटाद्वारे देव आनंदनं झीनत अमानला रूपेरी पडद्यावर झळकवलं. झीनत रातोरात सुपरस्टार झाली. यातलं आशा भोसलेंनी गायलेलं ‘दम मारो दम’ हे गाणंही तुफान गाजलं. या चित्रपटादरम्यान देव आनंद कोवळ्या, पण मादक अशा झीनतच्या प्रेमात पडला होता. त्याबाबत तेव्हाच्या फिल्मी मासिकांतून भरपूर गॉसिप प्रसिद्ध व्हायचं. पुढं राज कपूरच्या पार्टीत देवनं झीनतला पाहिलं आणि नंतर त्यानं तिचा विषय डोक्यातून काढून टाकला, असं सांगतात. राज कपूरनं नंतर तिला ‘सत्यम शिवम सुंदरम’मध्ये झळकवलं, हे सर्वविदीत आहे.
याच काळात राज कपूर आणि दिलीपकुमार हे देवचे दोन्ही सुपरस्टार सहकलाकार नायक म्हणून काहीसे उतरणीला लागले होते. देव आनंदचेही ‘सोलो हिरो’ म्हणून काही चित्रपट फ्लॉप झाले. मात्र, तो तरीही त्याच्याहून वयाने कमी असलेल्या शर्मिला टागोर, योगिता बाली, राखी, परवीन बाबी आदी नायिकांसोबत काम करत राहिला आणि त्यातले काही सिनेमे चाललेही! विशेषत: १९७८ मध्ये आलेला ‘देस-परदेस’ जोरदार चालला. या वेळी देवचं वय होतं फक्त ५५ आणि त्याची नायिका होती अवघ्या २१ वर्षांची टीना मुनीम!
याच वेळी देशात आणीबाणीचा काळ होता. तेव्हा देवनं उघडपणे आणीबाणीच्या विरोधात भूमिका घेतली होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विरोधात १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत त्यानं प्रचार केला होता. नंतर त्याने चक्क ‘नॅशनल पार्टी ऑफ इंडिया’ नावाचा राजकीय पक्षही स्थापन केला होता. तो कालांतरानं अर्थातच त्यानं गुंडाळून टाकला. देव आनंद हा माणूस असाच होता. मनस्वी!
‘देस-परदेस’च्या यशानंतरच तेव्हाच्या माध्यमांनी देवला ‘एव्हरग्रीन’ हे बिरुद दिलं. या सिनेमाच्या यशामुळं बासू चटर्जींनी त्याला ‘मनपसंद’मध्ये भूमिका दिली. (‘सुमन सुधा’ हे लता मंगेशकर यांच्या आवाजातलं सुंदर गाणं याच चित्रपटातलं!) याच यशाच्या लाटेवर त्याचे पुढचे दोन चित्रपट ‘लूटमार’ आणि ‘स्वामीदादा’ (१९८२) हेही हिट ठरले.
याच काळात देवनं त्याचा मुलगा सुनील आनंद याला नायक म्हणून घेऊन, ‘आनंद और आनंद’ हा ‘क्रेमर व्हर्सेस क्रेमर’ या लोकप्रिय हॉलिवूड सिनेमावर आधारित चित्रपट काढला. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर असा काही कोसळला, की सुनील आनंदनं त्यानंतर चित्रपटात कधीही काम न करण्याचा सुज्ञ निर्णय घेतला.
देव आनंदनं आता साठी ओलांडली होती. तरीही त्याचे ‘हम नौजवान’ आणि ‘लष्कर’सारखे चित्रपट चांगले चालले. विशेषत: ‘लष्कर’मधल्या (१९८९) प्रोफेसर आनंद या त्याच्या भूमिकेचं समीक्षकांनीही कौतुक केलं होतं. यानंतर नव्वदच्या दशकात त्यानं ‘प्यार का तराना’, ‘गँगस्टर’, ‘रिटर्न ऑफ ज्वेल थीफ’, ‘अमन के फरिश्ते’, ‘सौ करोड’, ‘सेन्सॉर’ आदी अनेक चित्रपट काढले, पण ते सगळे फ्लॉप ठरले. दिग्दर्शक देव आनंदचा अवतार कधीच समाप्त झाला होता. कायम होता तो देव आनंदचा उत्साह!
असं म्हणतात, की देव आनंदचं ऑफिस अतिशय साधंसुधं होतं. त्याचं स्वत:चं राहणीमान मात्र स्टायलिश होतं. तो ब्रिटिश पद्धतीचे शिष्टाचार पाळणारा ‘सभ्य गृहस्थ’ होता. त्याच्या सहनायिका त्याच्याविषयी नेहमी आदरयुक्त प्रेमानं बोलायच्या. देवच्या सहवासात आम्हाला एकदम निर्धास्त, ‘कम्फर्टेबल’ वाटायचं असं त्या म्हणायच्या. देव आनंदनं आपल्या वागण्या-बोलण्यातली ही आदब, ही ‘ग्रेस’ कायम जपली. देव आनंद हा हिंदी चित्रपटसृष्टीतला पहिला ‘फॅशन आयकॉन’ होता. त्याचे स्कार्फ, मफलर, जर्किन; एवढंच काय, त्याची सिगारेट हीदेखील फॅशन म्हणून प्रचलित व्हायची. त्याच्यासारखा केसाचा कोंबडा काढून फिरण्याची तेव्हाच्या तरुणाईत क्रेझ असे. 

त्याला मुंबईविषयी अतोनात प्रेम होतं. मुंबई शहर कालांतराने बकाल होत गेलं. ती अवस्था बघून देव कायम व्यथित व्हायचा. त्यानं १९५० च्या दशकातील ब्रिटिशांच्या प्रभावाखालची आखीव-रेखीव, कमी गर्दीची, टुमदार इमारतींची, चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली, उच्च अभिरुची जपणारी, उत्तमोत्तम स्टुडिओ असणारी, भारतात दुर्मीळ असलेलं ‘वर्क कल्चर’ असलेली मुंबई अनुभवली होती. नंतर नंतर तो बरेचदा परदेशातच असायचा. विशेषत: लंडनमध्ये. त्यानं अखेरचा श्वास घेतला तोही लंडनमध्येच - ३ डिसेंबर २०११ रोजी.
देव आनंद नावाची रसिली, रम्य, रोचक कथा आता ‘दंतकथा’ म्हणूनच उरली आहे. बघता बघता त्याला जाऊन आता १२ वर्षं होत आली. मात्र, मन तरी असंच म्हणतंय, की देव आनंदचं शरीर फक्त गेलं... पण यक्ष कधी मरतात का?

----

(पूर्वप्रसिद्धी : ग्राहकहित दिवाळी अंक, २०२३)

---


31 Jan 2024

अनलॉक दिवाळी अंक २३ - लेख

‘खेळ’ श्रद्धांचा, रुढी-परंपरांचा
------------------------------------


कुठलीही गोष्ट जेव्हा दीर्घकाळ सुरू असते, तेव्हा त्यात काही ना काही परंपरा तयार होत असतात. काही रुढी तयार होतात. क्रीडा क्षेत्रही याला अपवाद नाही. क्रिकेट हा आपल्या भारतातला सर्वाधिक लोकप्रिय खेळ. क्रिकेटमध्येही अशा अनेक रुढी-परंपरा तयार झाल्या आहेत. क्रिकेटचा जन्म इंग्लंडमधला. तेथील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड म्हणजे क्रिकेटची पंढरी असे मानले जाते. इथले रीतीरिवाज पूर्वी अतिशय कडक मानले जायचे. मेरिलिबोन क्रिकेट क्लब (एमसीसी) या उच्चभ्रूंच्या क्लबकडे या मैदानाची मालकी होती. लॉर्ड्स मैदान अतिशय देखणे आहे. इंग्रजांची शिस्त आणि नीटनीटकेपणा इथे जागोजागी दिसतो. इथल्या संग्रहालयात त्यांनी अनेक गोष्टी जपून ठेवल्या आहेत. पूर्वी कसोटी क्रिकेट फक्त इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या दोन देशांतच खेळले जायचे. या दोन देशांतील करंडकाला ‘ॲशेस’ असे नाव का पडले, यामागेही एक कथा आहे. सन १८८२ मध्ये लंडनच्या ओव्हल मैदानात ऑस्ट्रेलियाकडून इंग्लंड संघाचा कसोटीत दारूण पराभव झाला. त्यामुळे इंग्लिश क्रिकेट रसिक संतप्त झाले. वृत्तपत्रांतून कडक टीका झाली. त्यात एका समीक्षकाने असे लिहिले, ‘इंग्लिश क्रिकेट आज ओव्हल मैदान येथे मरण पावले. तेथे दहनविधी करण्यात येणार असून, रक्षा (ॲशेस) ऑस्ट्रेलियाला नेली जाईल.’ तेव्हापासून ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला ‘ॲशेस’ असे नाव पडले. लॉर्ड्सवरील संग्रहालयात त्या १८८२ च्या बातमीचे कात्रण आजही जपून ठेवण्यात आले आहे.

इथे प्रत्येक गोष्ट कुणी कशी करायची याचे नियम क्लबने घालून दिले होते. अनेक वर्षे महिलांना या क्लबचे सदस्यत्व मिळत नसे. आता या गोष्टी पुष्कळशा बदलल्या आहेत. लॉर्ड्स मैदानात एक घंटा असून, प्रत्येक सामना सुरू होण्यापूर्वी ही घंटा (बेल) वाजविण्यात येते. ही बेल वाजविण्याचा मान फार मोजक्या लोकांना मिळतो. त्यामुळे हा बहुमान समजला जातो. मध्यंतरी ऑगस्ट महिन्यात मी लंडनला गेलो, तेव्हा हे लॉर्ड्स मैदान अगदी आवर्जून पाहिले. तेव्हा तेथे सामना सुरू नव्हता. खरे तर सामना सुरू असताना हे मैदान पाहणे ही निराळीच गंमत आहे. आम्ही गेलो, तेव्हा तेथील माइक नावाच्या गाइडने खूप आत्मीयतेने लॉर्ड्सची माहिती दिली. लॉर्डसमधील खेळाडूंची ड्रेसिंग रूम, स्थानिक टीमची (इंग्लंडची) ड्रेसिंग रूम, सदस्यांना व खेळाडूंना बसण्याची व्यवस्था असलेली लाँग रूम हे सगळेच अतिशय सुंदर आणि बघण्यासारखे आहे. नामवंत खेळाडूंची उत्तम पेंटिंग्ज तिथं लावण्यात आली आहेत. लॉर्ड्सच्या मैदानाचे वैशिष्ट्य म्हणजे या मैदानाला एका बाजूने उतार आहे. आणि हा उतार किती असावा? तर एका बाजूचे मैदान दुसऱ्या बाजूपेक्षा तब्बल आठ फुटांनी उंचावर आहे. या मैदानावर खेळणे त्यामुळे सोपे नाही. दोन्ही ड्रेसिंग रूममध्ये या मैदानावर शतके केलेल्या फलंदाजांची, तसेच डावात पाच किंवा अधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांची नावे लिहिली आहेत. विनू मंकड यांचे नाव फलंदाज व गोलंदाज या दोन्ही यादींत आहेत. आपल्या दिलीप वेंगसरकरांनी लॉर्ड्सवर तीन शतके ठोकली आहेत. त्यांचे व कपिल देव यांचे मोठे तैलचित्र लाँगरूममध्ये लावले आहे. सचिन तेंडुलकरला मात्र लॉर्ड्सवर शतक ठोकता आले नाही. त्याच्या या मैदानावरील सर्वोच्च धावा आहेत ३७. या उतारामुळे आपल्याला नेहमीच्या पद्धतीने खेळता येत नाही, असे सचिन सांगतो.
या लॉर्ड्सच्या मैदानात एक झाड होते. स्टेडियम व मैदान तयार करताना ते झाड तसेच ठेवण्यात आले होते. मी लॉर्ड्सला भेट दिली तेव्हा मला ते झाड तिथे दिसले नाही. तिथल्या एका स्थानिक माणसाला (तो भारतीयच होता) त्याबद्दल विचारले. मात्र, त्यालाही फारशी माहिती नव्हती. भारताचा महान खेळाडू व माजी कर्णधार सुनील गावसकर याला ‘एमसीसी’ने सन्माननीय सदस्यत्व देऊ केले होते. मात्र, विशिष्ट पद्धतीचा पेहराव करायचा, विशिष्ट शूज घालायचे वगैरे एमसीसीच्या अटी गावसकरांना जाचक वाटल्या आणि त्यांनी हे सन्माननयी सदस्यत्व चक्क नाकारले म्हणे. 

मैदानावरच्या रुढी-परंपरांप्रमाणेच खेळाडू आणि अंपायर यांच्याही काही परंपरा किंवा काही श्रद्धा किंवा अंधश्रद्धा आहेत. डेव्हिड शेफर्ड हे क्रिकेटमधील प्रसिद्ध इंग्लिश अंपायर. मैदानात कुठल्याही संघाचा स्कोअर १११ झाला, की ते उडी मारायचे किंवा एक पाय उभा करायचे. १११, २२२ किंवा ३३३ अशा धावसंख्येला ‘नील्सन’ असे म्हणतात. १११ ही धावसंख्या फलंदाजासाठी अशुभ मानायची पद्धत आहे. शेफर्ड त्यांच्या या कृतीमुळे जगभरातील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घ्यायचे. १११ हा आकडा बेल्सशिवाय उभ्या असलेल्या स्टंपसारखा दिसतो. बेल्स उडाल्या म्हणजे फलंदाज बाद! त्यामुळे १११ हा आकडा अशुभ, असे मानतात. लॉर्ड नेल्सन याच्यावरून या संख्येला ‘नेल्सन’ आकडा म्हणण्याची पद्धत पडली. नेल्सनच्या तीन नाविक विजयांचा आणि ‘वन आय, वन आर्म अँड वन लेग’ या प्रसिद्ध उद्गाराचा संदर्भ या धावसंख्येशी जोडला जातो. हा आकडा खरोखर फलंदाजांसाठी अशुभ आहे का, याची पाहणी काही वर्षांपूर्वी एका क्रीडा नियतकालिकाने केली. तेव्हा लक्षात आलं, की सर्वाधिक फलंदाज शून्य या धावसंख्येवर बाद झाले आहेत. १११ ही धावसंख्या वाटते तेवढी अशुभ नाही. मात्र, पंच डेव्हिड शेफर्ड यांच्या पाय उचलण्याच्या कृतीमुळे त्यांच्यावर हटकून कॅमेरा जायचा आणि स्टेडियममधील प्रेक्षक त्यांच्या नावाचा गजर करायचे. शेफर्ड यांच्याप्रमाणे इतर अनेक पंचांच्या लकबी प्रसिद्ध आहेत. वेस्ट इंडिजचे पंच स्टीव बकनर अतिशय कोरड्या चेहऱ्याने वावरायचे. इंग्लंडचे डिकी बर्ड हे जुन्या जमान्यातील लोकप्रिय पंच होते. त्यांचे निर्णय सहसा चुकायचे नाहीत. अलीकडे न्यूझीलंडचे पंच बिली बौडेन त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण लकबींसाठी प्रसिद्ध होते. चौकार, षटकार देण्याची त्यांची विशिष्ट पद्धत होती. षटकार देताना ते हळूहळू हात उंचावत आकाशाकडे न्यायचे. चौकार देताना कमरेत वाकून जोरजोरात हात आडवा हलवायचे. ऑस्ट्रेलियाचे पंच पॉल राफेल हे अत्यंत उमद्या व्यक्तिमत्त्वाचे व हुशार अंपायर होते. त्यांचेही निर्णय सहसा चुकायचे नाहीत. पाकिस्तानी पंच शकूर राणा यांच्यावर भारतात खूप टीका व्हायची. पूर्वी भारत पाकिस्तानात सामने खेळायचा जायचा, तेव्हा शकूर राणा आपल्या फलंदाजांना कायम चुकीचे बाद द्यायचे. आपले खेळाडू म्हणायचे, की आम्ही पाकिस्तानात गेलो, की मैदानात अकरा नव्हे, तर तेरा खेळाडूंविरुद्ध (११ खेळाडू अधिक दोन पंच) खेळतो. या शकूर राणांचा एक किस्सा प्रसिद्ध आहे. एकदा पहिल्याच कसोटीत पाकिस्तानच्या गोलंदाजाचा (बहुतेक इम्रान) चेंडू सुनील गावसकर यांच्या पायाला लागला. चेंडू पायाला लागायचा अवकाश, शकूर राणांचे बोट लगेच वर गेले. (तेव्हा थर्ड अंपायर, रिव्ह्यू वगैरे प्रकार नव्हते.) गावसकर वैतागले. मात्र, बाद दिल्याने पॅव्हेलियनमध्ये परतावेच लागले. नंतर गावसकर यांनी त्यांचे आघाडीचे जोडीदार चेतन चौहान यांना असे सांगितले, की पायाला लागलेला हा अखेरचा चेंडू! त्यानंतर त्या आख्ख्या मालिकेत गावसकर यांनी एकाही गोलंदाजाचा एकही चेंडू पायाला लागू दिला नाही. त्यामुळे पायचीत देण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. यात गावसकर यांच्या फलंदाजीच्या महान तंत्राचीही कमाल दिसते. पाकिस्तानातलाच आणि गावसकर यांचा अजून एक किस्सा आहे. एकदा भारतीय संघ पाकिस्तानात गेला असताना लाहोर येथे कसोटी सामन्यापूर्वी प्रसिद्ध गायिका नूरजहाँ तिथे आल्या. त्यांची भारतीय खेळाडूंशी ओळख करून देताना तिथल्या व्यवस्थापकाने सांगितले, ये सुनील गवास्कर है... हिंदुस्थान के कप्तान. इन को तो आप जानतीही होंगी. त्यावर काहीशा आढ्यतेने नूरजहाँ म्हणाल्या, ‘हम तो सिर्फ इम्रान खान को जानते है!’ त्यानंतर तो व्यवस्थापक गावसकरांकडे वळून म्हणाला, ‘और यह है मल्लिका-ए-तरन्नुम नूरजहाँ... इन को तो आप जानतेही होंगें’... अतिशय हजरजबाबी म्हणून प्रसिद्ध असलेले गावसकर ही संधी कशाला सोडतील? त्यांनी त्या फुलटॉसवर थेट षटकार लगावला. ते म्हणाले, ‘हम तो सिर्फ लता मंगेशकर को जानते है!’

याव्यतिरिक्त क्रिकेट खेळाडूंच्याही अनेक श्रद्धा असतात. मैदानात उतरताना विशिष्ट (उजवे) पाऊल मैदानात आधी टाकणे, सूर्याकडे पाहणे, विशिष्ट रंगाचे पॅड, ग्लोव्हज किंवा हेल्मेट घालणे असे प्रकार सर्वच खेळाडू करताना दिसतात. सचिन तेंडुलकर शतक झाल्यानंतर आकाशाकडे पाहत असे. त्यामागचे कारण असे, की १९९९ चा क्रिकेट वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये भरला असताना, सचिनच्या वडिलांचे - रमेश तेंडुलकर यांचे - मुंबईत निधन झाले. सचिन तातडीने मुंबईला परतला. वडिलांचे अंत्यसंस्कार झाल्यावर तो तातडीने वर्ल्ड कपचे सामने खेळण्यासाठी इंग्लंडला परतला. त्यानंतरची भारताची पुढची मॅच केनियाविरुद्ध होती. सचिनने त्या सामन्यात शतक झळकावले आणि त्यानंतर आकाशाकडे पाहिले. सचिनने आपल्या वडिलांना दिलेली ती आदरांजली होती. सर्व प्रेक्षकांना याची कल्पना असल्याने तेव्हा सचिनचे चाहते अंत:करणापासून हलले होते. त्यानंतर प्रत्येक शतकानंतर सचिन आकाशाकडे पाहून अभिवादन करू लागला. नागपूरमध्ये सामना असेल तर सचिन आवर्जून तेथील प्रसिद्ध टेकडी गणपतीचे दर्शन घ्यायला जायचाच.
सुनील गावसकर यांनी त्यांच्या वेस्ट इंडिज दौऱ्याची एक अशीच गमतीशीर आठवण सांगितली आहे. वेस्ट इंडिजचे तत्कालीन कर्णधार गॅरी सोबर्स यांना असे वाटत असे, की मैदानात उतरण्यापूर्वी त्यांनी सुनील गावसकर यांना स्पर्श केला तर त्यांच्या धावा चांगल्या होतात. भारताचे तत्कालीन कर्णधार अजित वाडेकर यांना हे कळले. त्यानंतर पुढच्या सामन्याच्या वेळी सोबर्स गावसकरांना शोधत भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये आले, तेव्हा वाडेकर यांनी गावसकरांना चक्क बाथरूममध्ये कोंडून ठेवले. गावसकर दिसत नाही म्हटल्यावर नाइलाजाने सोबर्स मैदानात गेले. त्या डावात आपल्या गोलंदाजाने त्यांना शून्यावर बाद केले आणि आपण ती ऐतिहासिक कसोटी जिंकली.
प्रेक्षक म्हणून आपल्याही काही श्रद्धा असतात, तर काही अंधश्रद्धा असतात. विशेषत: क्रिकेट हा आपला ‘धर्म’ असल्याने प्रत्येक सामना हा जणू धर्मयुद्ध असल्यासारखाच खेळला जात असतो. त्यातही समोर पाकिस्तानचा संघ असेल तर विचारायलाच नको. संपूर्ण घर, चाळ, वाडी-वस्ती, बिल्डिंग सामूहिकरीत्या सामना बघत असते. अशा वेळी एका विशिष्ट जागी बसलं तर तिथून उठायचं नाही, कारण कधी तरी कुणी तरी जागा सोडली आणि इकडे विकेट गेली असं घडलेलं असतं. मग काय वाट्टेल ते झालं, तरी त्या व्यक्तीला त्या जागेवरून उठू दिलं जात नाही. असे अनेक गमतीशीर प्रकार आपण लहानपणी आणि अगदी आताही अनुभवले आहेत.
अलीकडे आयपीएलसारख्या टी-२० स्पर्धा सुरू झाल्यापासून क्रिकेट बरेच रंगीत-संगीत झाले आहे. आयपीएलच्या निमित्ताने खेळ म्हणजे जल्लोष किंवा सेलिब्रेशन हे समीकरण व्यापारी हेतूने प्रेक्षकांत रुजविण्यात आले. पूर्वी अतिशय स्वस्तात क्रिकेट सामने पाहता यायचे. आता मात्र हा काही हजारो रुपयांचा मामला झाला. ‘चीअर लीडर्स’ हा प्रकार आयपीएलमुळे क्रिकेटमध्ये आला. प्रत्येक षटकारानंतर किंवा एखाद्या विकेटनंतर नाचणाऱ्या मुली बघून सुरुवातीला अस्सल क्रिकेटप्रेमी मंडळींनी नाके मुरडली. आता मात्र हे सगळे प्रकार रूढ झाले आहेत. एकदा सगळा माहौलच जल्लोषाचा म्हटल्यावर खेळाडूही मागे कशाला राहतील? वेगळ्या प्रकारची केशभूषा, हातावर किंवा मानेवर टॅटू असे प्रकार खेळाडूंची लोकप्रियता ठरवू लागले. माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी नव्याने संघात आला तेव्हा त्याचे केस बरेच वाढलेले होते. पाकिस्तानमध्ये खेळायला गेला असताना तेव्हाचे पाकिस्तानचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी त्याला बक्षीस समारंभात जाहीरपणे सांगितले होते, की तुझे केस चांगले आहेत. कापू नकोस. कालांतराने धोनीने त्याचे ते केस कापले तो भाग वेगळा!
अनेक खेळाडू वेगवेगळ्या प्रकारे सेलिब्रेशन करतात. पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी बळी मिळाल्यानंतर दोन हात आडवे फैलावून आणि पाय लांब फाकवून आनंद व्यक्त करायचा. वेस्ट इंडिजचा गोलंदाज शेल्डन कॉट्रेल विकेट मिळाल्यावर दोन-तीन पावलं संचलन केल्यासारखं करतो आणि कडक सॅल्यूट ठोकतो. हा गोलंदाज तिथल्या लष्करात कामाला आहे म्हणून तो असे करतो. भारताचा नवा उगवता तारा शुभमन गिल शतक केल्यानंतर इंग्लिश पद्धतीने कमरेत झुकून अभिवादन करतो, तर ‘सर’ रवींद्र जडेजा तलवारीसारखी बॅट फिरवून आनंद व्यक्त करतो.
क्रिकेटप्रमाणेच टेनिसमध्ये अशाच अनेक प्रथा-परंपरा पाहायला मिळतात. त्यात अर्थात पुन्हा विंबल्डन, म्हणजे ब्रिटिश लोक आघाडीवर, हे सांगायला नकोच. इथे सामना खेळणाऱ्या खेळाडूला पांढरा पोशाखच घालावा लागतो. हा नियम स्पर्धा सुरू झाल्यापासून म्हणजे १८७७ पासून अस्तित्वात आहे, तो आजतागायत. याखेरीज सर्व अंपायर, लाइनमन, बॉल बॉइज यांनी हिरवा ड्रेस घालायचा हा नियम २००६ पर्यंत होता. तो नंतर बदलण्यात आला. आता हे सर्व जण नेव्ही ब्लू व क्रीम रंगाचे ड्रेस घालतात. स्ट्रॉबेरी आणि क्रीम हे विंबल्डनचं दुसरं वैशिष्ट्य किंवा प्रथा म्हणा. खेळ सुरू असताना प्रेक्षकांनी स्ट्रॉबेरी व क्रीम खात त्याचा आनंद लुटायचा, ही प्रथा साधारणत: १९५३ मध्ये सुरू झाली. मात्र, काहींच्या म्हणण्यानुसार, ही प्रथा स्पर्धा सुरू झाल्यापासून म्हणजे १८७७ पासून आहे. हळूहळू स्ट्रॉबेरी व क्रीम हा विंबल्डनचा अविभाज्य घटक झाला. दर वर्षी विंबल्डनला २८ हजार किलो स्ट्रॉबेरी आणि सात हजार लिटर आइस्क्रीम फस्त केलं जातं.
इंग्लंडचे राजघराणे आणि विंबल्डनचे अतूट नाते आहे. हे राजघराणे विंबल्डन स्पर्धा भरविणाऱ्या ‘ऑल इंग्लंड क्लब’चे प्रमुख आश्रयदाते आहे. त्यामुळे दर वर्षी राजघराण्यातील कुणी ना कुणी तरी ही स्पर्धा बघायला येतेच. त्यांच्यासाठी सेंटर कोर्ट येथे ‘रॉयल बॉक्स’ आहे. पूर्वी सर्व खेळाडूंना या राजघराण्यातील मंडळींना अभिवादन करावं लागे. त्यातही महिला खेळाडूंना विशिष्ट पद्धतीने एक पाय वाकवून अभिवादन करावं लागे. मात्र, २००३ पासून ‘ड्युक ऑफ केंट’ (जे ऑल इंग्लंड क्लबचे तेव्हा अध्यक्ष होते) यांनी ही प्रथा थांबविली. आता फक्त राणी (आता राजा) किंवा राजपुत्र उपस्थित असतील तर त्यांनाच अभिवादन करावे लागते. लेडी डायना अनेक वर्षे विंबल्डनचे सामने पाहायला येत असे.
बक्षीस विजेत्यांना जी रक्कम दिली जात असे, त्यात पूर्वी पुरुषांना अधिक रक्कम मिळे आणि महिलांना तुलनेने कमी. मात्र, विंबल्डनने २००७ पासून यातही बदल केला आणि दोघांनाही समान रक्कम द्यायला सुरुवात केली. मात्र, त्यावरही काही रसिकांनी आक्षेप घेतला. महिलांचे सामने तीन सेटचे असतात, तर पुरुषांचे पाच सेटचे. त्यामुळे पुरुष अधिक मेहनत करतात, असे या आक्षेप घेणाऱ्यांचे म्हणणे आहे.
विंबल्डनच्या कोर्टवर कुठल्याही प्रायोजकांच्या किंवा तत्सम जाहिराती लावण्यास पूर्ण बंदी आहे. याशिवाय विंबल्डन स्पर्धा सुरू असतानाच्या पंधरवड्यात जो मधला रविवार असतो, तो सुट्टीचा असतो. त्या रविवारी एकही सामना होत नाही, ही इथली प्रथा आहे. मात्र, १९९१, १९९७ आणि २००४ मध्ये पावसामुळे या ‘सुट्टीच्या रविवारी’ सामने खेळवावे लागले. तेव्हा क्लबने ते रविवार ‘जनतेचा रविवार’ असे घोषित करून, अनारक्षित खुर्च्यांवर, स्वस्त तिकिटे उपलब्ध करून अनेकांना सेंटर कोर्टवर बसायचे भाग्य मिळवून दिले. या रविवारनंतर येणारा सोमवार हा विंबल्डन स्पर्धेचा सर्वांत महत्त्वाचा दिवस - टेनिस निर्वाण - म्हणून ओळखला जातो. या दिवशी पुढच्या फेरीत आलेले १६ पुरुष व १६ महिला उपांत्यपूर्व फेरीत जाण्यासाठी या एकाच दिवशी आपापले सामने खेळतात. विंबल्डनचे सामने बघणे हा एक वेगळाच आनंद आहे. भारतात साधारण १९८७-८८ मध्ये विंबल्डनचे सामने ‘दूरदर्शन’वर लाइव्ह दाखवायला सुरुवात झाली. हाच बोरिस बेकर, स्टेफी ग्राफ आदी खेळाडूंच्या उदयाचा काळ होता. भारतात टेनिस लोकप्रिय होण्यामागे ‘दूरदर्शन’ने सुरू केलेल्या या थेट प्रक्षेपणाचा मोठा वाटा आहे. त्यानंतर माझ्या पिढीच्या विद्यार्थ्यांच्या वह्यांवर कपिल, गावसकर, रवी शास्त्री यांच्या जोडीने स्टेफी ग्राफ, स्टीफन एडबर्ग, जॉन मॅकेन्रो, इव्हान लेंडल, मॅट्स विलँडर किंवा बोरिस बेकर यांचेही फोटो झळकू लागले.
क्रीडा क्षेत्राशी आपलं असं अतूट नातं आहे. त्यामुळे खेळाच्या मैदानावरील अनेक रुढी-परंपरा आणि श्रद्धा-अंधश्रद्धांसह आपण त्या त्या खेळावर मनापासून प्रेम करतो, नाही का!

----

(पूर्वप्रसिद्धी : अनलॉक दिवाळी अंक, २०२३)

----

29 Jan 2024

दृष्टी-श्रुती दिवाळी अंक २३ - लेख

मुकुंद, तू मीच आहेस!
--------------------------

मिलिंद बोकील यांची ‘शाळा’ ही कादंबरी मी वाचली तेव्हा मी त्या कादंबरीच्या प्रेमातच पडलो. नंतर मी अनेकदा ही कादंबरी वाचली. ‘शाळेत गेलेल्या सर्वांसाठी’ अशी या कादंबरीची अर्पणपत्रिका आहे. खरोखर, शाळेत गेलेल्या सगळ्यांसाठीच ही कादंबरी आहे आणि शाळेतल्या त्या दिवसांची अनुभूती ज्यांच्या मनात श्रावणसरींसारखी आजही बरसत असते त्या सगळ्यांनाच या कादंबरीच्या प्रेमात पडल्याशिवाय गत्यंतर नाही. मी अनेकदा विचार करतो, की या कादंबरीतलं आपल्याला नक्की काय आवडलं? त्या कोवळ्या वयातलं ‘प्रेम’? वयात येण्याची जाणीव आणि त्यासोबत उमलत असलेल्या कित्येक मुग्ध-मधुर भावनांची पुनर्भेट? आपल्यातल्या हरवलेल्या निरागसपणाची टोचणारी भावना? मग वाटतं, की हे सगळंच... आणि त्याशिवाय असं बरंच काही, जे शब्दांत कदाचित कधीच सांगता येणार नाही. 

यातला नायक म्हणजे मुकुंद जोशी. इयत्ता नववी. कादंबरीचा काळ म्हणजे नववीचं संपूर्ण वर्ष. गाव (थेट उल्लेख नसला तरी) डोंबिवली. या मुकुंदाची आणि त्याच्या वर्गात असलेल्या शिरोडकरची ही ‘प्रेम’कथा... इंग्रजीत ज्याला ‘काफ लव्ह’ म्हणतात, त्या वयातल्या पहिल्या-वहिल्या आकर्षणाची ही गोड गोष्ट!
कादंबरीतील मुकुंदा भेटल्यावर असं वाटलंच नाही, की याला आपण पहिल्यांदाच भेटतोय. मुकुंद जोशी राहत होतास ते शहर, ते पर्यावरण, तो भोवताल किती तरी वेगळा होता. त्याच्या नववी-दहावीत असण्याचा काळही वेगळा होता. आणीबाणीचे संदर्भ पुस्तकात येतात. माझ्या त्या वयाच्या जवळपास पंधरा-सोळा वर्षं पूर्वीचा... आणि कादंबरीतून मुकुंदाची भेट झाली तीही बरोबर माझ्या दहावीच्या काळानंतर पंधरा-सोळा वर्षांनंतर...म्हणजे मधे साधारणत: तीस वर्षांचा काळ गेला होता.. मात्र, आपण एकच काळ जगलो आहोत, असं वाटण्याइतका हा नायक जवळचा वाटला... मला खात्री आहे, माझ्यासारख्या अनेक वाचकांना असंच वाटलं असेल. मुकुंदाचं नववीतल्या वयातलं भावविश्व आपल्याला मनापासून आवडतं. याचं कारण माझ्यासारख्या लाखो मध्यमवर्गीय मराठी मुलांचं भावविश्व तसंच होतं. काळ कितीही बदलला तरी पौगंडावस्थेतल्या त्या भावना कुठल्याही काळात त्याच असतात. त्या वयात प्रत्येकाची आपली आपली अशी कुणी तरी ‘शिरोडकर’ असतेच. त्या कोवळ्या वयातलं ते प्रेम... त्याला ‘प्रेम’ तरी कसं म्हणावं? त्या वयातलं ते खास आकर्षण... पण बोकील सांगतात, ती गोष्ट केवळ त्या आकर्षणापुरती मर्यादित नव्हती. त्यात त्या काळाचा सगळा पटच सामावला आहे. चाळीतलं जोशींचं घर, मंत्रालयात लोकलनं नोकरीला जाणारे मुकुंदाचे बाबा, त्याची सुगृहिणी अशी साधीसुधी टिपिकल आई, त्याची मोठी बहीण - जिचा उल्लेख तो कायम अंबाबाई असाच करतो आणि ते खूप आवडतं -, याशिवाय त्याचा लाडका नरूमामा हे सगळेच आवडू लागतात. सगळ्यांत भारी म्हणजे यातले मुकुंदाचे सगळे मित्र. फावड्या, चित्र्या, सुऱ्या... नकळत त्यातून लेखक दाखवत असलेला त्यांच्या आर्थिक परिस्थितीतला फरक, गावातलं सांस्कृतिक-सामाजिक वातावरण आणि या सगळ्यांच्या पार्श्वभूमीला सूचकपणे असलेली आणीबाणीची किनार... हा काळ आपणही नायकासोबत अनेकदा जगतो. त्याच्यासोबत त्या शेताडीतील वाट चालतो, भाताचा सुगंध छाती भरून घेतो, वर्गात त्याच्याच शेजारी बसून बेंद्रीणबाईंची टवाळी करतो, दूरवरचे सोनारपाड्याचे ते जांभळे डोंगर बघतो, त्याच्यासोबत गावातल्या गणपती मंदिरात येतो आणि प्रदक्षिणाही घालतो, त्याच्यासोबत संध्याकाळच्या क्लासला येतो आणि त्या दाटीवाटीत कोपऱ्यात बसून त्याच्याकडे पाहत राहतो, तो शिरोडकरकडं पाहताना मी त्या दोघांनाही पाहतो... मी स्काउटच्या कॅम्पलाही येतो, मीही गाणी म्हणतो... मी केटी आणि विजयच्या बैठकीतही डोकावतो, मी संध्याकाळी मुकुंदाच्या बाबांसोबत बुद्धिबळ खेळणाऱ्या निकमकाकांच्या मधे बसून त्यांचा खेळ बघत राहतो... मी घराघरातून येणाऱ्या कुकरच्या शिट्ट्यांचे आवाज आणि चाळीत आलेल्या पहिल्या टीव्हीचा आवाज मुकुदांच्याच जोडीने अनुभवतो....
खरं तर माझं जगणं मुकुंदापेक्षा किती तरी वेगळं होतं. यातला नायक मुंबईच्या सान्निध्यात वाढतो, मी एका लहान तालुक्याच्या गावाला... त्याचं टिपिकल चौकोनी कुटुंब होतं, आमचं एकत्र कुटुंब... पण तरीही मग तो एवढा जवळचा का वाटतो? त्या काळात त्याच्यासारखं आपण जगायला हवं होतं, असं तीव्रतेनं का वाटतं? मला वाटतं, त्या वयात असलेलं निरागस मन आपण नंतर हरवून बसलो आहोत. मुकुंदाला भेटलं, की माझं ते निरागस मन पुन्हा मला धावत भेटायला येतं... मग मी अजून विचार करतो आणि माझ्या लक्षात येतं, अरे, मीच मुकुंद आहे! मग आपण तर आपल्याला आवडतोच...

मला यातले अनेक प्रसंग आवडतात. अनेकदा तर आपल्याच आयुष्याचं चित्र लेखक उभं करतो आहे की काय, असंही वाटतं. वर्गात गाण्याच्या भेंड्या सुरू असताना, शिरोडकरनं फळ्यावर लिहिलेलं गाणं मुकुंदानं ओळखणं आणि नंतर ती नाराज झाल्याचं लक्षात आल्यावर पुढच्या वेळी मुद्दाम ते न ओळखणं आणि मग तिनं समजुतीनं याच्याकडं पाहणं हे फार खास आहे. शिवाय ते गणपती मंदिरात पहिल्यांदा भेटतात, तो प्रसंगही लेखकानं इतका उत्कट आणि सुंदर रंगवला आहे की बस! यानंतर स्काउटच्या शिबिराला ते जातात तेव्हाचा प्रसंग आणि नंतर मुकुंदा थेट तिच्या घरी जातो, तो प्रसंग! या प्रत्येक प्रसंगात लेखकानं मुकुंदाची त्या वयातली शारीर जाणीव, त्याला शिरोडकरविषयी वाटत असलेलं ‘ते काही तरी’, त्याची धडधड, आजूबाजूच्या लोकांची-कुटुंबाची सतत धास्ती घेत जगण्याची वृत्ती हे सगळं फार नेमकेपणानं टिपलं आहे. मंदिरातला प्रसंग आणि ती तिच्या बहिणीला घेऊन येते त्यानंतर मुकुंदाची उडालेली धांदल लेखक फार प्रेमानं चितारतो. या गणपती मंदिरातलं एकूण वातावरण, तिथं रोज येणारे त्या गावातले भाविक, सतत ‘तू इथं काय करतोयस?’ असं विचारणारी आणि गावातल्या प्रत्येक मुलाला ओळखणारी मोठी माणसं, तिथला फुलवाला, देवळातल्या बायका असं सगळं चित्र लेखक तपशीलवार उभं करतो. एका अर्थानं नंतर घडणाऱ्या फार गोड अशा प्रेमप्रसंगासाठी एक कॅनव्हास तयार करतो. नायक मुकुंदाला शिरोडकर तिथं भेटायला येईल की नाही, याची खात्री नसते. मात्र, ती यावी अशी मनोमन प्रार्थना तो करत असतो. त्यासाठी ‘ती येणार नाही, ती येणार नाही’ असं मुद्दाम उलटं घोकत असतो. अखेर ठरलेली वेळ उलटून गेल्यावर काही वेळानं ‘ती’ येते. तिला पाहून मुकुंदा हरखतो. तिच्यासोबत तिची लहान बहीणही असते. ते पाहून तो जरा नाराजही होतो. या प्रसंगाला मुकुंदाचा जो काही शारीरिक प्रतिसाद असतो, तो सगळा लेखक कमालीच्या आत्मीयतेनं आणि प्रेमानं रंगवतो. अखेर अगदी थोडा वेळ त्यांची भेट होते. काही तरी जुजबीच ते बोलतात आणि ती लगबगीनं तिथून निघून जाते. मुकुंदा एवढ्यावरही खूश असतो. ती आली याचंच त्याला विशेष वाटत असतं. मुकुंदासारखीच भावना असणारे त्या वयातले किती तरी मुलं जसं वागतील, जसा प्रतिसाद देतील, जसं व्यक्त होतील अगदी तसंच या कादंबरीचा नायक करतो. म्हणूनच तो अधिकाधिक आपला वाटतो.
कादंबरी या वाङ्मय प्रकाराची सारी वैशिष्ट्यं लेखक यात वापरतो. म्हटलं तर काल्पनिक, म्हटलं तर स्पष्टच आत्मकथनात्मक असं निवेदन लेखकानं यात वापरलं आहे. याचा फायदा म्हणजे वाचकांच्या कल्पनाशक्तीला पूर्ण वाव मिळतो. लेखक या कादंबरीतलं पर्यावरण अशा खुबीनं रंगवतो, की ते सगळं आपल्याला तर दिसतंच; शिवाय आपल्या वैयक्तिक अनुभवविश्वाची जोड त्याला देऊन आपण आपली वेगळी ‘शाळा’ मनात भरवू लागतो. आपल्याला आपल्या ’त्या‘ वयातले अनुभव आठवू लागतात. लेखकानं ते अशा कौशल्यानं वर्णिले आहेत, की प्रत्येक वाचकाला त्यात आपल्या स्वत:च्या ‘गाळलेल्या जागा’ तिथे भरता येतील.
संपूर्ण कादंबरी अशा रीतीनं आपल्याला आपल्या ‘काफ लव्ह’ची आठवण करून देते; शिवाय आपल्याला पुन्हा एकदा त्या कोवळ्या प्रेमाच्या प्रेमात पाडते. त्या वयातल्या आपल्या आठवणी आयुष्यभर कधीही न विसरता येण्यासारख्याच असतात. ‘शाळा’ आपल्याला पुन्हा त्या दिवसांत नेते आणि स्मरणरंजनाचं सुख मिळवून देते.
एका अर्थानं हा मुकुंदा आणि त्याची ती ‘शाळा’ म्हणजे माझं, काळाच्या शिळेत आणि पुस्तकांच्या पानांत कोरून ठेवलेलं पौगंड आहे... आणि म्हणूनच मला ती फार फार प्रिय आहे!

---

(पूर्वप्रसिद्धी : दृष्टी-श्रुती डिजिटल दिवाळी अंक २०२३)

---


2 Dec 2023

हंपी डायरी - भाग ३

‘अंजनाद्री’पासून तुंगभद्रेपर्यंत....
---------------------------------------

हंपीत पहिल्याच दिवशी पाहिलेल्या अद्वितीय शिल्पसौंदर्याची स्वप्नं पाहतच रविवारची रात्र सरली. आज सोमवार (२७ नोव्हेंबर) म्हणजे आमचा हंपीतला दुसरा आणि शेवटचा दिवस होता. आजही लवकर उठून आवरलं. साडेआठपर्यंत ब्रेकफास्ट करून आम्ही मंजूबाबाची वाट पाहायला लागलो. हंपीत दक्षिण हंपी आणि उत्तर हंपी किंवा नदीच्या अलीकडील आणि पलीकडील असे दोन भाग आहेत, हे आम्हाला माहिती होतं. आदल्या दिवशी आम्ही दक्षिण किंवा नदीच्या अलीकडचं हंपी पाहिलं होतं. आता आम्हाला उत्तरेला म्हणजे तुंगभद्रेच्या पलीकडे जायचं होतं. मंजूबाबा साधारण नऊ वाजता हॉटेलवर आला. आम्ही लगेच निघालो. पहिला टप्पा होता अंजनाद्री. इथं हनुमानाचा जन्म झाला, असा स्थानिकांचा दावा आहे. (असाच दावा नाशिकजवळील अंजनेरी पर्वताबाबतही केला जातो.) हा सर्व परिसर विरुपाक्ष मंदिर केंद्रस्थानी धरल्यास १२-१३ किलोमीटरच्या परिघात असावा, असा माझा समज होता. प्रत्यक्षात अंजनाद्री आमच्या हॉटेलपासून तब्बल ३२ किलोमीटर दूर होतं. आम्ही बराच काळ रिक्षातून प्रवास करत होतो म्हटल्यावर मी मंजूला विचारलं, तेव्हा त्यानं हे अंतर सांगितलं.
आम्ही साधारण दहा वाजता अंजनाद्री पर्वताच्या पायथ्याशी पोचलो. एखाद्या देवस्थानाजवळ असतात तशी इथंही दोन्ही बाजूंना दुकानं, खाण्याचे स्टॉल आदी होतं. साधारण पर्वतीच्या दीडपट आकाराची ती टेकडी होती.  एकूण ५७५ पायऱ्या होत्या. वर चढून जायचं की नाही, याचा आम्ही विचारच केला नाही. जायचंच हे ठरलं होतं. स्वत:ला आव्हान देण्याचा एक प्रकार करून पाहू, असाही जरा एक विचार होता. सकाळची आल्हाददायक वेळ होती. सुदैवानं ऊन नव्हतं. ढग आले होते. आम्हीही इतरांप्रमाणे ‘जय श्रीराम’ म्हणून त्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. सुरुवातीला उत्साहाने शंभर पायऱ्या चढल्यावर मात्र दम लागला. इथं या पायऱ्या उंच होत्या. मात्र, त्या मार्गावर बऱ्याच ठिकाणी शेड घातलेली होती आणि मधे मधे बसायला बाकही होते. आम्ही थोडं थांबत, थोडं बसत हळू हळू ती टेकडी चढून वर गेलो. नंतरच्या टप्प्यात तर ढग दूर होऊन सूर्य तळपू लागल्यानं घामाघूम व्हायला झालं. मात्र, शेवटचा टप्पा पार केल्यावर स्वत:च स्वत:ला शाबासकी दिली. आपण स्वत:ला अनेकदा कमी लेखतो. मात्र, प्रत्यक्षात वेळ आल्यावर आपण किती तरी मोठ्या गोष्टी सहज करू शकतो. याचाच हा एक छोटा नमुना होता. मी व धनश्री सर्वांत आधी पोचलो. थोड्या वेळानं साई व वृषाली आले. इथं अनेक स्थानिक भाविक हा पर्वत अनवाणी चढताना पाहिले. खाली एक चप्पल स्टँड दिसलाही होता. मात्र, आम्हाला स्पोर्ट शूज घातल्याशिवाय इथं चढणं अवघड वाटलं होतं. आम्हाला वर येतानाही अनेक स्थानिक मंडळी शूज का घातले आहेत, असं खुणेनं विचारत होती. मात्र, आम्ही इतर काही पर्यटक आमच्यासारखेच शूज घालून उतरतानाही पाहत होतो. तेव्हा अनवाणी चालणं हे ऐच्छिक असावं, अशी आपली आम्ही सोयीस्कर समजूत घालून घेतली आणि तसेच वर चालत राहिलो. वर देवळाच्या शेजारी शूज अर्थातच काढून ठेवले. इथं माकडं भरपूर आहेत. देवळाच्या थोड्याशा सावलीखेरीज तिथं सावली कुठंही नव्हती. आम्ही तिथंच थोडा वेळ टेकलो. जरा काही तरी खावं, म्हणून जवळची राजगिरा वडी काढून खाल्ली. वृषालीनं ती लगेच न खाता हातातच ठेवली होती. त्यामुळं एक माकडाचं पिल्लू टुणकन उडी मारून तिच्या पायावरच येऊन बसलं. त्याबरोबर आम्ही सगळेच दचकलो आणि थोडासा आरडाओरडा झाला. अर्थात मी लगेच तिला सांगितलं, की हातातली वडी देऊन टाक. तिनं ती वडी त्या पिल्लाला दिल्याबरोबर ते लगेच उडी मारून तिथून पसार झालं. नंतर पुन्हा आम्ही उतरेपर्यंत एकही खाण्याचा पदार्थ सॅकमधून बाहेर काढला नाही. नंतर मंदिरात गेलो. शेजारी नारळाच्या तुकड्यांचा ढीग पडला होता. समोर एक मोठी घंटा टांगली होती. त्यापुढे संरक्षण म्हणून लावलेल्या जाळीला अनेक नवसाचे कापडाचे तुकडे बांधलेले दिसत होते. त्यापलीकडे मोठी दरी होती. तिथं भन्नाट वारा येत होता. खाली तुंगभद्रेचं विशाल पात्र (सध्या जरा रोडावलेलं) आणि हिरवीगार भातशेती, त्यात डुलणारे माड असं देखणं निसर्गचित्र दिसत होतं. मी किती तरी वेळ तिथं उभं राहून ते न्याहाळत होतो. समोरचे डोंगर आपल्यासारखे नव्हते. तिथं सगळीकडं फक्त मोठमोठ्या शिळाच पडलेल्या दिसत होत्या. लहानग्या हनुमानानेच बालपणी खेळ म्हणून खेळून ही सगळी रचना केली आहे, हे मंजूबाबानं आम्हाला येतायेताच सांगितलं होतं. आम्हीही त्यावर भक्तिभावाने माना डोलावल्या होत्या. मला त्या सगळ्या परिसराचीच भौगोलिक रचना (टोपोग्राफी) अतिशय विलक्षण, वेगळी वाटत होती. आम्ही मारुतीरायाचं दर्शन घेऊन बाहेर आलो. मला ‘भीमरूपी महारुद्रा’ सगळ्यांनी एकत्र म्हणावंसं वाटू लागलं. सलीलनं केलेलं या स्तोत्राचं नवं गाणंही आठवलं. नंतर त्या टेकाडावर मंदिराच्या विरुद्ध बाजूला केलेल्या पॉइंटवर जाऊन फोटोसेशन केलं. अजून थोडं वर चढून गेलं, की त्या सगळ्या शिळा दिसत होत्या. तिथंही जाऊन आलो. आता ऊन वाढलं होतं. आम्ही आता उतरायला लागलो. उतरणं तुलनेनं सोपंच होतं. वर येताना धनश्रीला एक जर्मन तरुणी भेटली होती. इतरही काही परदेशी पाहुणे दिसत होते. आम्ही उतरताना अनेक लोक वर येताना दिसत होते. मात्र, आता उन्हामुळं त्यांची बऱ्यापैकी दमछाक होतानाही दिसत होती. आम्ही टणाटण उड्या मारत आता उतरत होतो. वीस-एक मिनिटांत आम्ही खाली आलोही.

मंजूला फोन लावला. तो दोन मिनिटांत आला. तोवर आम्ही उसाचा रस घेऊन जीव शांत केला. मंजू आल्यावर आता पुढचा टप्पा होता तुंगभद्रेत कोराईकल राइडचा. कोराईकल म्हणजे त्या बांबूच्या टोपल्या. एका टोपलीत साधारण पाच ते सहा लोक बसू शकतात. याला खालून डांबर लावलेलं असतं. या गोल टोपलीतून नदीत चक्कर मारतात. ही राइड हंपीत आल्यावर अगदी ‘मस्ट’ असते. मंजूबाबा आम्हाला एका ठिकाणी घेऊन गेला. समोर तुंगभद्रेचं दर्शन झालं. तिथं दगडांमुळं आपोआप एक नैसर्गिक बांध तयार झाला होता आणि पाणी त्यावरून खळाळत, धबधब्यासारखं उड्या मारत पुढं चाललं होतं. आम्ही कोराईकल राइडवाल्याकडं चौकशी केली, तर त्यानं २०-२५ मिनिटांच्या राइडचे प्रत्येकी ७५० रुपये सांगितले. हे पैसे जास्त होते आणि आम्हाला मान्य नव्हते. तेवढ्यात तिथं एक गोरा आला. आम्ही त्याच्याशी गप्पा मारायला लागलो. तो जर्मनीहून आला होता. आमचं हे बोलणं ऐकून त्या कोराईकलवाल्याला वाटलं, की आम्ही त्याच्याबरोबर ‘डील’ करतोय. एकूण आम्हाला त्याचा रागच आला आणि आम्ही तिथली राइड न घेता परत निघायचं ठरवलं. तो गोराही माघारी निघाला. 
मंजूला जरा वाईट वाटलं असावं. अर्थात आम्ही त्याच्या भावनेचा आत्ता विचार करत नव्हतो. आता जेवायची वेळ झाली होती. मग मंजू आम्हाला  जेवायला एका झोपडीटाइप ‘व्हाइट सँड’ नावाच्या रिसॉर्ट कम हॉटेलात घेऊन गेला. इथं आधीच काही गोरे तरुण-तरुणी येऊन पत्ते खेळत बसले होते. इथला पोरगा चांगला होता. हे हॉटेलही वेगळं होतं. इथं आपल्या बैठकीसारखी मांडी घालून बसायची व्यवस्था होती. तिथं काही वाद्यंही ठेवली होती. त्या पोरानं आम्ही सांगितलेली ऑर्डर घेतली. सूप, पिझ्झा, पास्ता असं सगळं कॉन्टिनेंटल फूड खाल्लं. एकूण मजा आली. लंच झाल्यावर मंजू आम्हाला अजून एका ठिकाणी घेऊन गेला. आम्ही आता कुठं चाललोय, हे माहिती नव्हतं. थोड्याच वेळात एका टेकाडावर आम्ही पोचलो, तर डाव्या बाजूला धरणासारखी छोटीशी भिंत लागली. हा सनापूर तलाव होता. इथंही कोराईकल राइड मिळते. हा तलाव अतिशय सुंदर होता. चारही बाजूंनी डोंगर आणि मधोमध बशीसारख्या आकारात हा तलाव होता आणि तोही दोन भागांत होता. मधल्या चिंचोळ्या पट्टीवर गाड्या पार्क केल्या होत्या. आम्हीही तिथं पोचलो. मगाशी आमची राइड न झाल्यानं मंजू आम्हाला इथं घेऊन आला होता. इथल्या राइडवाल्याने एक हजार रुपये सांगितले. आम्ही आनंदानं तयार झालो. चौघांनाही त्यानं त्या टोपलीत बसवलं. आधी लाइफ जॅकेट्स दिली. आधी जरा धाकधूक वाटत होती. आमचा नावाडी म्हणजे एक वयस्कर काका होते. ते फारसे बोलत नव्हते. यांचा मालक किनाऱ्यावर उभा राहून प्रत्येक ग्राहकाशी डील करत होता. आमच्या आधी एक फॅमिली राइड सुरू करून तलावाच्या आत गेली होती. मग आम्हीही निघालो. ही टोपली दोन-अडीच फूट एवढीच खोल असल्यानं आपण जवळपास पाण्याला समांतर तरंगत असतो. पाणी अगदीच जवळ असतं. त्यामुळं सुरुवातीला मला तरी जरा टरकायला झालं. मात्र, लगेच व्हिडिओ, फोटो आदी गोष्टींत मी गुंतवून घेतलं. जरा आत गेल्यावर त्या दुसऱ्या राइडच्या लोकांना त्या नावाड्यानं जोरजोरात गोल गोल फिरवायला सुरुवात केली. आम्हाला ते बघून एकाच वेळी मजा आणि थोडी भीतीही वाटली. थोड्याच वेळात आम्ही दोन्ही टोपल्या एकमेकांच्या जवळ आलो. त्या टोपलीतली फॅमिलीही मराठीच होती. मग मोबाइलची देवाणघेवाण झाली आणि एकमेकांचे व्हिडिओ वगैरे काढणं झालं. एकूण धमाल अनुभव होता. साधारण अर्ध्या तासात आम्ही बाहेर आलो. अगदी बाहेर पडताना त्या टोपल्यांच्या मालकानं आमचे मोबाइल घेऊन पुन्हा सगळ्यांचे फोटो काढून दिले. बाहेर पडल्यावर आम्ही मंजूला धन्यवाद दिले. 

इथून आम्ही पंपा सरोवर बघायला गेलो. हे सरोवर सनापूर तलावासारखंच मोठं असेल असं मला वाटलं होतं. प्रत्यक्षात ते अगदीच छोटं आणि सर्व बाजूंनी दगडांनी बारवेसारखं बांधलेलं निघालं. इथं वर एक मंदिर होतं. मी एकटाच तिथं गेलो. लक्ष्मीचं आणि आणखी एका देवतेच्या मूर्ती होत्या. मी लांबूनच नमस्कार करून निघालो. वर ‘शबरीची गुहा’ आहे, असं काही जण बोलताना ऐकलं. मात्र, तशी कुठलीही माहिती तिथं लिहिलेली नव्हती. त्यामुळं मी तिकडं वर गेलो नाही. याही ठिकाणी भरपूर वानरं होती. इथं थोडा वेळ रेंगाळून आम्ही पुढं निघालो. आता आम्ही हंपीत जाऊन काल राहिलेली दोन मंदिरं (हजारीराम व भूमिगत शिवमंदिर) बघणार होतो. जाताना मंजूबाबा आम्हाला अनेगुंदी गावात घेऊन गेला. या गावात कृष्णदेवरायांचे वंशज अजूनही राहतात. तिथला टाउन हॉल, कृष्णदेवरायांच्या वंशजांचा भलामोठा वाडा हे सगळं बाहेरूनच बघितलं. त्या गावाच्या चौकात कृष्णदेवरायांचा पूर्णाकृती पुतळा आहे. तिथं थांबून मी त्या पुतळ्याचा फोटो काढला.
यानंतर आम्ही पुन्हा हंपीकडं निघालो. अंतर बरंच होतं. पण हा रस्ता सुंदर होता. तुंगभद्रेवरचा मोठा पूल ओलांडून आम्ही ‘अलीकडं’ (म्हणजे दक्षिणेला) आलो. दोन्ही बाजूंनी भातशेती, नारळाची झाडं यामुळं कोकणाचा भास होत होता, तर काही ठिकाणी ज्वारी किंवा उसामुळं देशावर असल्याचा भास होत होता. थोडक्यात, हंपी परिसरात कोकण व देशाचं उत्कृष्ट मिश्रण पाहायला मिळत होतं. शिवाय वातावरण उत्तर भारतातल्यासारखं थंडगार, आल्हाददायक! आम्ही पुन्हा ३०-३२ किलोमीटरचा प्रवास करून हंपीत शिरलो. या वेळी सुरुवातीला पान-सुपारी बाजार नावाचा एक भाग बघितला. तिथून समोरच ‘हजारीरामा’चं मंदिर आहे. नावाप्रमाणे इथं रामायणातील अक्षरश: हजारो प्रसंग कोरले आहेत, म्हणून हा ‘हजारीराम’. आशुतोष बापटांच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे, ‘हजारी’ हे फारसी नाव या मंदिराला नंतर पडलं असावं. शिवाय हे मंदिर म्हणजे राजघराण्याच्या खासगी प्रॉपर्टीचा भाग होतं. त्यामुळं ते दीर्घकाळ चांगलंही राहिलं होतं. आम्ही गेलो तेव्हा संध्याकाळचं सुंदर पिवळंधमक ऊन त्या मंदिरावर पडलं होतं. त्यामुळं त्या शिळांना अक्षरश: सुवर्णाचं लेणं चढवल्यासारखं वाटत होतं. तिथं कोणी तरी ड्रोननं त्या मंदिराचं चित्रीकरण करत होतं. त्या कर्कश आवाजानं मात्र आमचा रसभंग झाला. मंदिर मात्र फारच सुंदर होतं. मंदिराशेजारी भरपूर हिरवळ राखली आहे. आम्ही तिथं जरा वेळ शांत बसलो. सूर्य हळूहळू कलायला लागला होता. आता आम्हाला अजून एक-दोन ठिकाणं बघायची होती. त्यामुळं ‘हजारीरामा’ला ‘राम राम’ करून आम्ही तिथून बाहेर पडलो. बाहेर एक पुस्तकविक्रेता होता. आमचं मराठी ऐकून तोही मोडक्या-तोडक्या मराठीत आम्हाला पुस्तक घेण्याचा आग्रह करू लागला. माझ्या एका भाचीसाठी हंपीची माहिती देणारं एक इंग्लिश माहितीपुस्तक घेतलं. तिथून निघालो.
मंजूबाबानं आता आम्हाला त्या भूमिगत शिव मंदिराकडं नेलं. काल आम्ही हे विरुपाक्ष मंदिराकडं जाताना पाहिलं होतं. आज तिथं आत गेलो, तर फार कुणी नव्हतं. मंदिर जमिनीच्या पातळीच्या खाली असल्यानं आणि हळूहळू सूर्य मावळतीकडं निघाल्यानं तिथं जरा अंधारच होता. तरी मी आत आत जात गाभाऱ्यापर्यंत गेलो. तिथं नंदी तेवढा दिसला. पण आजूबाजूला पाणी होतं. त्यापलीकडचा गाभारा दिसलाच नाही. तिथूनच माघारी फिरलो. मंदिर सुंदर होतं यात वाद नाही; पण त्या वातावरणामुळं आणि निर्मनुष्य असल्यानं उगाच काही तरी गूढ वगैरे वाटत होतं. आम्ही लगेच तिथून बाहेर पडलो. आता मंजूबाबा आम्हाला कृष्ण मंदिरात घेऊन गेला. हाही एक अप्रतिम असा शिल्पसमूह आहे. आम्ही गेलो, तेव्हा तिथं कुणीही नव्हतं. आम्ही शांतपणे ते सगळं मंदिर फिरून पाहिलं. या मंदिरासमोरच ‘कृष्ण बाजार’ आहे. इथून मंजू आम्हाला हेमकूट टेकडीकडं घेऊन निघाला. तिथं त्या टेकाडाच्या चढावरच एक गणपतीची मोठी पाषाणमूर्ती आहे. मला नगरच्या विशाल गणपतीची किंवा वाईच्या ढोल्या गणपतीची आठवण झाली. साधारण तेवढ्याच उंचीचा हा गणपती होता. त्याला नमस्कार करून आम्ही टेकडी चढायला सुरुवात केली. हेमकूट टेकडीवरून सगळं हंपी दिसतं. शिवाय हा ‘सनसेट पॉइंट’ही आहे. नेमका त्या दिवशी सूर्य ढगांत लपला होता. त्यामुळं सूर्यास्त असा दिसलाच नाही. वरून हंपीचा सगळा नजारा मात्र अप्रतिम दिसत होता. उजव्या बाजूला विरुपाक्ष मंदिराचे गोपुर दिसत होते. आता तिथला वरचा तो पिवळाधमक दिवाही प्रकाशमान झाला होता. सहा वाजून गेले होते. तिथला सुरक्षारक्षक सगळ्या लोकांना खाली हाकलायला आला. सूर्यास्तानंतर इथली सगळी ठिकाणं पर्यटकांना बंद होतात. आम्हाला खरं तर तिथं थोडा वेळ रेंगाळायचं होतं. पण तो गार्ड आल्यामुळं मी व धनश्री लगेच खाली यायला निघालो. साई व वृषाली थोड्या वेळानं खाली आले. त्यांना तो तुंगभद्रेच्या काठी भेटलेला जर्मनीचा गोरा पुन्हा भेटला होता. म्हणून मग ते रेंगाळत त्याच्याशी गप्पा मारत आले होते.
आता आमचं ‘साइट सीइंग’ असं संपलं होतं. उगाच हुरहुर वाटत होती. मंजूबाबा आता आम्हाला घेऊन तडक हॉटेलकडं निघाला. त्यानं पावणेसातला बरोबर आमच्या हॉटेलवर आणून सोडलं. आम्ही त्याचे पैसे दिले. दोन दिवस त्यानं चांगलं ‘गाइड’ केलं, म्हणून त्याचे आभार मानले. 
आज आम्हाला संध्याकाळी होस्पेट शहरात जरा चक्कर मारायची होती. म्हणून थोडं आवरून आम्ही कार काढून बाहेर पडलो. होस्पेट शहरात दोनच प्रमुख रस्ते दिसले. त्यातला एक बसस्टँडला काटकोनात असलेला रस्ता बराच मोठा होता. इथं मोठमोठ्या ब्रँडच्या शो-रूम दिसत होत्या. ‘शानबाग’ नावाचं मोठं हॉटेल दिसलं. पलीकडंच त्यांचं रेस्टॉरंटही होतं. शानबाग, पै, कामत, कार्नाड ही सगळी चित्रापूर सारस्वत मंडळी. मूळची कारवारकडची. यांचं इकडं व्यवसायांपासून सगळीकडं मोठं प्रस्थ दिसतं. आम्ही त्या हॉटेलमध्ये शिरलो. तिथं ‘नॉर्थ इंडियन’ खाण्याचा विभाग पहिल्या मजल्यावर होता. मग तिकडं गेलो. तिथला वेटर जरा बडबड्या होता. त्याच्याशी गप्पा मारत जेवलो. जेवण चांगलं होतं. दिवसभर आमची दमछाक बरीच झाली होती. त्यामुळं आम्ही व्यवस्थित जेवलो. मी नंतर डाळिंबाचं ज्यूस घेतलं. तेही भारी होतं. 
तिथून निघालो. शहरात आणखी एक फेरफटका मारून आम्ही हॉटेलवर परतलो.

विजापूरचा गोल घुमट

येताना विजापूर (आता विजयपुरा), सोलापूरमार्गे पुण्याला जाऊ, असं आम्ही ठरवलं. वेगळा भाग बघायला मिळेल, हा उद्देश. मग मंगळवारी सकाळी लवकर आवरून साडेसहा वाजताच होस्पेट सोडलं. होस्पेट ते विजापूर रस्ता चौपदरी व उत्कृष्ट आहे. सकाळी सातच्या सुमारास आम्हाला रस्त्यावर एकदम धुकं लागलं. ते आठ-दहा किलोमीटरपर्यंत होतं. मग पुन्हा विरलं आणि नंतर काही अंतरावर पुन्हा लागलं. रात्री तिथं पाऊस पडून गेला असावा. पण असं रस्त्यात मध्येच सुरू होणारं आणि संपणारं धुकं मी तरी पहिल्यांदाच पाहिलं. आम्ही मधे इलकल नावाच्या गावात थांबून ब्रेकफास्ट केला. पुढं रस्त्यात डाव्या हाताला मोठं अलमट्टी धरण लागतं. बरोबर दहा वाजता विजापुरात पोचलो. आम्हाला इथला गोल घुमट बघायचा होता. विजापूर हे आडवं पसरलेलं शहर आहे.

बायपासवरून आम्हाला तो घुमट लांबूनही दिसत होता. मग तिथं गेलो. प्रत्येकी २५ रुपयांचं तिकीट काढून आत गेलो. तिथं एक संग्रहालयही आहे. ते बघायला आम्हाला वेळ नव्हता, म्हणून तिकीट काढलं नाही. थेट गोल घुमटापाशी गेलो. इथं चपला, बूट बाहेर काढायला लागतात. ही विजापूरच्या आदिलशहाने बांधलेली वास्तू. शिवकाळात स्वराज्याच्या शत्रूचं प्रमुख ठाणं. मनात वेगवेगळे विचार येत होते. याच परिसरात अफजलखानाने महाराजांना मारण्याचा विडा उचलला. इथंच स्वराज्याच्या शत्रूच्या मसलती होत असणार. ती इमारत अजूनही भक्कम व बुलंद होती. आम्ही त्या छोट्या जिन्याने चार-पाच मजले चढून पार त्या घुमटापाशी गेलो. हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा घुमट आहे म्हणे. साधारण ३९ मीटर एवढा त्याचा व्यास आहे. तिथं येणारे प्रतिध्वनी, टाळ्यांचे आवाज हे सगळं अनुभवलं. व्हिडिओ केले. मात्र, आम्हाला ‌फार वेळ नव्हता. मग लगेच खाली उतरलो आणि बाहेरच पडलो. आम्ही साधारण तासभर तिथं होतो.
तिथून सोलापूर ९८ किलोमीटरवर आहे.  पुढे भीमा नदी लागते. तीच महाराष्ट्र-कर्नाटक सीमा आहे. ती ओलांडून आम्ही महाराष्ट्रात प्रवेश केला. सोलापुरात आता बायपास झाल्यानं शहरात प्रवेश करावा लागतच नाही. आम्ही सोलापूर ओलांडून पुढं आल्यावर डाव्या बाजूला एका हॉटेलात थांबून जेवलो. इथून पुढं कार मी चालवायला घेतली. थोड्या अंतरावर गेल्यानंतर मुसळधार पाऊस सुरू झाला. हा पाऊस साधारण १५-२० किलोमीटरच्या पट्ट्यात होता. पुढं पुन्हा ऊन. यवतला पाच वाजता चहाला थांबलो. इथून पुढं पुन्हा साईनं कार घेतली. पुण्यातलं ट्रॅफिक झेलत साडेसात वाजता घरी सुखरूप पोचलो.
हंपीची आमची ही सहल चांगली झाली. मात्र, आमचं केवळ हंपीच बघणं झालं. बदामी, पट्टदकल, ऐहोळे वगैरे राहिलं. त्यामुळं पुन्हा एकदा तिकडं जावंच लागणार. हंपीला थंडीच्या सीझनमध्येच जावं. तिथं चालण्याची तयारी ठेवावी. ‘पाय असतील तर हंपी पाहावे, डोळे असतील तर कनकपुरी आणि पैसे असतील तर तिरुपती बालाजी’ अशी एक म्हणच तिकडं आहे. तेव्हा भरपूर चालावे लागते. शक्यतो स्थानिक गाइड घ्यावा. नाही तर फार काही माहिती समजत नाही. शिवाय जेवण्यापासून ते खरेदीपर्यंत अनेक ठिकाणी हे स्थानिक लोक आपल्याला मदत करतात. हंपीला जायचं असेल, तर आता सोलापूर-विजापूर मार्गेच जावे. रस्ता सर्वत्र उत्तम आहे. या मार्गे ५४० रुपये टोल (वन वे) लागतो, तर बेळगाव मार्गे हाच टोल (वन वे) तब्बल ११२५ रुपये एवढा लागतो. स्वत:चं वाहन न्यायचं असेल तरी उत्तम; मात्र, शक्यतो दोन चांगले ड्रायव्हर असावेत. एकूण अंतर पुण्याहून ५६५ किलोमीटर आहे आणि दोन ते तीन ब्रेक (साधारण दोन ते अडीच तासांचे) धरले तर बारा ते साडेबारा तास सहज लागतात. सकाळी लवकर प्रवास सुरू करणे उत्तम. 
हंपी हे युनेस्कोने जाहीर केलेले वारसा स्थळ आहे. ते आवर्जून पाहायला हवे. आपल्या देशाचा वैभवशाली सुवर्णकाळ तिथल्या पाषाणांत कालातीत, शिल्पांकित झाला आहे. त्याचं दर्शन घेणं हा शब्दश: ‘श्रीमंत’ करणारा अनुभव आहे, यात वाद नाही.


(समाप्त)

--------------------

1 Dec 2023

हंपी डायरी - भाग २

विठ्ठल ते विरुपाक्ष...
------------------------


विठ्ठल मंदिराच्या त्या प्रांगणात आम्ही प्रवेश करताक्षणीच एक जाणवलं, की आपण एका वेगळ्या दुनियेत आलो आहोत. खरं तर समोर पर्यटकांची गर्दी होती. रविवार होता, त्यामुळे भरपूर लोक आले होते. तरीही एकदम ते सगळं चित्र धूसर होऊन समोरच्या पाषाणांतून, तिथल्या खांबांतून, कमानींतून, भिंतींतून जुना वैभवशाली काळ असा समोर येऊन ठाकलाय, असं काहीसं वाटायला लागलं. (फार सिनेमे बघितल्याचा परिणाम असावा.) खरं तर ते मंदिर खूप भव्य, प्रचंड मोठं किवा उत्तुंग असं काहीच नाही. एकच मजल्याएवढ्या उंचीचं सर्व काम. समोरच्या बाजूला एक गोपुर होतं, तेच काय तेवढं दोन-तीन मजल्यांएवढं उंच. बाकी सर्व बांधकाम साधारण दहा ते पंधरा मीटरपेक्षा उंच नसावं, तरीही त्या प्रांगणात फिरताना काही तरी भव्य-दिव्य असं आपण बघत आहोत, असं वाटत होतं. कर्नाटकात गेल्यावर तिथली लिपी आपल्याला येत नसल्याचा त्रास फार होतो. इथं विठ्ठल मंदिरातही त्या काळाशी जोडणारा लिपीसारखा एखादा धागा उणाच होता. त्याची काहीशी सलही वाटत होती. तिथल्या प्रत्येक खांबाने, त्या खांबावरच्या शिल्पाने, त्यातून न समजणाऱ्या एखाद्या आकृतीने आपल्याशी भरभरून बोलावं, असं फार वाटत होतं. मात्र, लिपी समजत नसल्यास वाचता न येण्यामुळं जी चीडचीड होते, तीच थोडीशी आधी इथं व्हायला लागली... पण काही क्षणच! नंतर ते भग्न सौंदर्य माझ्याशी लिपीपलीकडची भाषा बोलू लागलं. ती भाषा होती वास्तुशास्त्राची, प्रमाणबद्धतेची, सौष्ठवाची, कमालीच्या परिश्रमांची आणि शिल्पांतून आकार घेणाऱ्या अद्वितीय सौंदर्याची! मग माझं मन हळूहळू शांत व्हायला लागलं. आपोआप समोरचं लख्ख दिसू लागलं.
सर्वांचं लक्ष या मंदिरासमोर असलेल्या त्या सुप्रसिद्ध रथाकडं होतं. आम्हीही आधी तिथं धाव घेतली. आपल्याकडच्या पन्नासच्या नोटेवर या रथाचं चित्र छापलेलं आहे. त्यामुळं अनेक लोक हातात एक नोट घेऊन समोरच्या त्या रथाचा फोटो घेत होते. आम्ही गेलो तेव्हा स्वच्छ ऊन होतं. ती सर्व पाषाणवास्तू त्यामुळं झळाळून उठली होती. फोटो अप्रतिम येत होते. सोबतच्या पुस्तकात माहिती वाचून, आम्ही एकेक ठिकाण बघत होतो. मुख्य रथाचं वर्णन या पुस्तकातही सविस्तर दिलंं आहे. या रथासमोर दोन हत्ती आहेत. मात्र, ते नंतर तिथं आणून ठेवले असावेत. मूळ शिल्पात तिथं घोडे असावेत. त्या घोड्यांच्या शेपटीचा काही भाग मुख्य रथाला जोडलेला दिसतोही. शिवाय हत्ती त्या रथाच्या प्रमाणात मोठे नाहीत. प्रमाणबद्धता हे त्या शिल्पांचं वैशिष्ट्य असताना तिथं अशी चूक होणं शक्यच नाही. पण ते काही का असेना, सध्या ते दोन छोटेसे हत्तीच तो रथ ओढताहेत, असं दिसतं. रथाची चाकं आणि वरच्या बाजूची कलाकुसर केवळ अप्रतिम आहे. आम्ही सर्व बाजूंनी फिरून हा रथ पाहिला. भरपूर फोटो काढले. या रथासमोर मुख्य विठ्ठल मंदिर आहे. तिथे आता चौथऱ्यावर ‘रिस्टोरेशन’चे काम सुरू आहे. त्यामुळे तिथं एक सिक्युरिटी गार्ड बसला होता आणि तो कुणालाही वर येऊ देत नव्हता. या मुख्य मंदिराच्या मंडपात जे स्तंभ आहेत, त्यावर वाजवलं तर वेगवेगळे ध्वनी उमटत. आपल्या लोकांनी ते खांब वाजवून वाजवून, त्यावर जोराने आघात करून खराब करून टाकले आहेत, असं समजलं. त्यामुळंच आता तिथं वर चढायला बंदी आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात मूर्ती नाही. आपल्या पंढरपूरला असलेली विठ्ठलाची मूर्ती मुस्लिम आक्रमकांपासून वाचविण्यासाठी काही काळ इथं आणून ठेवली होती असं सांगतात. (किंवा उलटही असेल.) ‘कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू’  हे तिथून आलं असणार. महाराष्ट्र आणि कर्नाटकला घट्ट बांधून ठेवणारा हा विठ्ठल नावाचा धागा अतूट आहे, एवढं मात्र खरं. 
विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात आणखी तीन सभामंडप होते. तेही बघितले. प्रत्येक ठिकाणी सेल्फीबाजांची गर्दी होती. आम्हीही जवळपास तेच करत होतो. इथल्या मंडपांत व्यालप्रतिमा बऱ्याच दिसतात. व्याल म्हणजे एक काल्पनिक प्राणी. त्याचं धड एका प्राण्याचं आणि शिर एका प्राण्याचं, कान किंवा शेपटी आणखीन तिसऱ्याच प्राण्याची असते. अशा व्यालांच्या बऱ्याच प्रतिमा तिथं आहेत. मुख्य सभामंडपात जाता येत नसलं, तरी मागच्या बाजूनं गाभाऱ्याच्या पुढच्या बाजूला जाता येतं. आम्ही तिकडं वळलो. तिथं एक चाफ्याचं सुरेख झाड होतं. तिथं बऱ्याच जणांचं फोटोसेशन सुरू होतं. तिथला एक गाइड हिंदीत त्याच्याबरोबरच्या लोकांना ‘सोनाली कुलकर्णीसोबत मी हंपी नावाच्या मराठी सिनेमात काम केलंय,’ असं सांगत होता. मलाही २०१७ चा प्रकाश कुंटे दिग्दर्शित ‘हंपी’ सिनेमा आठवला. त्यात (धाकट्या) सोनालीसह ललित प्रभाकरनं सुंदर काम केलंय. मी ब्लॉगवर तेव्हा त्याचं परीक्षणही लिहिलं होतं. ‘डोण्ट वरी, बी हंपी’ असं त्याचं शीर्षक होतं. त्यात प्रियदर्शन जाधवनं साकारलेला गाइड कम रिक्षावाला असं म्हणत असतो. माझ्याही ते बरेच दिवस डोक्यात राहिलं होतं. त्या गाइडच्या बोलण्यामुळं एवढं सगळं आठवलं. (परत आल्यावर आवर्जून ‘हंपी’ पुन्हा बघितला. त्यात ‘हंपी’ अप्रतिम टिपलंय यात वाद नाही.)
असो.
आम्ही मागच्या बाजूनं त्या गाभाऱ्याच्या पुढं असलेल्या भागात गेलो. थोडं खाली उतरून गर्भगृहाला प्रदक्षिणाही घालता येत होती. आत अंधार होता. अनेकांनी मोबाइलचे फ्लॅशलाइट सुरू केले होते. या प्रदक्षिणा मार्गावर हत्ती आणि घोड्याची व्याल टाइप प्रतिमा असल्याचा उल्लेख आशुतोष बापट यांच्या पुस्तकात होता. मी ती प्रतिमा शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, मला काही ती दिसली नाही. प्रदक्षिणा मार्गावरून बाहेर आलो. इतर सभामंडप बघितले. सर्वत्र किती फोटो काढू आणि किती नको, असं होत होतं. शेवटी अगदी थकायला झालं. तिथंच एका सभामंडपात आम्ही टेकलो. रविवारमुळं गर्दीचे लोंढेच्या लोंढे येत होते. आम्हाला अजून बरंच काही बघायचं होतं. मग आम्ही बाहेर पडलो. परत जाण्यासाठीही त्या बॅटरी गाड्यांसाठी मोठी रांग होती. अखेर साधारण अर्ध्या तासानं आमचा नंबर लागला आणि आम्ही मुख्य गेटकडं परतलो. मंजूबाबाला फोन केला. तो लगेच आला. आता आम्हाला भूक लागली होती. मग तो आम्हाला कमलापुरात एक ‘काली रेस्टॉरंट’ नावाचं हॉटेल होतं, तिथं घेऊन गेला. हे पहिल्या मजल्यावर होतं आणि तिथंही भरपूर गर्दी होती. दोनशे रुपये असा एकच दर होता आणि ‘अनलिमिटेड बुफे’ होतं. मग आम्ही पैसे देऊन कुपन घेतलं आणि केळीचं पान असलेली ताटं धरली. भूक लागली होती कडाडून, त्यामुळं ती केळीची भाजी, रस्सम, नंतर भात-आमटी असं सगळं भरपूर हाणलं. इथला पापड मस्त होता. त्यामुळं जो तो तो पापड मागत होता आणि ते पटापट संपत होते. टेबलांवर जागा नव्हती. कुणीही कुठंही बसत होतं. आम्हाला ते जरा अवघडच गेलं, पण भुकेपुढं काय होय! शेवटी ‘उदरभरण’ झालं आणि आम्ही पुढं निघालो. आता आम्हाला मंजूबाबा ‘क्वीन्स बाथ’, कमलमहल आणि गजशाला हे तीन स्पॉट दाखवायला घेऊन गेला. ‘रानी का स्नानगृह’ असो, की कमल महल... तिथल्या राण्याच हे स्नानगृह किंवा तो महाल वापरत होत्या की अन्य कारणांसाठी त्यांचा वापर केला जात होता, याविषयी ठोस माहिती नाही, असं तिथल्या फलकांवर स्पष्टपणे नमूद केलं होतं. अर्थात जे सर्वमान्य नाव आहे, तेच तिथंही लिहिलं होतं. त्या स्नानगृहात पाणी सोडण्याची यंत्रणा मात्र भन्नाट होती. दगडी पाटांतून पाणी खेळवलं होतं. अर्थात सध्या ते पूर्ण कोरडं होतं. इथल्या वास्तुरचनेवर इस्लामिक प्रभावही आहे. त्यामुळं हे काम नक्की विजयनगरच्या काळात झालं असावं, की नंतर त्यात मॉडिफिकेशन झालं असावं, असा प्रश्न आहे. नंतर आम्ही कमलमहाल बघायला गेलो. इथं आत जाऊ देत नाहीत. मात्र, बाहेरूनच तो महाल अप्रतिम सुंदर दिसतो. तो अजूनही चांगला राहिला आहे, हे महत्त्वाचं. इथंच ‘हंपी’तलं सोनालीचं नृत्य चित्रित करण्यात आलं आहे. हा महाल आकाशातून कमळाच्या पाकळ्यांसारखा दिसतो म्हणे. (आम्ही अनेक ठिकाणी या वास्तूंचं ड्रोनद्वारे चित्रीकरण सुरू असल्याचं नंतर पाहिलं.)
इथून पुढं आम्ही गजशाळा बघायला गेलो. कमलमहालाच्या शेजारीच ही वास्तू आहे. सलग आडव्या बांधलेल्या या इमारतीत अकरा कमानी आहेत. प्रत्येक कमानीत एकेक हत्ती मावू शकेल, अशी जागा आहे. मागल्या बाजूने माहुताला ये-जा करण्यासाठी छोटा दरवाजा आहे. शेजारीच आणखी एक इमारत आहे. ती सुरक्षारक्षकांची असावी, असा अंदाज आहे. काटकोनात असलेल्या या दोन इमारतींच्या समोर सुंदर हिरवळ होती. आम्ही तिथं जरा टेकलो. मी तर आडवाच झालो. फार बरं वाटत होतं. बरीच पायपीट झाली होती. पण आता संध्याकाळ होत आली होती. त्यामुळं हवाही आल्हाददायक होत चालली होती. इथून आम्ही ‘महानवमी डिब्बा’ (खरं तर ते तिब्बा असावं...) बघायला गेलो. हे एक भव्य प्रांगण आहे. इथं समोर एक उंच मंचासारखा चौथरा आहे. इथं राजे-रजवाडे मंडळी बसून समोर सांस्कृतिक कार्यक्रम बघत असायची म्हणे. समोर मात्र सर्वत्र सपाट नव्हतं. एके काळी खोलगट आखाड्यासारखं काही तरी होतं. तिथं प्राण्यांच्या झुंजी चालत असतील का, असा विचार आला. समोर एके ठिकाणी तळघर होतं. तिथंही आम्ही आत फिरून आलो. खजिना ठेवायची जागा असणार, असं वाटलं. त्या जागेच्या शेजारी एक अतिशय सुंदर दगडी बारव आहे. हिचं उत्खनन अगदी अलीकडे,म्हणजे १९८८ मध्ये झालंय. त्यामुळंच ती खूपच चांगल्या स्थितीत दिसली. 

इथून पुढं आम्हाला खरं तर हजारीराम आणि भूमिगत शिवमंदिरही बघायचं होतं. मात्र, विरुपाक्ष मंदिर हे मुख्य आकर्षण सूर्यास्ताच्या आत बघायला हवं होतं. त्यामुळं मंजूबाबानं आमचा कार्यक्रम बदलून ही दोन ठिकाणं उद्या करू या असं सांगितलं आणि रिक्षा विरुपाक्ष मंदिराकडं घेतली. हंपीचा तो प्रसिद्ध चढ चढून आल्यावर त्यानं आधी डावीकडं रिक्षा घेतली. इथंच ती लक्ष्मी-नृसिंहाची भव्य मूर्ती आहे. आम्ही उतरलो. त्या मूर्तीसमोर बऱ्यापैकी गर्दी होती. या मूर्तीच्या मांडीवर लक्ष्मीची मूर्ती होती. मात्र, ती आक्रमकांनी तोडली. आता केवळ नरसिंह आहे. त्याच्या पायाला आता ‘योगपट्ट’ बांधला आहे. या नरसिंहाचे सुळे, डोळे एवढे हुबेहूब आहेत, की ते बघताना जरा भीतीच वाटते. म्हणून याला ‘उग्र नरसिंह’ असेही म्हणतात. याच्या शेजारी ‘बडीव लिंग’ आहे. एकच अखंड शिळेतून कोरलेलं हे भव्य शिवलिंग असून, भोवती पाणी आहे. नरसिंह आणि हे शिवलिंग या दोन्ही ठिकाणी समोर ग्रिलचे दरवाजे लावून जवळ जाण्यास बंदी करण्यात आली आहे. एका अर्थाने ते योग्यच आहे. याचे कारण आपल्याकडच्या पर्यटकांना कसलंही भान नसतं. फोटो काढण्याच्या नादात आपण त्या मूर्तीची झीज करतो आहोत, हेही अनेकांच्या लक्षात येत नाही. असो. आता आम्हाला मुख्य विरुपाक्ष मंदिरात जायचं होतं. पुन्हा एकदा तो चढ चढून गेल्यावर एकदम विरुपाक्ष मंदिराचं उंच गोपुर दिसलं. सभोवती भरपूर मोकळी जागा, पार्किंगसाठीची जागा अनेक गाड्यांनी व्यापलेली, शेजारी छोटे विक्रेते, पलीकडे तर एक लहानसा बाजारच, मंदिरासमोर मोठा रस्ता हे सर्व वातावरण त्या ठिकाणाचं स्थानमाहात्म्य दाखवीत होतं. एका अर्थानं हे त्या सर्व परिसराचं ‘राजधानी स्थळ’ होतं म्हणायला हरकत नाही. आता उन्हं अगदी कलायला आली होती. मंदिराच्या दारात, पण थोडंसं दूर मंजूनं आम्हाला सोडलं. तिथून आम्ही त्या भव्य गोपुराकडं बघत चालत निघालो. आत पोचल्यावर पुन्हा एक भव्य प्रांगण होतं. तिथं अनेक भाविकांची वर्दळ होती. आम्हीही फोटो काढले. इथं मात्र गाइड घ्यावा, असं वाटू लागलं. समोरच एक जण आला. त्याच्यासोबत असलेल्या लोकांना ‘बाय’ करतच होता, तेव्हाच आम्ही त्याला विचारलं. ‘श्रीनिवास’ असं त्याचं नाव होतं. पाचशे रुपयांत यायला तो तयार झाला. एका अर्थानं आम्ही गाइड घेतला, ते बरंच झालं. कारण त्यानं आम्हाला भरपूर आणि चांगली माहिती दिली. 
मंदिराच्या समोर असलेल्या गोपुरापासून ते इथल्या विरुपाक्षाच्या मूर्तीपर्यंत सर्व माहिती श्रीनिवासने अत्यंत तन्मयतेनं दिली. त्या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा होती. मंदिराच्या आत आणखी एक लहान प्रांगण होतं. तिथं ते पाच स्तंभ होते आणि सभोवती स्थानिक महिला नटून-थटून, साडीत, गजरे माळून आल्या होत्या आणि सुंदर रांगोळ्या रेखाटून तिथं दिव्यांची आरास मांडत होत्या. आम्ही फारच भाग्यवान होतो. तिथं शेजारीच मंदिरातील प्रसिद्ध हत्तीण लक्ष्मी दिसली. तिला सोंडेत पैसे दिले की ती सोंड डोक्यावर ठेवून आशीर्वाद देते. आमच्यापैकी वृषालीला ते करायचा भलताच उत्साह होता. मात्र, सुरुवातीला तिथं मुलांची गर्दी होती. त्यामुळं आपण मंदिर पाहून आल्यावर ‘लक्ष्मी’कडे जाऊ या, असं श्रीनिवास म्हणाला. आम्ही श्रीनिवाससोबत ते मंदिर फिरून पाहिलं. विरुपाक्षाची भव्य मूर्ती, मागच्या बाजूला असलेल्या पंपादेवी, भुवनेश्वरीदेवी यांच्या मूर्ती हे सगळं बघितलं. पंपादेवी म्हणजेच पार्वती. मग गाइडनं ती रती व मदनाची (मन्मथ) कथा पुन्हा सांगितली. विरुपाक्ष इथे कसे आले, हे सांगितलं. आपल्या प्रत्येक मंदिराला, प्रत्येक ऐतिहासिक स्थळाला हे असं लोककथांचं, पुराणकथांचं सुंदर कोंदण असतंच. त्या भागातल्या सर्व लोकांची या कथांवर नितांत श्रद्धाही असते. प्रत्येक गोष्टीत लॉजिक शोधणाऱ्या मंडळींना या मंडळींच्या श्रद्धेमागचा भाव कळणं कठीण आहे. मला स्वत:ला त्या कथांपेक्षाही ती सांगणाऱ्या माणसाच्या नजरेतला श्रद्धाभाव आवडतो. त्या भावनेचा आदर करावासा वाटतो. 

नंतर श्रीनिवासनंं आम्हाला मंदिराच्या मागं नेऊन ते ‘पिन होल कॅमेरा’ तंत्रानं इथल्या गोपुराची आत कशी सावली पडते, ते दाखवलं. तेव्हाच्या वास्तुशास्त्रातील प्रगती बघून आपण केवळ थक्क होतो. नंतर तो आम्हाला मंदिराच्या उत्तर दिशेच्या दरवाजातून बाहेर घेऊन गेला. इथं शेजारी बारवेच्या आकाराचं चांगलं बांधलेलं तळं आहे. तुंगभद्रा नदीतील पाणी या तळ्यात आणण्याची सोय केलेली आहे. तिथंही अनेक लहान-मोठी देवळं होती. पुन्हा आत आलो, तो एका ताईंनी येऊन सर्वांना हातावर दहीभाताचा प्रसाद द्यायला सुरुवात केली. आणखी एक बाई आल्या आणि त्यांनी लेमन राइसचा प्रसाद दिला. त्या वेळी भूक लागलेली असताना केवळ दोनच घासांचा तो प्रसाद इतका सुंदर लागला म्हणून सांगू! आम्ही तसं त्यांना सांगितल्यावर त्या पण अशा काही खूश झाल्या, की बस्स! श्रीनिवास आता आम्हाला बाहेरच्या प्रांगणात घेऊन गेला. इथं आता लक्ष्मी हत्तिणीचं दर्शन घ्यायचं होतं. वृषालीनं एक नोट तिच्या सोंडेत दिली आणि श्रीनिवासनं सांगितल्याप्रमाणे ती पटकन तिच्याकडं पाठ करून वळली. त्याबरोबर ‘लक्ष्मी’नं सराईतासारखी तिच्या डोक्यावर सोंड ठेवून तिला आशीर्वाद दिला. ही हत्तीण या कामात चांगलीच प्रशिक्षित करण्यात आली आहे. पैसे दिले तरच ती सोंड डोक्यावर ठेवते. बाकी केळी किंवा अन्य काही दिलं तर नुसतंच खाते. एकूण मजेशीर प्रकार होता. बाहेर आल्यावर तिथल्या तीन तोंडांच्या नंदीचेही आम्ही फोटो काढले. त्याचीही काही तरी कथा होतीच. मी आता विसरलो. नंतर एकदम बाहेरच्या प्रांगणात आलो. तिथं अनेक लोक पथारी टाकून झोपायच्या तयारीत आलेले दिसले. श्रीनिवासनं सांगितलं, की या प्रांगणात लोक राहायला येतात. पहाटे नदीत स्नान करतात आणि ओलेत्याने विरुपाक्षाचे दर्शन घेऊन आपापल्या घरी जातात. शिवाय या प्रांगणात अनेक लग्नेही होतात. इथं श्रीनिवासनं आमच्या मोबाइल कॅमेऱ्यातील एका सुविधेचा फायदा घेऊन धनश्रीचा व माझा असा फोटो काढला, की माझ्या दोन्ही बाजूंनी ती उभी राहिलेली दिसेल. साई व वृषालीचा तसाच फोटो काढला. आम्ही खूप हसलो. एकूण श्रीनिवास हा फारच पटाईत आणि उत्तम गाइड होता, यात काही शंका उरली नाही. आम्ही आनंदानं त्याला पाचशे रुपये दिले व विरुपाक्षाला पुन्हा एक नमस्कार करून बाहेर पडलो. आम्ही फारच चांगल्या दिवशी आलो होतो. समोर त्रिपुरारी पौर्णिमेचा पूर्ण चंद्र आकाशात लखलखत होता. खाली त्या गोपुरावरचा पिवळाधम्मक दिवाही तसाच दीप्तीमान होऊन झळकत होता. वातावरणात सुखद गारवा होता. आमच्या दिवसभराच्या सर्व श्रमांचा परिहार झाला होता. तिथं शेजारी छोटं मार्केट होतं. तिथं चक्कर मारली. चहा घेतला. मंजूबाबानं आता आम्हाला हॉटेलवर सोडलं तेव्हा सात वाजत आले होते...
हंपीतला पहिला दिवस विठ्ठल ते विरुपाक्ष असा संस्मरणीय झाला होता. ‘पाषाणांतले देव’ आम्हाला पावले होते...  तिकडं त्रिपुरी पौर्णिमेच्या प्रकाशात ती मंदिरं न्हाऊन निघाली होती आणि त्यांच्या दर्शनानं इकडं आमची मनंही!

(क्रमश:)

----
पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

------